रुप, रस, स्पर्श या संवेदना तृप्त झाल्या; आता जरा दूर-आणखी दूर कडुनिंबाच्या झाडावरून वारा येईल, अशा जागी थांबून अनुभवा; जगातली लाखो अत्तरं ज्याच्यावर कुर्बान करावीत, असा एका मंद-मधुर, अनवट सुगंध… एका झाडातून एवढ्या प्रचंड प्रमाणात सुगंधाची निर्मिती करेल, असं दुसरं कोणतंही झाड नाही. फुलांनो, झालोय मी बेभान, उन्मत्त. आपले दोन्ही बाहू पसरून निमंत्रित करतोय तुम्हाला. या, ऋतुराज वसंत दाखल झाले आहेत. आता तुम्ही वेळ नका लावू! मी कोण आहे विचारता? सांगू?
मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे
ओ। हो।! या। या, मि. नागकेशर. नागचाफा तुम्हालाच म्हणतात ना? तुमचं शास्त्रीय नाव मेसुआ फेरिया आहे. होय ना? अहो, तुम्हाला कल्पना आहे का- रंग-रूप आणि गंध या दोन्ही निकषांवर भारतातलं सर्वांत सुंदर फुलझाड तुम्ही आहात! तुमची पांढरी सुवासिक फुलं पाहणाऱ्याला वेड लावतात. तुमच्या फुलांच्या मध्यभागी जो पिवळ्या पुष्केसराचा गुच्छ असतो ना, त्यामुळं तुमचं सौंदर्य अनुपम झालं आहे. तुमची कोवळी पालवी वरच्या अंगाला गर्द किरमिजी आणि खालच्या अंगाकडून चंदेरी शुभ्र असते. तुम्हाला खास भारतीय वृक्ष म्हणून गौरविताना आम्हाला धन्य वाटते. एखाद्या फुलाला मानपत्र द्यायची वेळ आली, तर हा छोटा लेखक निश्चितपणे तुम्हाला देईल. विल्यम जोन्स हे नाव तुम्ही कधी ऐकलंत का? भारतातल्या पहिल्या पिढीतले ते आंग्ल प्राच्यविद्याविशारद.
जोन्सनी भारतीय वनश्री सृष्टीवर विलक्षण प्रेम केलं. बरं का नागकेशरसर, आपल्या पुस्तकात त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, “मी जगातल्या बहुतेक देशांतली उत्तमोत्तम फुले पाहिली. पण आकार, रंग, सौंदर्य आणि सुगंध या चारही बाबतींत नागकेशराच्या फुलांची बरोबरी करील असे फूल मी अद्याप पाहिलेले नाही.’ बघा पुष्पराज, आता आम्हाला आमचे कामधंदे सोडून तुम्हाला शोधत कोकण, बेळगाव, कारवारचा प्रदेश याच महिन्यात पालथा घालावा लागणार. एरवी औषधांत, काळ्या मसाल्यात तुम्ही भेटता ते रसनेच्या भाषेत. जोन्सनना जसे दिसलात, भावलात, तो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे.
“माझ्या गोव्याच्या भूमीत, चाफा पानावीन फुले’ असे बोरकर ज्या चाफ्याविषयी लिहितात, तो खुरचाफा असला पाहिजे. त्यालाच पांढरा चाफा म्हणून संबोधतात. त्याचे झाड खूप वाढते. लांबट पानांना त्यांच्या लांबीइतकी शीर असते. खोड वेडेवाकडे वाढते. अनाग्रही झाड आहे बिचारे. एखादी छोटी फांदी मातीत खुपसून थोडे पाणी दिले की, कुठेही वाढायला लागते. मार्चमध्ये हा “पानावीन’ फुलतो. गोव्यातच काय, कुठल्याही देवळात तो हमखास सापडेल. म्हणून याचे एक नाव “टेम्पल ट्री’ असेही आहे. फ्लुमेरिया ऍक्युटिफोलिया असे त्याचे शास्त्रीय नाव असून, हा मेक्सिकोतून आलेला वृक्ष आता भारतभर आढळतो.
वसंत ऋतूत प्रामुख्याने फुलणारा कवठी चाफा दाट हिरव्या पानांचा सदाहरित वृक्ष आहे. त्याची फुलं पिवळसर पांढऱ्या रंगाची असून फांद्यांच्या टोकाकडे एकेकटी येतात. सगळ्यात सुंदर आणि भारीचा चाफा आहे सोनचाफा. त्याचे फूल एक रुपयाला एक मिळते. मंद पिवळ्यापासून गडद सोनेरी रंगापर्यंत याच्या अनेक छटा आहेत. सोनचाफ्याला आपण ऑगस्ट महिन्यात पुन्हा भेटणार आहोत. भारतीय मनाला चाफ्याचे विलक्षण आकर्षण आहे, एवढे मात्र खरे. म्हणून तर मुलीचं नाव चंपा असतं. आपण माणसांना नाव देऊन फार कमी फुलांचा गौरव करतो, नाही का?
