एक-एक ओळ तो गात राहतो आणि पोरं त्याच्यामागे त्याचाच सूर धरून कविता म्हणू लागतात. मावळतीच्या सूर्याची लाली नि खोप्याकडं परतणाऱ्या पाखरांच्या चिवचिवाटाच्या जोडीनं ही कविता जास्वंदीसारखी फुलून येते.
उसगाव भाताणे. वसई तालुक्यातलं एक छोटंसं गाव. चारीबाजूला दाट झाडी. दाट झाडीतून वाट काढत जाणारा डांबरी रस्ता. रस्त्यावरून एसटी, मोटारी, गाड्यांची वर्दळ. तिथंच एका संस्थेची शाळा. शाळेत गणवेशातली अनेक मुलं. पण ही मुलं सर्वार्थानं वेगळी. डोंगरदऱ्यांमध्ये राहणारी, वेगवेगळ्या आदिवासी जमातीतली. त्यांच्या कित्येक पिढ्यांना शाळा नावाची गोष्टही माहीत नाही. निम्म्यापेक्षा जास्त मुलं तर त्यांच्या सात पिढ्यांत पहिल्यांदाच शाळेत जाणारी आणि हो त्यांची शाळाही वेगळी, म्हणजे शिकण्याची पद्धत वेगळी. वर्गात अनेक तक्ते लावलेले, कित्येक शैक्षणिक खेळणी लावलेली.
शिक्षकही आहेत पण ते मदतनीसाच्या भूमिकेत. मुलं स्वतः वाचताहेत, लिहिताहेत, अभ्यास करताहेत, शिकताहेत. जॉन ड्युई या शिक्षणतज्ज्ञानं “लर्निंग बाय डुईंग’ असं म्हटलं होतं, त्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी ही शाळा. एकलव्य शाळा तिचं नाव. विद्यार्थ्यानं स्वतःच शिकायचं अशी कल्पना. मुलं अक्षरं ओळखू लागतात, अक्षरं मुलांना ओळखू लागतात, तक्ते मुलांशी खेळू लागतात. त्यातून आकाराला येतं मुलांचं अभ्यासाशी, अक्षर-आकड्यांशी, नि स्वतःशी जुळणारं नवं नातं…
ग्रामीण भागातली एक वीटभट्टी. भट्टी पेटलीये. विटा भाजल्या जाताहेत. त्या भाजणीचा खरपूस गंध हवेत भरून राहिलाय. दुसऱ्या बाजूला काही बाया-माणसं विटा पाडण्याचं काम करताहेत. माती मळली जातीये, साच्यात भरली जातीये, आणि त्यातून एकाच आकाराच्या विटा एकामागं एक रांगेत ठेवल्या जाताहेत… भट्टीत जाण्याची वाट बघत. तिसऱ्या बाजूला लहान पोरं खेळताहेत. कुणी मातीत खेळतंय, कुणी टायरशी खेळतंय, कुणी तुटलेल्या विटांचं घर बनवतंय…इतक्यात एक माणूस येतो. सगळी पोरंसोरं त्याच्या भोवती गोळा होतात. त्या सगळ्यांना घेऊन तो एका भोंग्यात जातो.
आदिवासी भागात वीटभट्टीवर कामगार गवताने साकारलेली तात्पुरती घरं बनवतात, त्यांना भोंगा म्हणतात. तर त्या भोंग्यात सगळी पोरंसोरं जातात आणि सुरू होतो अभ्यास, होय अभ्यास. वेगवेगळे तक्ते, शैक्षणिक खेळणी यांच्याकडं पोरं कुतुहलानं बघतात. एक-दोन दिवस त्यांना काही कळत नाही पण छोट्या-छोट्या रंजक खेळांतून ती त्या माणसाशी, म्हणजे शिक्षकाशी जोडली गेलीत. त्या खेळाच्या, गमतीच्या रंजनाच्या आशेनं रोज दुपारी नि संध्याकाळी तास-दोन तास ही पोरंसोरं या माणसाभोवती गोळा होतात नि त्या तक्ते आणि खेळण्यांशी आपली नवी ओळख करून देतात. पोरांच्या डोळ्यात कुतुहलाच्या जागी अक्षरओळख दिसायला लागते, भट्टीचा गंध विरत जाऊन नव्या आशा-आकांक्षांचा गंध वातावरणात बहरायला लागतो.
गावापासून दूर एक वस्ती. वस्ती कसली लाकडाच्या फळ्या नि कापडाच्या कनातींनी उभारलेले आडोसे, त्यात उघडावाघडा संसार. या वस्तीवरची शाळा. शाळा कसली एका झाडाखाली झाडाच्या मोठाल्या दोन-तीन फांद्यांतनं साकारलेला सापळा नि त्यावर शाकारलेलं गवत. तीन बाजू उघड्याच. एका बाजूला झाडाच्या बुंध्यामुळं तयार झालेला नैसर्गिक आडोसा. एक माणूस, म्हणजे शिक्षक काही तक्ते, चित्र, खेळणी असलेली पेटी उघडतो नि त्या सगळ्यामध्ये पोरं हुरळून जातात. मग हा शिक्षक चिऊताईची एक कविता म्हणतो. एक-एक ओळ तो गात राहतो आणि पोरं त्याच्यामागे त्याचाच सुर धरून कविता म्हणू लागतात. मावळतीच्या सूर्याची लाली नि खोप्याकडं परतणाऱ्या पाखरांच्या चिवचिवाटाच्या जोडीनं ही कविता जास्वंदीसारखी फुलून येते. पाड्यावर पहाटेपासूनच हलचल. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत सगळे मग्न. काही लोकांनी एक जागा झाडून घेतलीये. दुसरे काही लोक पोरांना तयार करताहेत. सात-आठ बायका चुलीवर मोठ्या पातेल्यात मसालेभात शिजवताहेत.
काही जणांची इकडून तिकडे काही सामान आणण्या-नेण्यासाठी लगबग चाललीये. काही लोक स्वच्छ कपडे घालून भिंतीजवळ उभे राहून बघताहेत. पाड्यावरचं आजचं वातावरणच वेगळंय. सगळ्यांनी स्वच्छ आंघोळ करून शक्य तितके स्वच्छ कपडे घालून जमलेत. आयुष्यात पहिल्यांदा नवं काहीतरी करत असल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. पोरं तर नुसती हरखून गेलीत. शिक्षक आले, झेंडावंदन झालं, राष्ट्रगीत झालं. मग सुरू झाले सांस्कृतिक कार्यक्रम. एका पोरानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं काहीतरी बोलून दाखवलं. दुसऱ्यानं गांधीजींविषयी काही सांगितलं. देशभक्तीच्या एका गाण्यावर नाचही झाला. त्यानंतर आधी पोरासोरांची नंतर बाप्यांची आणि नंतर बायांची पंगत बसली. सगळ्यांनी पुनः पुन्हा घेऊन मसाले भात खाल्ला. पाड्यावर नवं काहीतरी घडत होतं. दारात बांधलेल्या बकऱ्या, झाडावरची पाखरं, झाडं नि आभाळही त्या सगळ्या सोहळ्याकडं कुतुहलानं बघत होतं.
आदिवासी भागातल्या अनेक वाड्या, वस्त्या, पाड्यांवर राहणाऱ्या लाखो कुटुंबांपर्यंत शिक्षण पोचलंच नव्हतं. पोरांना शिकवायचं कशासाठी? त्यापेक्षा पोरांना सोबत वीटभट्टीवर नेलं तर त्याच्या कामातून दोन पैसे हाताशी येतात. तेवढाच फाटक्या संसाराला हातभार. बरं शाळा जवळ नाहीच. पोराला शाळेत घालायचं म्हणजे त्याला सायकलवरून शाळेत ने आणि तिथं थांबून त्याला परत घेऊन ये यात एका माणसाचा अख्खा दिवस आणि रोजगारच जाणार. त्याच्यावर उपाय काय? बरं जेव्हा शाळामास्तर, संस्थेची माणसं यांनी समजावून पोराला शाळेत घालायची इच्छा झाली तर त्याचं वय पुढं गेलेलं. आठ वर्षांचा मुलगा पहिलीच्या वर्गात बसवला तरी तो सगळ्यात थोराड दिसणार. त्याची त्यालाच तिथं लाज वाटणार आणि अक्षरओळख नसल्यामुळं ढ विद्यार्थी म्हणून त्याची शाळेत ओळख होणार. एवढं सगळं करण्यापेक्षा त्याला वीटभट्टीवरच नेलेलं बरं, असं मानणारी असंख्य कुटुंबं होती. त्यातलीच मुठभर का होईना, या अशा शाळा नि शिक्षकांमुळं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागलीत.
वाडी, वस्ती, पाडा, पालांमधल्या माणसांची मनं आता बदलू लागलीयेत. आपण चार-दोन तास जास्त मेहनत करू पण आपल्या पोरांना चार बुकं शिकवू ही भावना वाढीला लागलीये. पोरांच्या हातात विटांची माती नि साचे की वही-पेन्सिल यातली योग्य निवड करायला ही मंडळी आता शिकलीयेत. पोरं पालावर का होईना शाळा म्हणून जे काही आहे तिथं जाताहेत, तक्ते-अक्षरं-आकडे यांच्याशी मैत्री करून घेताहेत, धडपडताहेत-चुकताहेत पण काहीही करून काही ना काही शिकताहेत. माणसाला माणूस म्हणून वेगळं ठरवणाऱ्या बुद्धीची जाणीव झाली की प्राण्यापेक्षा स्वतःचं वेगळं अस्तित्त्व साकारण्याची गोडी त्याला लागते. अशीच गोडी ह्या वाडी, वस्ती, पाड्यावरच्या पोरांना लागलीये. माणसाचं जीवन म्हणजे अखेर एक अविरत अध्ययनयात्राच तर आहे. त्याच निखळ अध्ययनाचा स्पर्श या पोरांना होऊ लागलाय हे केवढं आश्वासक आहे नाही?
– डॉ. भालचंद्र सुपेकर