भारतीय क्रिकेट संघात निवड होण्यासाठी निश्चित करण्यात आलेले निकष नक्की काय आहेत, असाच आता प्रश्न पडू लागला आहे. देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा करत असलेल्या किंवा गोलंदाजीत चमक दाखवत असलेल्या खेळाडूंना डावलून वशिल्याचे तट्टू निवडले जातात हे तर उघडपणे दिसत आहे. मुळातच या संपूर्ण बाबतीत जो पारदर्शीपणा यायला हवा तो दिसत नाही. बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी सरळमार्गी स्वभावाचे असल्याचे बोलले जाते मग ते तरी संघ निवडीचे निकष सांगतील का?
रणजी स्पर्धा ही आपली सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपली गुणवत्ता व कामगिरी सिद्ध केल्यावरच पूर्वी भारतीय संघातील निवड निश्चित होत होती. आता या स्पर्धेची रया तर पार गेलीच आहे परंतु आयपीएल स्पर्धेत 12 ते 14 चेंडूत अर्धशतक करणारा खेळाडू देखिल कसोटी संघात दिसतो याला काय म्हणायचे. विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी सध्याच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासह सर्व सदस्यांवर आगपाखड केली आहे. मुंबईचा फलंदाज सर्फराज खान याने खोऱ्याने धावा करूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ निवडीत त्याचा विचार झाला नाही. मग त्याने आता आणखी काय करायचे म्हणजे त्याची निवड होईल. शर्मा यांच्याकडे तरी याचे उत्तर आहे का, हाच प्रश्न आहे.
संघात मॅचफिट किंवा स्लीम ट्रीम खेळाडूंना संधी दिली जाते असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका महान सदस्याने सांगितले होते. हा काय फॅशन शो आहे का स्लीम ट्रीम म्हणायला. सर्फराज खान थोडा स्थूल आहे पण जर तो रणजी, विजय हजारे, मुश्ताक अली या सगळ्याच स्पर्धांतील सामने खेळतो, कोणतीही दुखापत न होता व एकदाही विश्रांती न घेता मग तो मॅचफिट नव्हे का. यो-यो चाचणी ही क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचा निकष कसा काय असू शकते हेच मुळात कोडे आहे. फुटबॉल किंवा मैदानी स्पर्धेसाठी हा निकष असतो पण क्रिकेटमध्ये तुम्ही एकदिवसीय सामन्यात 50, कसोटीत 90 तर टी-20मध्ये 20 षटके पूर्ण खेळत असाल तर त्याला मॅचफिटच समजले गेले पाहिजे.
निकषाची स्पर्धा कोणती
विक्रमादीत्य सुनील गावसकरांपासून सचिन तेंडुलकरपर्यंत तर रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत सगळेच खेळाडू रणजी स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीने संघात निवडले गेले. नंतर आयपीएल स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना सुगीचे दिवस आले व त्यातील कामगिरीच्या आधारे टी-20 किंवा एकदिवसीय संघाची निवड होऊ लागली. पण मग जर असे असेल तर कसोटी संघात हार्दिक पंड्या, इशान किशनच नव्हे तर कोहली व रोहित कसे काय निवडले जातात. कारण हे फलंदाज तर आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखले जातात. त्रिशतक करणारा करुण नायर याच्याकडे चक्क डोळेझाक केली जाते व यंदाच्या रणजी स्पर्धेत धावांचा व शतकांचा रतिब घालत असलेल्या सर्फराज खानवरही अन्यायच होत आहे. भारतात सर्वात मानाची समजली जात असलेली स्पर्धा म्हणजे रणजी करंडक. यातील कामगिरी ग्राह्य धरली जाऊनच पूर्वी संघ निवड केली जात होती.
आता निकष लावले जातात की वशिला हाच प्रश्न आहे. लोकेश राहुल, पंड्या, ऋषभ पंत हे कसोटी संघात कसे असे विचारल्यावर ते कामगिरी करतात असे उत्तर एकदा एका निवड समितीच्या सदस्याने दिले होते. मग वारंवार अपयशी ठरून किंवा सातत्याने बेजबाबदार फलंदाजी केल्यावरही राहुल व पंतचे संघातील स्थान टिकते कसे. अजिंक्य रहाणे अपयशी ठरला म्हणून त्याला कसोटी संघातून वगळले. मग कोहलीने 3 वर्षे व रोहितने गेली दोन वर्षे असे काय दिवे लावले की त्यांचे संघातील स्थान टिकले. कोहलीने आणि रोहितने यंदाच्या मौसमात शतकी खेळी केली. पण केवळ कर्णधार आहे म्हणून रोहितला जावयाचा मान दिला जातो का? एकदा बीसीसीआयने निवड समितीला आमने सामने बसवून माध्यमांशी संपर्क करत संघ निवडीचे निकष जाहीर करावेत म्हणजे “दाल में कुछ काला है की संपूर्ण दालच काली आहे’ ते समजेल.