खिरणी या नितांत सुंदर झाडाशी माझे पिढीजात भांडण आहे. जशी आमराई, जांबवाडी असते, तशी खिरणीची प्रचंड संख्येची एकत्रित झाडं जहागिरीचा भाग म्हणून आम्हाला मिळाली होती. पण सहा पिढ्यांपासून आमची वाटणी मिळाली नाही. एरवी मला आमच्या खिरण्यांचा केवढा अभिमान वाटला असता! क्षीर म्हणजे खीर, दुधाची खीर. खिरीसारख्या गोडवा या फळांना असतो आणि ती मार्चमध्ये येतात. ही फळं नाही, पण वाटणीचे दुःख मला दर मार्चमध्ये खायला येतं. जाऊ द्या! खिरणीचं झाड आंबा, बकुळ आणि चिकू या तिन्ही झाडांची एकत्रित आठवण करून देणारं सदाहरित झाड आहे. पावसाळा संपता संपता त्याला फुलं येतात आणि हिवाळ्यात खारकी बोरांसारखी फळं लागतात. सुरुवातीला हिरवी असणारी ही फळं मार्चमध्ये पिवळी होतात, खाण्याजोगी होतात.
जिंतूरला आमच्या वाट्याची खिरणीची झाड आता माझा चिरदाह झाली आहेत. बकुळीची फुलं कुणाला आवडत नाहीत? मार्चमध्ये बकुळ फुलायला लागते. तिची फुलं सुगंधी असून टिकाऊही असतात. फुल वाळतात, पण कुजत नाहीत. वाळलेल्या फुलांनाही गंध येतो. ती ज्या मातीत उभी आहे, तिच्याखालची मातीही गंधवती झालेली असते. या फुलांचा एकंदर देखावा केसाळ असतो, म्हणून संपूर्ण झाडालाच केसरवृक्ष म्हणतात. तिची खाली गळून पडणारी फुलं म्हणजे केवळ केसर आणि केसरकल्पांची मंडले असतात. ती माळा करण्यासाठी सोयीची असतात. बकुळफुलांचा उपयोग मद्य सुगंधी करण्यासाठी प्राचीन काळात करीत असत.
बकुळाच्या प्रदलापासून अत्तर निघते. पावसाळ्यातही बकुळीला फुले येत राहतात. ती वसंत ग्रीष्मातल्यापेक्षा कमी असतात, एवढेच.इंदिरा संतांची “लयवेल्हाळ’ नावाची कविता बकुळीवर आहे. त्या कवितेच्या सुरुवातीला त्यांनी बकुळीसाठी “ओवळी’ हा शब्द वापरला होता. ओवळी हे बकुळीचं कोकणी नाव. जिची फुले ओवायला येतात, ती ओवळी! बकुळीच्या वृक्षाखाली सकाळ-संध्याकाळ मुली फुले वेचतात आणि केळीच्या सोपटाच्या दोऱ्यात ओवून त्यांचे वळेसर’ करतात. ओवळीचा सर याचेच संक्षिप्त रूप वळेसर हे झाले असावे. महाकवी कालिदासाचं सर्वांत आवडतं फूल. त्याच्या पार्वतीच्या कमरेभोवती जी मेखला होती ती सोन्या-चांदीची नव्हती, ती होती बकुळफुलांची. कामदेव मदनाच्या धनुष्याची प्रत्यंचा बकुळफुलांची होती.
सेवाग्रामला महात्मा गांधींनी लावलेला एक पिंपळ आहे, त्याच्या शेजारी कस्तुरबांनी लावलेली बकुळ उभी आहे. शाहीर अमरशेखांनी ‘आपल्या समाधीवर बकुळीचे झाड लावावे’ असे लिहून ठेवले होते. बकुळीबद्दल गो. नी. दां. शी बोलताना त्यांनी बकुळीला हिंदीत ‘मौलश्री’ असे नाव असल्याचे सांगितल्यावर त्या नावाच्या व्यंजनेवर मी बेहद्द खूष झालो.
बकुळीच्या फुलांची नाजूक रचना पाहताना मला तिचं इवलेपण आणि नक्षीदारपणा निसर्गाने जणू सुवर्णकारांसाठी आव्हान म्हणूनच तयार करून ठेवलाय, असे वाटायचे. बायकोला बकुळहार करू शकलो, याचा मला केवढा आनंद झाला! विशेषत: त्याला ‘मॅचिंग’ आणलेली, बकुळपुष्पांची कर्णफुले कसली गोड दिसत होती! खरोखर वनस्पतीसृष्टीतले बकुळीचे अस्तित्व लाजबाब आहे.