नुकताच बंगळुरात महापूर येऊन गेला. तसं महापुरानं वेढलं जाणं बंगळुराला नवीन नाही पण यावेळचा पूर वेगळा होता. जी बांधकामं अगदी काळजीपूर्वक आणि सुरक्षित ठिकाणी करण्यात आली होती तिथेच म्हणजे उच्चभ्रू अशा उपनगरात नेमका हा पूर येऊन रहिवाशांना त्रस्त आणि पूरग्रस्त करता झाला.
हा फरक नक्कीच विचार करायला लावणारा आहे. नदी, ओढ्याकाठी असलेल्या गरीब वस्तीमध्ये, झोपडपट्टीत पुरानं हाहाकार माजवणं ही नित्याची वार्ता असते पण खास पद्धतीनं बांधलेल्या इमारती आणि बंगले यांच्यावरही अतिवृष्टीनं आपली नजर टाकावी हे विलक्षणच म्हणावं लागेल. अशी बांधकामं पाणी फार काळ साठू शकणार नाही, भूकंपापासून खबरदारी घेतलेली अशी असतात.
गगनचुंबी इमारतींचं आरेखन तर वेगवान वाऱ्यांमुळे इमारत मोठ्या प्रमाणावर कंप पावणार नाही याची काळजी घेऊन केलेलं असतं.
प्राचीन काळी अशा संकटांना दैवी अवकृपेनं झालेला निसर्गाचा कोप समजत असत. त्यांच्या निवारणासाठी पूजापाठ, यज्ञयाग इ. केले जात. आजकाल तर वास्तुशांती, गृहप्रवेश, वास्तुशास्त्रांनुसार रचना हे प्रकार आधीच उरकलेले असतात. अर्थात तरीही संतप्त निसर्ग आपला इंगा दाखवतोच! म्हणजे निसर्गाचा कोप चालूच आहे.
पण हा निसर्गाचा कोप दैवी नाही-निदान काही प्रमाणात मानवनिर्मित आहे असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. आपण ज्याला विकास म्हणतो तो जर अनिर्बंध चालू ठेवला, निसर्गाची तमा न बाळगता केला तर अर्थात् त्याचा कोप होऊ शकतो. आणि नेमकं तेच घडतंय.
पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) या आवश्यक आहेतच. त्याशिवाय माणसांची, मालाची वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत अशी होणार, सर्वांना आवश्यक ते पाणी कुठून मिळणार, अंतर्जालामधून (इंटरनेट) माहिती त्वरित कशी उपलब्ध होणार आणि माणसाचं जीवन आरामदायी कसं होणार? या सुविधांची पूर्तता करताना आपण वसुंधरेच्या तनूवर जखमा करतोय हे आपल्या ध्यानात येत नाही. किंवा कळत असलं तरी वळत नाही हे खरं.
आपल्याला कितीही सुरक्षित ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तरी निसर्गाचा प्रकोप आपल्यापर्यंत पोचतोच पोचतो हे बंगळूरूच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे आणि असे प्रकार यापुढे वाढत जाणार असल्याचे संकेत दिसत आहेत. परीक्षित राजाच्या कथेची इथं आठवण होते. अतिसुरक्षित अशा ठिकाणी राहूनही तक्षकानं त्याच्या भवनात प्रवेश केलाच. निसर्गानं अलीकडील काळात महाल, उत्तुंग इमारती, देवालयं असं कशालाही सोडलं नाही. तो सर्वत्र संहार करीतच राहिला आहे.
शेक्सपिअरच्या एक वचन इथे आठवतं. तो म्हणतो: सेप्टर, लर्निंग, फिजिक मस्ट; ऑल फॉलो धिस अँड कम टु डस्ट! याचा अर्थ मृत्यू राजपद, विद्वान किंवा बलवान् यांच्यात कुठलाही भेद करीत नाही ते सर्व अखेरीस मातीतच मिळून जातात. निसर्गाचंही तसंच आहे. तो कुठलाही भेदभाव करीत नाही आणि त्याला इजा केल्याची सजा तो सर्वांना देत असतो.
आता केवळ भारतानंच नव्हे तर सर्व जगानं निसर्गाच्या कोपाचा विचार करून ठोस पावलं उचलली पाहिजेत. स्थानिक पातळीवर विचार करायचा झाला तर राम नदीसारख्या अनेक नद्या, ओढे, नाले यांचे मार्ग बदलून आणि काही वेळा तर चक्क बुजवून आपण विकास (!) केला आहे. टेकड्यांवर, नद्या-ओढ्यांवर अतिक्रमण करून, त्यांचं सपाटीकरण करून वाहत्या पाण्याला खीळ घातली आहे, वारेमाप वृक्षतोड केली आहे. असं केल्यावर वाहतं पाणी कुठून तरी मार्ग काढणारच, काही ठिकाणी साचून राहणारच.
मोठ्या प्रमाणावर वृक्ष नष्ट केल्यावर वातावरणावर त्याचा खचित विपरीत परिणाम होणार. यामुळे आपल्याला वाळवंटी प्रदेशात प्रचंड पाऊस, पावसाळी प्रदेशात शुष्कता, इतर ठिकाणी अवकाळी पाऊस अशी दृश्यं पाहावयास मिळत आहेत. आणि भय हे आहे की निसर्ग भविष्यात याहीपेक्षा रौद्र स्वरूप धारण करू शकेल. अमर्याद आणि प्रचंड विकासकामांमुळे किंवा डोंगर भुईसपाट केल्यानं भूगर्भावरही ताण पडून भीषण भूकंप होऊ शकतात, मोठी उलथापालथ होऊ शकते. तेव्हा निसर्गाचा कोप होऊ द्यायचा नसेल तर विचार नव्हे-कृती करायला हवी. याच क्षणी!
– श्रीनिवास शारंगपाणी