पाकिस्तान क्रिकेट मंडळासमोरच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर बीसीसीआयकडे डोळे वटारून पाहणारे त्यांचे मडळ आता “दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती अनुभवत आहे. आधीच संकटे कमी होती की काय म्हणून आता त्यांचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यामुळेच आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे त्यांना मिळालेले यजमानपदही आता हातचे जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळ सातत्याने बीसीसीआयला पाण्यात पाहात आले आहे. बीसीसीआयची श्रीमंती व जागतिक क्रिकेटवरील वर्चस्व त्यांना सातत्याने खुपते. मात्र, बीसीसीआयच्या सचिव पदावर असलेल्या जय शहा यांनीच पाकिस्तानला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळवून दिले. मात्र, आता ताज्या घडामोडींनंतर या स्पर्धेचे यजमानपद त्यांच्या हातातून जाणार असून अमिराती किंवा चक्क भारतातच ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.
मागे श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी खेळाडूंच्या बसवरच दहशतवादी हल्ला झाला होता. श्रीलंकेचे खेळाडू केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले होते. मात्र, त्यानंतर कित्येक वर्षे जगभरातील कोणताही संघ पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेटची मालिका खेळण्यास तयार नव्हता. त्यांच्या यजमानपदात होत असलेल्या स्पर्धाही हातातून गेल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांचेच देशांतर्गत क्रिकेट व पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या सामन्यांवरही गंडांतर आले होते.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा जवळपास दोन दशकांनंतर केला. मात्र, त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये असताना त्यांच्या खेळाडूंवरही दहशतवादी हल्ला होईल असे सामना सुरू होण्यापूर्वी काही तास सांगण्यात आले व न्यूझीलंडच्या संघाने ही मालिका रद्द करत मायदेशी प्रयाण केले. ही सगळी उदाहरणे देण्याचे कारण म्हणजे इतके सगळे होऊनही आपल्या देशातील ही असुरक्षेची परिस्थिती कशी बदलेल याकडे ना त्यांचे राजकीय नेते लक्ष घालत आहेत ना त्यांच्या देशावर अलिखित सत्ता गाजवणारी आयएसआय.
आशिया करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असे जेव्हा जाहीर झाले तेव्हापासूनच बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार नसल्याचीच भूमिका घेतली होती. तसेच दोन्ही देशांती सध्याची राजकीय परिस्थिती पाहता केवळ भारतातील केंद्र सरकारच संघाला परवानगी देऊ किंवा नाकारू शकतात.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रमीज राजा यांनी सातत्याने बीसीसीआयविरोधी मते मांडली व तोंडाची हवा वाया घालवली. आता इम्रान यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला पुन्हा एकदा पाकिस्तानातील क्रिकेटच्या मुळावर येणार आहे.
सध्या त्यांच्याकडे आयर्लंडचा महिला संघ एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. या दोन संघात प्रत्येकी तीन सामने खेळवण्यात येणार होते. मात्र, आता ही मालिका होणार का आयर्लंडचा संघ मायदेशी परतणार हे लवकरच स्पष्ट होइल. परिस्थिती सुधारत असली की नेमके काहीतरी अघटीत घडते व पाकिस्तानमधील क्रिकेट जिथे होते तिथेच येऊन थांबते.
आता येत्या आठवड्यात आशिया करंडक क्रिकेट समितीची बैठक होण्याचे संकेत मिळत असून त्यात पाकिस्तानमधील परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे. पण ही परिस्थिती गेल्या जवळपास दोन दशकांत बदललेली दिसलेली नाही कारण त्यांच्या राज्यकर्त्यांनाच देशात शांतता नांदणे नको झालेले असते. त्यांना आपल्याच देशाचे सामने अन्य देशांत आयोजित करुन खेळावे लागतात यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी काय असू शकते.
पाक मंडळावर राजा यांची नियुक्ती व बीसीसीआयवर सौरव गांगुली आणि जय शहा यांची नियुक्ती झाल्यावर किमान त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची मालिका होण्याची शक्यता बळावली होती. तसेच भारतात पुढील वर्षी होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीही पाकिस्तानचा संघ भारतात येण्याचेही संकेत मिळाले होते.
मात्र, इम्रान यांच्यावर झालेला हल्ला पुन्हा एकदा केवळ पाकिस्तानला एक देश म्हणूनच नव्हे तर क्रिकेटमधील गुणवान संघ म्हणूनही ओळख पुसणारा ठरणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आजच्या घडीला इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेपेक्षाही जास्त टीआरपी भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना असतो हे कोणीही नाकरणार नाही. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही ते दिसून आले. मग जर आता त्यांना त्यांच्या देशातील क्रिकेट रुळावर आणायचे असेल किंवा परदेशी संघांनी त्यांच्या देशात मालिका खेळावी आणि देशांतर्गत क्रिकेटलाही चालना मिळावी असे वाटत असेल तर बाहेरचा कोणी पुढे येऊन त्यांना सावरणार नाही तर त्यांचे त्यांनाच सावरावे लागणार आहे.
आधीच आर्थिक कोंडी, राजकीय अराजकता श्रीलंकेच्या धर्तीवर वाढत चाललेली महागाई आणि देशात ठप्प झालेले क्रिकेट या अडचणी सोडवण्यासाठी काही पाऊले टाकण्यास सुरुवात झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाची स्थिती पुन्हा एकदा दुष्काळात तेरावा महिना अशीच बनली आहे. ज्या स्पर्धांचे यजमानपद त्यांना मिळाले होते किंवा भविष्यात मिळणार होते त्यातून मिळणारा प्रचंड पैसाही आता त्यांच्या हातून जाणार असून हा तोटा त्यांच्या देशातील क्रिकेटचे अतोनात नुकसान करणारा ठरणार आहे. बघू आता येत्या काळात तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळ, त्यांचे राज्यकर्ते यांना या सर्व गोष्टींचे आकलन होणार का?
अमित डोंगरे