राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टी-20 क्रिकेटचा समावेश झाला आणि लगेचच आयसीसी याच प्रकारच्या सामन्यांच्या ऑलिम्पिक प्रवेशाचीही तयारी करू लागली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्हे तर त्यानंतर 2028 साली लॉस एंजलीसला किंवा 2032 साली ब्रिस्बेनला होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी सध्या तरी वारे वाहू लागले आहेत.
मागे 1998 साली क्वालालंपूरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश झाला होता. मात्र, त्यानंतर या खेळाला बाहेर पडावे लागले. आता यंदा 2022 साली या खेळाला पुन्हा एकदा स्पर्धेचा भाग बनवण्यात आले. मात्र, यंदा केवळ महिलांच्या टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्याला यशही मिळत आहे यात शंका नाही. त्यामुळे यंदाची स्पर्धा आगामी काळातील ऑलिम्पिक प्रवेशाची नांदी ठरणार असेच चित्र सध्या दिसत आहे.
खरेतर ज्या देशाने क्रिकेटच्या खेळाला जन्माला घातले त्यांनीच आजवर या खेळाला या स्पर्धेबाहेर कसे काय ठेवले हाच मोठा प्रश्न होता मात्र, कंटाळवाणे होत चाललेले कसोटी क्रिकेट या खेळाचा भाग होऊच शकले नसते. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटचाही विचार केला गेला मात्र, हे सामनेही जवळपास सात तास चालतात त्यामुळे हा विचारही बाजूला पडला.
जेव्हा टी-20 क्रिकेटचा उदय झाला तेव्हापासून आयसीसीने या खेळाच्या राष्ट्रकुल तसेच ऑलिम्पिक प्रवेशाची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. राष्ट्रकुलचा 1998 सालचा अनुभव काहीसा कटू होता व त्यामुळेच एकदिवसीय सामन्यांचा या स्पर्धांमध्ये समावेश होऊ शकत नाही हे देखिल सिद्ध झाले होते. मात्र, आता टी-20 क्रिकेट साधारणपणे तीन ते साडेतीन तासांत संपते म्हणजेच अत्यंत कमी वेळात सामने होतील, त्याचे निकालही लागतील व त्याला प्रेक्षकांचा पाठिंबाही चांगला मिळेल हे लक्षात घेत यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत त्याचा समावेश महिला क्रिकेटच्या रूपाने मर्यादित कक्षेतच केला गेला आहे.
येत्या काळात पुरुषांच्या टी-20 क्रिकेटचेही पदार्पण होणार हे दिसतच आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार का, ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या पुढील काही बैठकांमध्ये समजेलच. परंतु राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या क्रिकेटला लाभत असलेली लोकप्रियता पाहता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा हा टी-20 प्रकार लोकप्रिय होऊ शकतो याचे संकेत मिळत आहेत.
शेवटी काय आयसीसी काय किंवा ऑलिम्पिक समिती काय सगळ्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हवीच असते. आयसीसीच्या संपूर्ण सदस्य असलेल्या प्रमुख आठ देशांतच ही स्पर्धा घ्यावी तसेच या सर्व संघांचे सर्व प्रमुख खेळाडू यात खेळावेत अशी काही बंधने घातली तरच ऑलिम्पिकच्या क्रिकेटला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळेल.
पुढील तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस एंजलीस व ब्रिस्बेन येथे होणार आहेत. पॅरिसला जर क्रिकेटचा समावेश करायचा झाला तर मैदाने उभारण्यापासून तयारी करावी लागेल. मात्र, हातात असलेला कालावधी पाहता ते शक्य नाही. त्यामुळे आयसीसी देखील सर्व संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांशी तसेच ऑलिम्पिक समितीशी 2028 (लॉस एंजीलस) व ब्रिस्बेन (2032) या स्पर्धांसाठी चर्चा करणार आहे. यातील लॉस एंजीलसमध्ये काही मैदाने क्रिकेटसाठी तयार झाली आहेतच येत्या काळात अमेरिकेतही क्रिकेटला लोकप्रीयता मिळू लागल्याने तसेच येत्या काळात तीथे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याने 2028 साली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. हे घडले नाही तर ब्रिस्बेनला 2032 साली हे शक्य होऊ शकते.
मुळातच ऑस्ट्रेलियात मुळ खेळ क्रिकेटचाच असल्याने याच साली ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पदार्पण व्हावे यासाठी सध्या फिल्डिंग लावली जात आहे. पाहू या काय होते ते. जागतिक क्रीडा क्षेत्रात एका बाजूला संस्थान बनलेल्या क्रिकेटचे वारे ऑलिम्पिक स्पर्धेतही वाहू लागले आहेत असेच वातावरण सध्या दिसत आहे हे मात्र, कोणीही नाकारणार नाही.
अमित डोंगरे