राजकारण गेलं चुलीत’ असं आपण म्हणत असतो. म्हणजे राजकारण जाळून टाका, नष्ट होऊ द्या, अशी आपली इच्छा असते. असं असलं तरी प्रत्यक्षात आपल्याला रोज राजकारणाला सामोरं जावं लागतं. याला कारणीभूत आपणच-म्हणजे आम जनता-आहोत.
आपल्या मुलाला एखाद्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल आणि काही कारणानं ते शक्य होत नसेल तर आपण लगेच नगरसेवकाला किंवा आमदाराला गळ घालून आपलं “काम’ करण्याची विनंती करतो. राजकारण्यांचा अधिकारीवर्गावर असलेला दबाव इथे उपयोगी पडतो. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसेल तर, गॅस सिलिंडर लवकर मिळत नसेल तर, घराजवळ कुठे ड्रेनेज तुंबून वाहत असेल तर-अशा अनेक गरजेच्या कारणांसाठी राजकारणी लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते.
मुळात नेत्यांनी लोकाभिमुख राहून राज्य केल्यास आणि जनतेच्या हिताचीच कामं सदोदित केल्यास असे प्रश्न उभे राहू नयेत. पण तसं होत नाही आणि जी कामं आपोआप व्हायला हवीत त्यासाठी आपल्याला नेते लोकांकडे जाणं भाग पडतं. प्रश्नाचं मूळ हे बहुतांश त्याच नेत्यांनी काम नीट न करण्यात आहे. नगरसेवकानं जातीनं लक्ष घालून ड्रेनेजचं काम चोख होईल अशी आधीच व्यवस्था केल्यास प्रश्नच उद्भवणार नाही. तेच पाणीपुरवठ्याबाबत म्हणता येईल. एकूण गोळाबेरीज काय तर प्रश्न निर्माण करणारे तेच आणि त्याची उकल करून देणारेही तेच! आहे की नाही गंमत!
कधी कधी प्रश्न निर्माण करणं हे राजकारण्यांच्या हिताचं असतं. प्रश्न निर्माण झाला की त्यात जातीनं (!) लक्ष घालून तो ते सोडवतात. ही सगळी प्रक्रिया जनतेसमोर येणं अतिशय महत्त्वाचं असतं. अशा प्रसंगी अधिकाऱ्यांशी समस्येच्या ठिकाणी जाऊन त्यांना मार्गदर्शन (!) करणं किंवा त्यांची कान-उघाडणी करून आपण त्या प्रश्नात लक्ष घालत आहोत हे दाखवणं त्यांच्यासाठी आवश्यक ठरतं. मग फोटो/व्हिडीओ काढले जातात आणि ते “व्हायरल’ केले जातात.या सगळ्या गोष्टींना इंग्रजीत “ऑप्टिक्स’ म्हणजे देखावा असं म्हटलं जातं.
पूर्वी राज्य करणारे राजे असत. तेव्हा त्यांची खुशामत करणं, त्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या पुढे-पुढे करणं हे राजकारणी लोकांचं ध्येय असे. आता हीच कृती वरिष्ठ नेत्यांसाठी केली जात असताना आपण पाहतो. हे सगळं निवडणुकीसाठी “तिकीट’ मिळवणे, कुठल्यातरी महामंडळावर वर्णी लावणे यासाठी केलं जातं. मात्र वरिष्ठ नेताच काही कारणानं पटावरून नाहीसा झाला तर मग त्याला काहीही मोल राहत नाही. त्याच्या जागी आलेल्या नव्या नेत्यासाठी मग हे “उद्योग’ केले जातात.
जिथे सत्ता आणि पैसा असेल तिथे राजकारणी गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे चिकटलेले दिसून येतील. सत्ताबदल/नेताबदल झाला की राजकारणी लोकांचीही दिशा बदललीच म्हणून समजा! सुमारे सोळाशे वर्षांपूर्वी भर्तृहरी यानं राजकारण कसं असतं ते एका सुंदर श्लोकात सांगितलं आहे –
सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या।
नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा।। 47 ।।
याचा अर्थ – कधी सत्य तर कधी असत्य, कधी प्रिय तर कधी अप्रिय बोलणारी तसंच कधी निर्दय तर कधी दयाळू वृत्ती दाखवणारी, कधी लोभात बुडलेली तर कधी दान करणारी तसंच कधी पैसा उडवणारी तर कधी साठवून ठेवणारी (म्हणजेच अतिशय चंचल) राजकारणी लोकांची विविधरूपी वृत्ती एखाद्या गणिकेप्रमाणे असते. पाहा, हजार वर्षांपेक्षाही पूर्वी राजनीतीचं केलेलं वर्णन आजच्या परिस्थितीलाही किती चपखल बसतं ते. असंच काहीसं मजेशीर वर्णन एका फ्रेंच विचारवंतानं केलं आहे. तो म्हणतो – जेव्हा एखादा राजकारणी “होय’ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ “कदाचित’ असा असतो. तो जर “कदाचित’ असं म्हणत असेल तर त्याचा अर्थ “नाही’ असा घ्यायचा आणि तो जर “नाही’ म्हणत असेल तर तो राजकारणीच नव्हे!
अशी राजकारण्यांची खरी ओळख पटल्यावर त्यांच्या कृतींचे खरे अर्थ समजून येतील. अनेक दशकांपासून भिजत असलेले (की ठेवलेले?) प्रश्न आताच का पुढे आले याचं उत्तरही मिळेल.
– श्रीनिवास शारंगपाणी