संतूर या मूळच्या काश्मीरमधील लोकवाद्याला केवळ देशभरात नव्हे तर जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणारे प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे. त्यांच्याकडे संतूर शिकण्याची संधी मिळाली, याबाबत मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. पंडितजी हे श्रेष्ठ गुरू होते. त्याचबरोबर ते एक फिलॉसॉफर होते. त्यांची मूळची बांधणी अध्यात्मिक होती.
जगप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एक तारा निखळला आहे. पंडितजींचा जन्म काश्मीरमध्ये झाला. संतूर हे वाद्यही मूळचं काश्मीरचं लोकवाद्य. परंतु शास्त्रीय संगीतात आणि चित्रपट संगीतामध्ये या वाद्याला आणण्याचं सर्व श्रेय पंडित शिवकुमार शर्मा यांना जातं. संतूर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार मानले जातात. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच उमा दत्त शर्मा यांनी या वाद्याशी त्यांची ओळख करून दिली. तेच त्यांचे गुरू. परंतु शिवजींनी त्यामध्ये नवनवीन सुधारणा करून या लोकवाद्याला शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वाद्य म्हणून स्थान मिळवून दिले. यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. वयाच्या 13 व्या वर्षांपासून शिवजींनी संतूर शिकण्यास प्रारंभ केला होता.
माझी आणि त्यांची भेट बऱ्याच वर्षांपूर्वी झाली. मी एक संतूर बनवून त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. ते पाहून त्यांनी माझं खूप कौतुक केलं. त्यानंतर त्यांचे शिष्य रतनलाल यांच्याकडे त्यांनी मला संतूर शिकण्यासाठी पाठवले. जवळपास चार वर्षे मी त्यांच्याकडे संतूर शिक्षणाचे धडे गिरवले. पुढे शिवजींनी स्वतः त्यांच्याकडे मला शिकवण्यासाठी बोलावून घेतले. माझ्यासाठी ही बाब खूप मोठी भाग्याची होती. त्यावेळी पंडितजींच्या कारकीर्दीतील सर्वोच्च बिंदू होता. देशभरात त्यांचे संतूरवादनाचे सतत कार्यक्रम असायचे. त्यामुळे ते नेहमी व्यस्त असत. अशा काळात मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली.पूर्वीच्या गुरूकुल पद्धतीप्रमाणे माझं संतूर शिक्षण पार पडलं.
पं. शिवकुमार यांच्यासारखा गुरू लाभणं ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट म्हणावी लागेल. गुरू म्हणून ते अत्युत्कृष्ट होते. त्याकाळात मी पुण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होतो. ते सांभाळून शनिवार-रविवार त्यांच्याकडे शिकायला जायचो. वेळेच्या उपलब्धतेनुसार ते मला फोन करून बोलावून घेत असत. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे गुरूंकडे एकेक राग अनेक वर्षे शिकायचे; तशाच प्रकारे माझंही शिक्षण सखोलपणानं पार पडलं. मी त्यांच्याकडे चार ते पाचच रागांचं शिक्षण घेतलं; पण शिवजींनी अत्यंत विस्तृतपणानं, बारकाव्यांनिशी आणि तितकंच आत्मियतेनं, तन्मयतेनं शिकवल्यामुळे बाकीचे राग वाजवणं मला अवघड गेलं नाही.
बहुतेकदा ते गाऊन दाखवायचे आणि मी वाजवायचो; पण कधी तरी ते स्वतः संतूर घेऊन बसायचे. केवळ मलाच नव्हे माझ्या समकालीन शिष्यांना आणि आमचे गुरूबंधू असणाऱ्यांनाही त्यांनी अशाच प्रकारे शिकवलं. नंतरच्या काळात चित्रपट संगीतामुळे आणि जाहीर कार्यक्रमांमुळे त्यांना फारसा वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे नंतरच्या काळात फार जणांना त्यांच्याकडून शिकण्याचं भाग्य लाभलं नाही. त्यादृष्टीनं मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. विशेष म्हणजे मी जेव्हा संतूर शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे दोन शिष्य माझ्याकडे पाठवले आणि “तुम इनको सिखाना शुरू कर दो’ असं सांगितलं.
