जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आली, तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं! मग ते संकट महिषासुराचं असो किंवा नैसर्गिक आपत्तींचं असो. कधी ती सौम्य रूपात, कधी उग्र रूपात, पण नेहमीच आपल्या भक्तांसाठी धावून आलेली आहे. तिच्या अनुपम रूपाचे गोडवे नेहमीच गायिले गेलेले आहेत. नवरात्रोत्सवात याच आदिशक्तीची आराधना मनोभावे केली जाते. देवीने नऊ दिवस असुरांशी युद्ध केले आणि त्यांच्यावर विजय मिळविला. याचे स्मरण करत आदिशक्तीची 9 रूपात या 9 दिवसांत पूजा केली जाते. पण आदिशक्तीच्या पूजनात दाखवला जाणारा भाव स्त्रियांबाबत का दाखवला जात नाही?
अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या नवरात्रीची सुरुवात होते. भाद्रपद संपलेला असतो. आश्विन महिन्याची सुरुवात असते. यावेळेपासून दिवस अतिशय वेगवान होतात. वातावरणही आल्हादकारक असते. जमन्माता आदिशक्तीचा आणखी एक उत्सवपूर्ण सण म्हणजे नवरात्र! याचा शेवटाचा दिवस हा विजयादशमी अर्थात दसरा होय! देवीने नऊ दिवस असुरांशी युद्ध केले आणि त्यांच्यावर विजय मिळविला. आदिशक्तीची 9 रूपात या 9 दिवसांत पूजा केली जाते. पहिले 3 दिवस महाकाली पूजन, त्यानंतरचे तीन दिवस महालक्ष्मी पूजन शेवटचे 3 दिवस महासरस्वती पूजन केले जाते. पूर्णत: चैतन्यमय आणि सुंदर सुखावह दिवस. या दिवसात निसर्गाचेही विलोभनीय सक्रिय समर्पण. सकाळच्या कोवळ्या सूर्याच्या सोनेरी किरणात उगवलेली पहाट “हरी ओम हिरण्यवर्णाम…’ अशा मंगलमय पवित्र स्वरांनी अधिकच पवित्र होते.
आमच्या घराच्या मागे बंगाली कुटुंब राहते. त्यांच्या घरातून सकाळी आणि सायंकाळी धुपाचा सुगंध, शंखध्वनी वातावरणात भरून राहतो आणि खऱ्या अर्थाने नवरात्र सुरू झाल्याची जाणीव होते. घरोघरी हा सण साजरा केला जातो. तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकामाता, विविध रूपात आदिशक्ती पूजित होते. दुर्गापूजा उत्सव मोठ्या उत्साहाचा असतो. नागपुरात बरीच बंगाली कुटुंबे आहेत. घराजवळच्या बंगाली शाळेच्या प्रांगणात दुर्गादेवी बसते. तिला घडवायला खास कोलकात्यावरून कारागीर येतात. पुजारीही तेथूनच येतो. पंचमीपासून त्यांची पूजा सुरू होते. अतिशय सुंदररित्या त्यांची पूजा असते. विविध रंगांच्या बंगाली साड्यांचे प्रकार यावेळी बघायला मिळतात. शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला देवीमॉंचे विसर्जन होते. यावेळी तो पुजारी एका हातात धुपाचे भांडे आणि दुसऱ्या हातात मोरपीसाचा पंखा घेऊन जे नृत्य करतो ते विलोभनीय असते. बंगाली लोकांचा नवरात्र म्हणजे दुर्गापूजा फार मोठा सण मानला जातो.
महाराष्ट्रात अगदी पारंपरिक पद्धतीने नवरात्र साजरं केलं जातं. नवरात्रीची आधीपासून तयारी करण्यासाठी देवघरासमोर चहूबाजूंनी माती ठेवली जाते. त्याला वेदी असं म्हणतात. त्यामध्ये गहू पेरले जातात. नवरात्रीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून हे गव्हांकुर दिसू लागतात. नवमीपर्यंत चांगले 5 ते 6 इंच वाढतात. दसऱ्याला देवी सीमोल्लंघनाला निघते त्यावेळी खरोखरंच गव्हांकूर दिसू लागतात. अनेकांना त्या गव्हावरून कोणी चालल्याचा भास होतो. या सगळ्या आपल्या धारणा आहेत. मन श्रद्धावान असतं. ते अधिक भावूक बनतं! नऊ दिवस उपवास करणारे भक्तमंडळी असतात. अनेक जण नवरात्रोत्सवाचा उपवास करतात आणि व्रतनियमांचे आचरणसुद्धा करतात. या काळात त्यांची ऊर्जा कुठेच कमी होत नाही. कारण मुळातच हे वातावरण आपली मानसिकता आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा वाढविणारे असते. खरोखरच या काळात आदिशक्तीचा प्रत्यक्ष वावर असल्याचे जाणवते.
