काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या पंतप्रधानांविषयी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अनुदार शब्द काढले होते. अर्थातच जगभरातून त्यांची निंदा झाली. गेल्या मार्च महिन्यातील ऑस्कर समारोहात अभिनेता विल स्मिथ यानं सूत्रसंचालक क्रिस रॉक याच्या श्रीमुखात भडकावली. कारण क्रिसनं विलच्या बायकोच्या केशरहित डोक्यावर विनोद केला. पत्नीचा अपमान सहन न होऊन विलनं क्रिसचा भर समारंभात बदला घेतला. आश्चर्य म्हणजे याची शिक्षा विल स्मिथलाच झाली.
माणूस अपमान का करतो? नावडत्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा इतर वैगुण्यावर बोट ठेवून त्या व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं डिवचणं अशी अपमानाची व्याख्या करता येईल. सर्वांनाच जीवनात अपमानाला कधी ना कधी तरी सामोरं जावं लागतं. अर्थात अगदी हलक्या फुलक्या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या अवगुणावर बोट ठेवलं तर ती व्यक्ती कदाचित अपमान मानणारही नाही. मात्र शीघ्रकोपी माणसं सहसा अपमान सहन न करण्याच्या मनस्थितीत असतात. अपमान न गिळता तो करणाऱ्याला लज्जित करता येणं शक्य आहे. शांतपणे अपमानकारी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं की असा परिणाम साधता येतो. जी. के. चेस्टरटन आणि बर्नार्ड शॉ हे दोन विख्यात इंग्रजी लेखक एकमेकांना पाण्यात पाहत असत. एका अतिशय चिंचोळ्या गल्लीत दोघे एकमेकांसमोर आले. चेस्टरटन जाडजूड तर शॉ बारीक. चेस्टरटन म्हणाले, “मी मूर्खांना वाट देत नसतो!’ त्यावर बाजूला होऊन हसत हसत शॉ उत्तरले, “पण मी देत असतो ना!’ चेस्टरटन लज्जित झाले हे सांगणे नको.
महात्मा गांधी इंग्लंडला शिकत असताना पीटर्स नावाचे प्राध्यापक त्यांचा नेहमी अपमान करीत; परंतु गांधीजी शांतपणे बोलून प्रत्युत्तर देत. एकदा गांधीजी त्यांच्या शेजारी जेवायला बसले असता पीटर्स त्यांचा अपमान करीत म्हणाले, “डुक्कर आणि पक्षी एकत्र जेऊ शकत नाहीत.’ गांधीजींनी शांतपणे हसत हसत उत्तर दिलं, “ठीक आहे. मी उडून जातो.’ पीटर्सना मूग गिळून गप्प बसावं लागलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पीटर्सनी त्यांची खोडी काढली आणि विचारलं, समजा, तुमच्या समोर दोन पिशव्या आहेत- एकात धनराशी आहे आणि दुसऱ्यात अक्कल आहे तर तुम्ही कोणती निवडाल? गांधीजी उत्तरले, अर्थात धनराशी! पीटर्स म्हणाले, “कमाल आहे. मी तर अक्कल उचलली असती!’ त्यावर गांधीजी हसत म्हणाले, “बरोबर आहे. ज्याच्याजवळ जे नाही तो तेच उचलणार!’
मी एका कंपनीत काम करीत असताना दुसऱ्या एका अधिकाऱ्याबरोबर केबिन शेअर करीत होतो. माझी बदली झाल्यानं मला ती केबिन सोडावी लागली. त्यावेळी एक उद्दाम अधिकारी माझा अपमान करण्याकरता माझ्या सहाधिकाऱ्याला म्हणाले, “आता तुम्ही केबिन गोमूत्रानं शुद्ध करून घ्या!’ त्यावर मी त्यांना म्हणालो, “तसं कशाला? तुम्हीच इथे “विधी’ करा म्हणजे काम होऊन जाईल!’ तिथेच उभा असलेला एक अधिकारी बावचळून म्हणाला, “म्हणजे?’ त्याला मी स्पष्टीकरण देत म्हणालो, “अहो, संस्कृतमध्ये “गो’ म्हणजे बैल!’ माझा अपमान करणारा खजील होऊन तिथून चालता झाला.
असेच एक उद्दाम, शिवराळ अधिकारी निवृत्त होण्याच्या दिवसापर्यंत हाताखालच्या लोकांचा सतत अपमान करीत. त्यांच्या सेंड-ऑफ समारंभाला मला भाषण करण्यासाठी विनंती करण्यात आली. मी सुरुवात केली, “हे साहेब अतिशय शिवराळ आहेत. ते सदोदित अपमान करतात. ते अगदी खडूस आहेत…’ इथे मी एक पॉझ घेतला. सर्व श्रोते भांबावून गेले आणि एकमेकांकडे पाहात म्हणू लागले, “अरे हा काय बोलतोय?’ मी पुढे बोलू लागलो, “…असं मला सांगण्यात आलं होतं. पण ते काही तसे नाहीत. हां, एखादे वेळी होत असेल त्यांच्याकडून काही तरी. सभेमध्ये मला सामुदायिक “हुश्श’ असा आवाज ऐकू आला. उत्सवमूर्तींना बहुधा पश्चात्तापाची भावना झाली असावी.
चिं. वि. जोशी यांच्या एका विनोदी कथेत हैबतखान पठाण नावाचे एक शालानिरीक्षक पाहणी करण्याकरता शाळेत येताच मुलं गाऊ लागतात, “हैबतखान पठाण पाजी, अहो कितीतरी पाजी, बहुतचि पाजी…’ पठाणसाहेब रागानं लालबुंद होतात तोच मुलं पुढची ओळ गातात, “…पाजी विद्यामृत सकलांना!’
– श्रीनिवास शारंगपाणी