पु. ल. देशपांडे हे साहित्याला पडलेले गोड स्वप्न. पुलंच्या संगीत, गाण्यांचा आस्वाद मागील भागात आपण घेतला आहे. आता या भागात त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बघू.
गायकाकडून नेमके काय हवे आहे, हे त्याच्या गळ्यातून काढून घेईपर्यंत गाणं घोटून घेण्याची चिकाटी असल्याने संख्येने कमी पण कमालीची गोड असे पुलंच्या गाण्यांचे वर्णन करता येईल. आपल्या संगीत साधनेचा उपयोग त्यांनी त्यांच्या वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ, वटवट या एकपात्री प्रयोगांमध्येही अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला दिसतो.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कसं असावं याचं पुलंएवढं दुसरं उदाहरण शोधून सापडणार नाही. गायक, अभिनेता, वादक, लेखक, नाटककार, कवी, वक्ता, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक भूमिकांत पुलंनी अजोड कामगिरी केली. त्यांच्यातील गुणसमुच्चयाचा उपयोग त्यांना या साऱ्या ठिकाणी पुरक ठरला. गायकीचा प्रभाव वादनावर, अभिनयाचा प्रभाव वक्तृत्वावर, लेखकाचा प्रभाव सामाजिक कार्यावर असा परस्परपुरक व्यक्तिमत्त्वातील गुणांचा आयाम कमालीचा विस्तृत करणारा हा प्रवास खऱ्या अर्थाने स्तीमीत करणारा आहे.
पु.लं.चा लेखक म्हणून प्रवास संगीतसाधकापेक्षा अधिक खोलवर झाला.
पु.लं.चे पहिले नाटक आले ते म्हणजे “तुका म्हणे आता’. आपण “नाटक’ हा साहित्यप्रकार उत्तम रितीने हाताळू शकतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुसरे नाटक लिहिले आणि जे सर्वार्थाने पुलंना लोकप्रियतेच्या कळसावर घेऊन गेले, ते म्हणजे “तुझे आहे तुजपाशी’ हे होय. ही दोन नाटके त्यांची स्वतंत्र आहेत. त्यानंतर आलेली अंमलदार, भाग्यवान, सुंदर मी होणार, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, राजा ओयदिपौस, एक झुंज वाऱ्याशी ही त्यांची नाटके भाषांतरे वा रूपांतरे आहेत. अर्थात यातही त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार दिसून येतो.
पु.लं.च्या सांगीतिक आवडीमुळे त्यांच्या गद्यलेखनात अनेक ठिकाणी संगीतविषयक संदर्भ मोठ्या प्रमाणात आलेले दिसतात. उदाहणार्थ, बटाट्याच्या चाळीतील एच. मंगेशराव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संगीतात अडकलेल्या दिसतात. तर “संगीतिका’ हे चाळीतील पूर्ण प्रकरणच यावर लिहिलेले दिसते. पु.लं.चे अनेक जवळचे मित्र गायक-वादक-नट-वा रंगभूमीशी नातं असणारे होते. त्यांच्यावर लिहितांना पु.लं. कमालीचे भावूक झालेले दिसतात. त्याचवेळी आपल्या संगीतविषयक तीव्र जाणीवांचेही मनोज्ञ दर्शन ते शब्दाशब्दातून घडविल्याशिवाय रहात नाही. बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, वसंतराव देशपांडे, केसरबाई केरकर, बेगम अख्तर यांच्यावर लिहितांना त्यांचे शब्द हळवे होतात आणि भावना तिन्ही सप्तकातून फिरतात.
पु.लं.कडे मुख्यत्वे विनोदी लेखक म्हणून मराठी माणूस बघतो. बटाट्याची चाळ, असामी असामी, हसवणूक, खोगीरभरती, नसती उठाठेव, खिल्ली, अघळपघळ, पुरचुंडी, उरलं सुरलं या साऱ्या पुस्तकातून त्यांनी केलेली शब्दांची कमाल असामान्य आहे. त्यांची काही वाणगीदाखल वाक्य याठिकाणी सांगावीशी वाटतात. ते म्हणतात. “माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस ही गेलेली केस नको.’, “मुलगा किंवा मुलगी सरळ वळणाचा किंवा वळणाची कसे असतात मला कळत नाही कारण वळण म्हटलं तर ते सरळ कसं?’
पुलंना एक गृहस्थ नवीन घराचे बांधकाम दाखवित होते. त्यांनी घरी पाडलेल्या वीटांचे वर्णन करण्यासाठी पु.लंच्या हातात त्यांनी बाजारची व घरची आशा दोन्ही विटा दिल्या. पु.लं. लिहितात-पुढले दोन तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन मी त्यांचे बांधकामाचे घर पाहात हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट का म्हणतात ते मला त्यादिवशी कळाले.’ ही अशी शब्दांची करामत.
पु.लं.ची प्रवासवर्णनं हा एक त्यांच्या लेखनशैलीने एका वेगळ्या अंदाजात निर्माण केलेला ऐवज! अपूर्वाई, पूर्वरंग, वंगचित्रे गावे त्यांच्या देशा, मुक्काम शांतीनिकेतन ही सारी पुस्तकं नर्मविनोदी शैलीने पुलंनी रेखाटली आणि वाचकाला खूश केलं. इंग्लंड अमेरिकेसारखे पाश्चात्य देश असो की आपले चीन-जपानसारखे पौर्वात्य पु.लं.नी तेथील संस्कृती, भाषा, खानपान, माणूस आणि मुख्य म्हणजे संगीत या साऱ्यांचा एवढा सुरेख मेळ शब्दांच्या माध्यमातून जमवला आहे की वाचक त्यामध्ये हरवून बसतो.
लंडनच्या ब्रॉडवेवरील नाटकांचे वर्णन, वा तेथील संगीतिका, तेथील साहित्यिकांची शब्दचित्र हे सारं पु.लं. कमालीच्या बारकाईने मांडतात. दुसरीकडे रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतमध्ये बंगाली शिकण्यासाठी गेल्यावर रवींद्र संगीताचे धडे गिरवतात आणि तेथील बाऊल ही लोककला आत्मियतेने अभ्यासतात. भाषेचा गोडवा कसा असतो याची वेगवेगळी उदाहरणे देतांना त्यांच्यातील खेळीया कमालीचा खुललेला दिसतो. म्हणूनच त्यांना उत्तम परफॉर्मर असं म्हटलं गेलंय.
पुलंच्या लेखनात कमालीची सहजता आहे. चालता चालता येणारा विनोद आहे, मध्यमवर्गीय समाजाचे चलतचित्रण आहे, तशीच निवेदनाच्या ओघात अनेक सुभाषितवजा विधानंही येतांना दिसतात. त्यातील काही विधानं सांगाविशी वाटतात. ते म्हणतात, “दारिद्य्र हसण्याला फार भितं’, “घड्याळ हीच खरी मुंबईची मुंबादेवी’, “दौत आणि औत ही जोडीनं नांदली पाहिजे’, “कृषीसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती यांचा संगम झाला पाहिजे’, “अपघाताला गोळा होतं आणि पंचनाम्याला पांगतं ते पब्लिक’, “हाडाचा शेतकरी आणि मातृधर्म पाळणाऱ्या माता यांना सुट्टी नसते.’
पुलंची व्यक्तिचित्रणेही कमालीची गाजली. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे “व्यक्ती आणि वल्ली’ हे होय. यामध्ये प्रत्येक व्यक्ती मराठी मानसात भिणून गेली. साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेले हे पुस्तक पुलंच्या साहित्य निर्मितीतील मैलाचा दगड म्हणावा लागेल. नारायण काय, हरितात्या काय, सखाराम गटणे काय, नामू परीट काय, नाथा कामत काय या साऱ्या व्यक्तीरेखा पुलंनी अजरामर करून ठेवल्या आणि कितीही वेळेस वाचल्यातरी कंटाळा न येणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्याशिवाय गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी ही त्याची व्यक्तीचित्रणात्मक लेखांची पुस्तकेही महत्त्वाची आहेत. संगीत आणि साहित्याचा एवढा उत्तम मिलाफ क्वचितच कुठे सापडू शकेल.
पुलंच्या साऱ्या जीवनप्रवासात पैसा ही गोष्ट नेहमीच दुय्यम राहिली. कमीत कमी गरजांमध्ये जगणारे हे दांम्पत्य लोककल्याणकारी विचारांनी कमालीचे भारलेले होते. लेखनातून एकपात्री प्रयोगातून वा इतर अशाच सन्मान्यजन्य मार्गाने येणारा पैसा योग्य ठिकाणी खर्च करावा असे सतत त्यांना वाटत राही. “”जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी” या तुकोबांच्या सूत्रानुसार त्यांनी पु. ल. देशपांडे फाउंडेशनची स्थापना केली. या प्रतिष्ठानमार्फत उभ्या आयुष्यात सुमारे 95 लक्ष रुपये त्यांनी आनंदवनसारख्या विविध सामाजिक संस्थांना दान स्वरूपात दिले. मराठीतला हा एकमेव असा साहित्यिक असेल, ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकल्याणकारी उपक्रमांना पैसे वाटले.
पुलंची निरीक्षणशक्ती अफाट होती. म्हैस या त्यांच्या गाजलेल्या कथेत ती दिसून येते. पुलं काही काळ मालेगावला होते. काही काळ बेळगावला होते. काही काळ मुंबई, दिल्ली आणि शेवटी पुणे येथे त्यांचे वास्तव्य राहिले. आपल्यातल्या ननवोन्मेषशालिनी प्रतिभेचं पाणी कुठे तुंबायला नको म्हणून ते नेहमी सजग राहिले आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवून ठेवलं.
पुलंनी संगीतावर प्रेम केले, साहित्यावर केले. कवितांवर तर कमालीचे केलं. त्यातून आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर, बा. भ. बोरकरांच्या कवितांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम केले. लोकांवर अफाट प्रेम केलं. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते सारे त्यांना आपले वाटले. म्हणूनच मराठी माणसाचा एक कोपरा सदैव पुलंच्या नावाने व्यापलेला आहे. त्यांनी मोठाल्या साहित्यिक सभा गाजवल्या तशा आणीबाणीच्या काळात राजकीय सभाही गाजवल्या. प्रसंगी राज्यकर्त्यांवर आसूड ओढले. एकीकडे संगीत नाटके केली तर दुसरीकडे बैठकीच्या लावणीचे कार्यक्रम घडवून आणले.
पु.लं.चा हा सारा प्रवास सुरू असताना पद्मश्री, पद्मभूषण, पुण्यभूषण, महाराष्ट्र भूषण, गडकरी पुरस्कार, यासारखे असंख्य मानसन्मान आपोआप त्यांच्याकडे चालत आहे. एक कमालीचं कलासक्त आणि शब्दप्रेम असणारं पु.लं.चं व्यक्तिमत्त्व आपोआप व्यक्तित्वापर्यंत जाऊन पोहचलं. 12 जून 2000 रोजी हा खेळीया अनंतात विलीन झाला. त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली!
(समाप्त)
– डॉ. विनोद गोरवाडकर