संतूरची परंपरा पुढं सुरू राहावी यासाठी माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. माझ्याकडे खूप शिष्य शिकायला येऊ लागले हे पाहून त्यांना खूप अभिमान वाटायचा, आनंद होत होता. अर्थातच हे सर्व श्रेय त्यांचंच होतं. कारण त्यांनीच एकहाती संतूरला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. आपण लावलेलं रोपटं बहरताना, त्याचा वटवृक्ष होताना पाहून त्यांना मनस्वी आनंद व्हायचा. नंतरच्या काळात त्यांच्यासोबत सहवादन करण्याचीही संधी मला मिळाली. “राग रसरंग’ नावाचा एक कार्यक्रम त्यांनी केला होता. त्यामध्ये माझ्याबरोबरच माझे गुरूबंधू दिलीप आणि अन्य कलाकार होते. तो त्यांचा एक वेगळा प्रयोग होता.
आमच्या गप्पांमध्ये शिवजी नेहमी सांगायचे की, माझ्या वेळी संतूर काय आहे हे लोकांना सांगायला लागायचं. कारण बहुतेकांना या वाद्याविषयी माहिती नसायची. त्यामुळेच माझं संतूर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी यामध्येच करिअर करावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्या घरी संगीताचं वातावरण होतं; पण त्याकाळात मराठी कुटुंबांमध्ये संगीतात करिअर करावं असा विचार फारसा केला जात नसे. त्यातच मी आयुर्वेदातील वैद्यकीय पदवी घेऊन डॉक्टर झालो होतो. पण त्यांच्याच इच्छेखातर मी याकडे वळलो. अन्यथा मी याचा विचारही कधी केला नसता. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मला सदैव मिळत राहिले.
पंडित शिवकुमार हे केवळ गुुरू नव्हते. ते एक उत्तम फिलॉसॉफर होते. अनेक प्रसंगांमधून त्यांनी मला वाट काढून दिली. त्यांची मूळची बांधणी ही अध्यात्मिक होती. मी जे काही सादर करतो आहे, ते माझं काही नाहीये; ईश्वर माझ्याकडून ते करवून घेत आहे, हाच त्यांचा भाव अखेरपर्यंत राहिला. अहंभावाचा स्पर्श त्यांना कधीच झाला नाही. साहजिकच शिष्यांवरही नैसर्गिकपणे तसे संस्कार होत गेले. त्यांच्याबरोबर राहून, तानपुऱ्याची साथ देऊनही आम्हाला खूप काही शिकायला मिळायचं. अतिशय नम्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच आम्ही आयुष्यभर त्यांना पाहिलं. ते मितभाषी, मृदू स्वभावाचे होते. इतरांकडून काही चूक झाल्यास ती समजावून सांगण्याची त्यांची शैली किंवा पद्धत खरोखरीच अनुकरणीय होती. साहजिकच आम्हीही शिष्य म्हणून सदैव त्यांच्यापुढे लीन होऊन राहायचो. पण गुरू-शिष्यांपलीकडचं आमचं नातं होतं. याचं कारण दुजाभाव किंवा कुणासोबत अंतर ठेवणं हा त्यांचा स्वभाव नव्हता.
1955 सालापासून पंडितजी संतूरवादन करत आहेत. जुन्या काळातील उस्तादांचा काळ त्यांनी पाहिला होता, अनुभवला होता. त्यांचा शिष्यांबाबतचा कठोरपणा पाहिला होता. त्यातील किस्से आम्हाला ते नेहमी सांगायचे आणि त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळायचं. सुरुवातीच्या काळात त्यांना लोक सतत विचारायचे की, तुम्ही संतूर छान वाजवता; पण उदरनिर्वाहाचं काय? पण अशा प्रश्नांमुळे ते कधी विचलित झाले नाहीत. कारण संतूरशी त्यांचं एक अतुट नातं जुळलं होतं. संतूर हा त्यांचा श्वास होता.
संतूर या वाद्याला तसा इतिहास नाही. त्यामुळे पंडितजींनी स्वतः जी पद्धत सुरू केली तीच त्यांनी पुढं शिष्यांना शिकवली. सुरुवातीला या वाद्यानुसार ते अलंकार शिकवायचे. त्याची तयारी पूर्ण झाल्याशिवाय राग शिकवायचे नाहीत. रागामध्येही एका रागाची रचना हातात बसल्याशिवाय दुसरा राग शिकवायचे नाहीत. थोडक्यात, ज्याला खानदानी शिक्षण म्हटलं जातं तशा पद्धतीनं ते शिकवायचे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संतूर शिकवण्यासाठी त्यांनी कधीच पैसे घेतले नाहीत.
ज्याला संतूर शिकायचं आहे, परफॉर्मर व्हायचं आहे आणि संतूर वादनाची परंपरा पुढं घेऊन जायची आहे त्यांना ते अत्यंत आनंदानं शिकवायचे. संगीतात कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नाही, हे त्यांचं नेहमीच सांगणं असायचं. त्यामुळे प्रत्येकानं भरपूर रियाज केला पाहिजे आणि तो अविरत सुरू राहिला पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. कारण संगीत ही सादरीकरणाची कला किंवा परफॉर्मिंग आर्ट आहे. इथं तुम्ही काही सांगायचं नसतं; तुमच्या सादरीकरणातून सर्व काही उलगडत जातं. त्यामुळे तुमचं सादरीकरण तुम्हाला स्वतःला मंत्रमुग्ध करणारं आहे का याचा शोध घ्या, ही त्यांची शिकवण होती. कारण कोणत्याही कलाकाराला त्याची कला सादर केल्यानंतर स्वतःला आनंद मिळत असेल तर त्यातून दुसऱ्याला आनंदानुभूती येईल, असं त्यांचं सांगणं असायचं.
विशेष म्हणजे ते स्वतःही एखाद्या कार्यक्रमानंतर म्हणायचे की, माझ्या संतूर वादनानंतर अनेकांनी येऊन प्रशंसा केली; पण मला माझं आजचं वादन तितकंसं आवडलं नाही. मला काय सादर करायचं होतं आणि मी काय सादर केलं याच्या उत्तरांचा शोध घेतला नाही तर आपली कधीच प्रगती होणार नाही, असं त्यांचं सांगणं असायचं. त्यांचा हा विचार असल्यामुळे आमचीही दृष्टी तशी विकसित होत गेली. पंडितजींमध्ये ही भावना तयार होण्याचं कारण म्हणजे त्यांची अध्यात्मिक बैठक खूप पक्की होती. संतूर वादनाच्या कोणत्याही कार्यक्रमाकडे ते एक पूजा म्हणून पहायचे. त्यामुळे त्यांचा एकही कार्यक्रम रटाळ झाला नाही. कारण कामचलाऊपणानं सादरीकरण करणं हा त्यांचा पिंडच नव्हता.
त्यांचं प्रत्येक सादरीकरण हे अत्यंत तल्लीनतेनं, एकाग्रतेनं आणि तन्मयतेनं असायचं. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा रंगतदार व्हायचा आणि रसिकश्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. इतक्या श्रेष्ठ दर्जाचं वादन करूनही विद्यार्थीभावामुळे त्यांच्यातील नवनिर्मितीची प्रक्रिया शेवटपर्यंत सुरू राहिली. असा हा निःस्पृह, मनस्वी गुरू आम्हाला सोडून गेला आहे, याची खंत सदैव जाणवत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(पं. धनंजय दैठणकर हे
पं. शिवकुमार शर्मांचे शिष्य)
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)