श्रद्धा नेहमीच अगम्य असते. तिचा शोध घेत बसू नये, ती आहे, ठेवावी आणि मानावी हेच खरे. देवीच्या नऊ दिवसांत नऊ रंग परिधान करावे असा एक समज (गोड) गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये प्रचलित आहे. अगदी त्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस नसतील तर तो विकत घेतला जातो. ऑफिसला जाताना रस्त्यावर नवरात्र सुंदर सुंदर रेशमी साड्यांमधून जाणवत राहतं! माणसाचं मन असंच असतं. जे आज आहे, जे ताजं आहे ते आपलंसं करायचं आणि येणाऱ्या दिवसाचं स्वागत करायचं. ही वृत्ती स्त्रियांमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवते. अष्टमीला घागरी फुंकण्याचा खेळ खेळला जातो. हाही एक सुंदर प्रकार आहे पूजेचा! यावेळी गायिली जाणारी देवीची गाणी खूपच छान असतात. रात्री 12 वाजेपर्यंत हा जागर असतो. 12 वाजता आरती होऊन, देवीचे विर्सजन केले जाते.
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आली, तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं! देवांनी आणि मानवांनी. मग ते संकट महिषासुराचं असो किंवा नैसर्गिक आपत्तींचं असो. तिच्या अनुपम रूपाचे गोडवे नेहमीच गायिले गेलेले आहेत. कधी ती सौम्य रूपात, कधी उग्र रूपात, पण नेहमीच आपल्या भक्तांसाठी धावून आलेली आहे. तिचे स्त्रीभक्त जेवढे आहेत त्यापेक्षा पुरुषभक्त अधिक भाविक आढळतात. मग नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करून इतर वेळी हे पुरुष स्त्रियांशी वेगळे का वागतात? त्यांची सौहार्दता का दिसून येत नाही?
लहानपणाची एक घटना मला दर नवरात्रात आठवते. आमच्या शेजारी राहणाऱ्या एक काकूच्या अंगात देवीचा संचार होत असे. आरतीला खूप लोक जमत. त्यावेळी काका काकूला अगदी वाकून नमस्कार करत, अगदी भक्तिभावानं. आरती संपल्यावर मात्र जेवण वाढायला उशीर झाला की, त्या देवीस्वरूप काकूंवर वरच्या स्वरात असे ओरडतं की सगळ्या आळीला ऐकू जायचे. शेजारची आजी म्हणायची, “काय हा मेला माणूस! आधी मारे पूजा करतो, नमस्कार करतो. आणि मग… ‘ मी एकदा याचा विरोध करताना, म्हटलं होतं, काकूंनी कायम देवीच म्हणून राहावं! ठसक्यात आजी म्हणाली होती, तू करू शकशील! काय सांगावं तोपर्यंत जमाना बदललेला असेल. पण! अजूनही चित्र बदललंय असं नाही झालं; परंतु बदल निश्चितच झाला आहे.
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ असे म्हटले जाते. याचाच अर्थ ज्याठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते, वंदनीय मानले जाते, जिथे तिच्या मताला किंमत दिली जाते, तिच्या स्वाभिमानाचे रक्षण केले जाते त्या ठिकाणी देव निवास करतात रमतात. याचा मी लावलेला अर्थ असा की, जिथे समाधान आहे, सकारात्मकता आहे, आपला प्रेमभाव आहे, आपला देव तिथे निवास करतो. अशा ठिकाणी आदिशक्तीचे आगमन सौख्यदायक असते. एकाच रथाची दोन चाकं म्हणजे स्त्री-पुरुष. उपमा नेहमीचीच आहे. एकाच रथाची दोन चाकं म्हणजे स्त्री-पुरुष, उपमा नेहमीचीच आहे वाचूून देऊन गुळगुळीत झालेली उपमा. पण सवयीनं तीच आजही ओठावर आली. कारण, या उपमेचे मनावर इतक्या वर्षांपासून ठाणं आहे. कारण, ती अतिशय योग्य उपमा आहे.
रोजच्या जीवनात वाद असले तरी नवरात्रीच्या पूजेमध्ये दोघांची सारखी गरज असते. तेव्हा ही चर्चा-वाद नकोत. सुंदर दिवस आहेत… मनात आदिशक्तीचे स्मरण करावं… मनोभावे तिला नमन करावं, जमल्यास पुढील जीवनात स्त्रीला आदरानं, किमानपक्षी माणूस म्हणून वागवावं. असा निर्धार करावा. देवानं जग निर्माण केलं आणि पुरुष निर्माण केला. तरीही जगाला पूर्णत्व नाही आलं. मग त्यानं पुरुषाच्या अर्ध्या अंगापासून स्त्री निर्माण केली. अशी रूपककथा आहे. म्हणूनच तिला अर्धांगी मानलं जातं. अर्धांग पूर्ण आहे. या पूर्णत्वाची जाणीव जगाला वेळोवेळी मिळाली आहे. याचा योग्य आदर करावा.
– अरुणा सरनाईक