आक्रमक फलंदाज कसोटी संघात कसे?
बिग मॅच चोकर्स असे संबोधले जात असलेले काही खेळाडू भारतीय संघात सातत्याने दिसतात. पूर्वी रोहित व कोहली एकहाती सामना जिंकून देत होते. कोहली पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर आला आहे पण रोहित अद्यापही काहिसा गोंधळलेला दिसतो. तब्बल 50 डावांनंतर त्याचे शतक झालेले आहे. पूर्वी विक्रमादीत्य गावसकरही अपयशी ठरल्यावर त्यांचे संघातील स्थान कायम राहायचे पण गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर यांचे संघातील स्थान निश्चित नसायचे. गावसकरांनी आता चेतन शर्मांवर टीका केली ती रास्त आहे; पण ते स्वतः संघात असताना असे कितीतरी खेळाडू होते की, जे केवळ वशिल्याच्या जोरावरच संघात आले होते.
अहो, सचिन तेंडुलकरसह एकदा सुजीत सोमसुंदर सलामीवीर म्हणून संघात आला होता. काय वाटले असेल सचिनला. मधूबालासह भारत भूषण हिरो म्हणून एका चित्रपटात चमकल्यावर मधूबालाची जी अवस्था झाली असेल तीच सचिनचीही झाली असेल. भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदिम, इशान किशन, सूर्यकुमार यादव हे कसोटी संघात कसे. मुरली विजय, सर्फराज खान, अंकित बावणे, शम्स मुलाणी यांच्यासह असे कितीतरी खेळाडू आहेत की जे संधी मिळाली तर कसोटी संघातील स्थान बळकट करतील. पण त्यांना संधी देणार कोण, हा प्रश्न आहे. कसोटी संघ व एकदिवसीय किंवा टी-20 चा संघ भिन्न दिसलाच पाहिजे. जे 12-14 चेंडूत अर्धशतक करतात ते फलंदाज सामना वाचवू शकत नाहीत. तिथे चेतेश्वर पुजारासारखेच फलंदाज हवेत जे दिवसभर फलंदाजी करू शकतात. मागे एकदा एक माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला होता, की तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर संघात सचिन हवा; पण सामना वाचवायचा असेल तर राहुल द्रविडला पर्याय नाही. तो खरे बोलला आजही द्रविडला पर्याय सापडलेला नाही.
देशांतर्गत स्पर्धेला प्रेक्षक हवा
रणजी करंडक स्पर्धा एकेकाळी देशात सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट स्पर्धा होती. चंदू बोर्डे यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही भिंतीवर बसून किंवा वृक्षाचा आधार घेत या स्पर्धेचे सामने पाहिले आहेत. त्यातूनच प्रेरणा घेत ते देखिल महान क्रिकेटपटू बनले मात्र, आताचे चित्र पाहिले की वाईट वाटते. ज्या स्पर्धेने देशालाच नव्हे तर जगाला कितीतरी महान क्रिकेटपटू दिले त्या स्पर्धेने आपली ओळखच गमावली आहे. या स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक शोधावे लागत आहेत या सारखी दुसरी शोकांतिका नाही. शालेय विद्यार्थांना या स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी तसेच प्रत्यक्ष कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानात मोफत प्रवेश दिला पाहिजे, अशी सूचना एकदा सचिन तेंडुलकरने केली होती. त्याची खरोखर अंमलबजावणी झाली पाहिजे. पूर्वी शाळा बुडवून आपण सामने पाहायला जायचो आता सामने न पाहता अन्यत्र जाणारी पिढी पुन्हा क्रिकेटकडे वळवणे सोपे नसले तरीही अशक्य नाही. याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे.
स्टारवर बंधन हवे
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सगळेच सामने खेळणे स्टार खेळाडूंना आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे शक्य नसते. मात्र, देशांतर्गत स्पर्धेकडे प्रेक्षकांना परत आणायचे असेल तर अशा काही स्टार खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेतील काही सामने खेळण्याचे बंधन असावे. सचिन तेंडुलकरही आंतरराष्ट्रीय स्टार झालेला असताना अनेकदा रणजी करंडक खेळताना दिसला आहे मग रोहित व कोहली का खेळत नाहीत. ज्या प्राथमिक क्रिकेटनेच त्यांना स्टारपद दिले त्याच स्पर्धेत खेळल्याने त्यांचे स्टारपद जाणार नाही. फळ कितीही गोजीरवाणे असले तरी वृक्षाचे महत्त्व कमी होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. असो, बीसीसीआय येत्या काळात संघ निवडीचे स्पर्धांचे, खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याचे निकष व बंधन जाहीर करणार का, हा मोठा प्रश्न आहे. संघ निवडीत पारदर्शकता आणणे हेच बीसीसीआयच्या पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे प्राधान्य हवे हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे