अनेक वर्षे दहशतीच्या छायेत वावरणारा काश्मीर माणूस आता मोकळा श्वास घेत असल्याचे श्रीनगरमधील गर्दी फुललेल्या रस्त्यांवरून दिसून येते. दहशतवाद्यांकडून होणारा हिंसाचार, दहशतवाद्यांच्या मागावर असणारे सुरक्षा दलाचे जवान, सुरक्षा दलाचे ठिकठिकाणी दिसणारे तपासणी नाके हे 1990 नंतरचे काश्मीर खोऱ्याचे चित्र होते. आता स्थानिक नागरिकांना काश्मीरमधील शांतते विषयी खात्री वाटू लागल्याचेच हे निदर्शक म्हणता येईल.
अनेक वर्षे दहशतीच्या छायेत वावरणारा काश्मिरी माणूस आता मोकळा श्वास घेत असल्याचे श्रीनगरमधील गर्दी फुललेल्या रस्त्यांवरून दिसून येते. गेली तीस वर्षे काश्मीरमधील चित्रपटगृहे बंद होती. आता श्रीनगरमध्ये न्यू आयनॉक्स हे मल्टिप्लेक्स सुरू झाले आहे. हे मल्टिप्लेक्स गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. या गर्दीत तरुण स्त्री-पुरुषांची संख्या मोठी होती. कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी आलेली मंडळी मोठ्या संख्येने दिसत होती. वरवर पाहता ही गोष्ट किरकोळ वाटू शकेल. मात्र ज्यांनी काश्मीरमधील दहशतवादाची छाया असलेले जीवन अनुभवले आहे. त्यांना वातावरणातील मोकळेपणा ठसठशीतपणे जाणवतो.
1990 चे दशक काश्मीर खोऱ्याच्या दृष्टीने मोठे भयावह होते. दहशतवाद्यांनी चित्रपटगृहे बंद पाडली, काही चित्रपट शौकिनांना गोळ्या घालून ठार केले. या घटना ज्यांनी अनुभवल्या आहेत त्यांना प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेली चित्रपटगृहे पाहिल्यावर काश्मीर खोरे हळूहळू पूर्वपदावर, शांततेकडे येऊ लागले आहे, असे वाटते आहे. अनेक सामान्य काश्मिरी नागरिकांनी माझ्याशी बोलताना काश्मीर शांत होऊ लागले आहे, अशी भावना व्यक्त केली. दहशतवाद्यांकडून होणारा हिंसाचार, दहशतवाद्यांच्या मागावर असणारे सुरक्षा दलाचे जवान, सुरक्षा दलाचे ठिकठिकाणी दिसणारे तपासणी नाके हे 1990 नंतरचे काश्मीर खोऱ्याचे चित्र होते. आताही सुरक्षा दलाचे जवान काश्मीर खोऱ्यात आढळतात. मात्र त्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. काश्मीर खोऱ्यात प्रवास करताना तेथील सामान्य माणसे कसा मोकळा श्वास घेत आहेत, याचे अनेक अनुभव पाहण्यास मिळाले.
कराटे शिकण्यासाठी वडिलांनी परवानगी द्यावी, यासाठी हट्ट धरून बसलेली 17 वर्षांची मुलगी मला भेटली. या मुलीने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे आणि आता ती आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही भाग घेऊ लागली आहे. तिचे यश पाहून तिच्या वर्गातील मैत्रिणींनी आपल्या कुटुंबियांकडे कराटे शिकण्यासाठी परवानगी देण्यासाठी आग्रह धरला आहे.
दहशतवाद्यांचा वचक कमी होऊ लागल्यामुळे मुली, तरुणी, महिला सावर्जनिक जीवनात मुक्तपणे सहभागी होऊ लागल्या आहेत. अनेक महिलांनी व्यापार, व्यवसायात भाग घेणे सुरू केले आहे. काही महिलांनी राजकारणात प्रवेश केल्याचे दिसून आले. गंदरबाल या शहरात विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा नेता असलेला शीख युवक भेटला. विद्यापीठात ऍथेलेटीक ट्रॅक तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्याने दाखवले. विद्यापीठाच्या मैदानावर आंतरविद्यापीठ फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, खो-खो या स्पर्धांची तयारी चालू होती. मी त्याला खो-खो खेळा विषयी माहिती आहे का? असे विचारल्यावर त्यानी मला शेजारच्या मैदानावर नेले. तेथे दोन महिला संघाचा खो-खो सामना सुरू होता.
अफगाणिस्तामध्ये तालीबान राजवट पुन्हा आल्यानंतर तेथे महिला, तरुणी आणि मुलींवर घालण्यात आलेल्या वेगवेगळ्या निर्बंधाची माहिती देणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानमध्ये दहशतवादामुळे नागरी जीवनावर झालेले विपरीत परिणाम सर्वांना ठाऊक आहेत. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील महिला, तरुणी आणि मुली निर्बंधमुक्त जीवन जगत आहेत.
दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर शाळा, महाविद्यालये बंद पाडली होती, व्यापार, व्यवसायही बंद पाडण्यात आले होते. 30 वर्षे ही स्थिती कायम होती. आता शाळा, महाविद्यालये व्यवस्थित सुरू झाली आहेत.
व्यापार-उदीमही सुरू झाल्याने सर्वसामान्य माणूस समाधानी दिसतो आहे. दहशतवादामुळे काश्मीरमधील तरुण पिढीचे मोठे नुकसान झाले. आता तेथील मुले, तरुण, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेण्यास उत्सकुता दाखवत आहेत. आयआयटी, आयएमएम यांसारख्या संस्थांच्या शाखा काश्मीरमध्ये सुरू झाल्या आहेत. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन या ज्ञान शाखांमधील उच्च शिक्षण मिळण्याची सोय काश्मीरमध्ये उपलब्ध झाली आहे.
दहशतवादामुळे काश्मीर खोऱ्यातील पर्यटन व्यवसायावर संक्रांत आली होती. आता केवळ भारतातील नव्हे तर विदेशातील पर्यटकही काश्मीरमध्ये येऊ लागले आहेत. जगप्रसिद्ध दाल लेक येथे अमेरिका, इस्राइल आणि युरोपमधील पर्यटक दिसून येतात. दाल लेकजवळ असणारे मुघल गार्डनही गर्दीने फुलून गेल्याचे चित्र दिसले. केवळ श्रीनगर आणि परिसरात पर्यटक दिसतात असे नसून संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात जाणवते आहे.
गंदरबाल शहराच्या बाहेर डोंगर उताराची खडकाळ जमीन विकत घेऊन तेथे एका तरुण जोडप्याने पर्यावरणपूरक विश्रामगृह सुरू केले आहे. या विश्रामगृहात पर्यटक मोठ्या संख्येने निवासासाठी येत आहेत. या व्यवसायाच्या यशातून प्रेरणा घेत शेजारी फिश फार्म सुरू करण्यात आले. काश्मीरमध्ये नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचाही परिणाम पर्यटन व्यवसायावर झाल्याचे जाणवते आहे.
दहशतवाद्यांचा हिंसाचार कमी झाल्यामुळे व्यापार, व्यवसाय नव्या जोमाने चालू झाले आहेत. श्रीनगर ते जम्मू या महामार्गावर केशराची दुकाने पर्यटकांच्या गर्दीने फुलली होती. पुलवामा येथे क्रिकेट बॅट तयार करणारे कारखाने जोरात सुरु आहेत.
या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. याखेरीज हस्तकला, कारागीर आणि शिल्पकारांनी बनवलेल्या वस्तूंची दुकाने गुलमर्ग रस्त्यावर चांगला व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. स्थानिक कारागीर, शिल्पकारांना व्यवसायासाठी कमी दरात कर्ज देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे. त्याचा फायदा अनेक कलाकार, कारागीर, शिल्पकारांनी घेतल्याचे निदर्शनास आले. काश्मीरच्या ग्रामीण भागात मोठमोठे व्हिला बांधले जात असल्याचेही दिसून आले.
काश्मीरमध्ये होऊ लागलेल्या आर्थिक विकासाचे हे प्रतीक म्हणावे लागेल. आजूबाजूची परिस्थिती अशांत, अनिश्चित असेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो. मात्र जेथे भवतालच्या परिस्थिती बाबत, वातावरणाबाबत मनात शंका नसते, भीती नसते तेथे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली जाते.
या प्रवासात लष्कर-ए-तोएबाचे काम केलेली एक ज्येष्ठ व्यक्ती भेटली. काश्मीरमध्ये हिंदूंकडून मशिदी पाडल्या जात आहेत असे वारंवार मनावर बिंबवल्यामुळे ही व्यक्ती पाकिस्तानातून भारतात घुसली होती. काश्मीरमध्ये आल्यावर त्याला मुस्लीम धर्मीय मशिदींमध्ये निर्भयपणे प्रार्थना करीत असल्याचे चित्र दिसले. आपल्याला खोटे सांगितले गेल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले.
काही वर्षापूर्वीपर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांवर, सुरक्षा दलाच्या वाहनांवर तरुणांकडून, शाळकरी मुलांकडून नेहमीच दगडफेक होत असे. या मुलांना आणि तरुणांना जमात-ए-इस्लामच्या मंडळींकडून दगडफेक करण्यास प्रवृत्त केले जात असे. त्या मुलांच्या आणि तरुणांच्या लक्षात योग्य स्थिती आणून दिल्यानंतर त्यांचे मत परिवर्तन झाल्याची अनेक उदाहरणे काश्मीर खाऱ्यात सापडतील, असे एका वकिलाकडून सांगण्यात आले. बारामुल्ला परिसर दहशतवाद्यांच्या कारवायांसाठी कुप्रसिद्ध होता. अशा बारामुल्ला येथे एका राजकीय सभेला 30 हजारांपेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता. उपस्थित असलेल्या तरुणांमध्ये उत्साह दिसत होता. यावरूनच काश्मीरमधील बदललेल्या वातावरणाची मोठी साक्ष मिळते.
(“कोरा’ या संकेतस्थळावर जिंदाल स्टीलचे माजी व्यवस्थापक यांनी केलेल्या अनुभव कथनाच्या आधारे… )
विक्रमी पर्यटक संख्या
जम्मू-काश्मीरला 2022 मध्ये 1 कोटी 62 लाख एवढ्या विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिली आहे. स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या देश-विदेशी पर्यटकांच्या संख्येचा उच्चांक यावर्षी साधला गेला आहे. काश्मीरमधील सर्व पर्यटन ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने तुडुंब भरल्याचे चित्र यावर्षी सातत्याने दिसू आले. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिकांच्या हस्तकला आदी व्यवसायाला मोठा आधार मिळाला. यावर्षी काश्मीर खोऱ्यात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असल्याचे दिसून आले आहे.