जागतिक क्रिकेटमध्ये जवळपास प्रत्येक संघात एक स्पर्धा होती, त्याला आपण खुन्नस म्हणूयात. मात्र, सध्या आयपीएल किंवा महिला आयपीएल तसेच जगभरात होत असलेल्या विविध टी-20 लीगमुळे ही स्पर्धा, चुरस किंवा खुन्नसच संपुष्टात आणल्याची भीती वाटत आहे.
जेव्हा कसोटी क्रिकेटपासून सुरू झालेला प्रवास एकदिवसीय क्रिकेटवर आला तेव्हा तर ही खुन्नस जास्तच वाढली. एकेका धावेसाठी प्रतिस्पर्धी संघात प्रसंगी वादच नव्हे तर हाणामारीपर्यंतची वेळ आल्याचे आपण अनेक सामन्यांतून पाहिले आहे. त्यातच आता टी-20 हा क्रिकेटचा आणखी वेगवान प्रकार तुफान लोकप्रिय ठरत असून त्यातही एकेका चंडूवर खुन्नस रंगताना आपण पाहिली.
मात्र, लीग क्रिकेटमुळे या खेळात या खुन्नसमुळे वाढलेली लज्जतच निघून जाणार अशी आता परिस्थिती दिसू लागली आहे. आयपीएल स्पर्धा वर्ष 2008 मध्ये सुरू झाली व जगभरातील नावाजलेले खेळाडू भारतात विविध संघातून खेळू लागले. पूर्वी हा प्रकार नव्हता असे नव्हे; पण त्याला मर्यादा होती. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांत काउंटी, शेफील्ड शील्ड सारख्या स्पर्धांमध्ये परदेशी खेळाडू खेळू लागल्यावरही खुन्नस टिकून होती.
आता तर काय याच काउंटीत खेळण्यापेक्षा हेच परदेशी खेळाडू भारतात आयपीएल खेळण्यासाठी जीवाचे रान करताना दिसतात. पण यातून घडले काय तर दोन वेगवेगळ्या संघांतील खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ लागले व तिथेच दोन संघांतील खुन्नस संपुष्टात आली. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचे खेळाडू जर एकाच संघात असतील तर मग त्यांच्या प्रख्यात ऍशेस मालिकेत तो संघर्ष कसा पाहायला मिळेल. आता दोन देशांत असलेल्या तणावामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळण्यास बंदी आसल्याने अद्याप भारत व पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक खुन्नस टिकून आहे. त्यातही जरा मवाळपणा आला आहे कारण या दोन देशांचे खेळाडू पूर्वीसारखे एकमेकांना एकमेकांचे शत्रू समजत नाहीत. म्हणूनच त्यांचा बाबर आझम व महंमद रिझवान काय शाहीन शाह आफ्रीदी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याशी मैत्री करताना दिसतो. तसेच कोहलीकडून तर काय हल्ली जवळपास प्रत्येक देशाचा खेळाडू सल्ला घेताना दिसतो. हे असे जर होत राहिले तर दोन देशांमध्ये असलेली चढाओढ कशी टिकेल.
व्यावसायिकता कायम राहावी
पूर्वी ऑस्ट्रेलियाचे किंवा इंग्लंडचे खेळाडू जरी एकाच काउंटी संघातून खेळत असले तरीही ऍशेस मालिकेत एकमेकांचे कट्टर वैरी असल्यासारखे मैदानावर वागायचे. अगदी दिसदाल मार्क वॉ देखिल इंग्लंडच्या माइक आर्थरटनविरुद्ध स्लेजिंग करताना दिसयाचा. या दोन देशांच्याच खेळाडूंना संपूर्ण व्यावसायिक खेळाडू का म्हणतात ते याच ऍशेस मालिकेतून दिसायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही कारण काउंटी व ऍशेस यातील फरक समजून घेत खेळणारा क्रिकेटपटू या दोन्ही संघात सध्या दिसत नाही. तो दिसतो भारतातील आयपीएल स्पर्धेत. जर केकेआर, आरसीबी किंवा अन्य कोणत्याही संघातून खेळणारे दोन वेगवेगळ्या देशांचे खेळाडू आपापल्या देशाकडून खेळत असले तरीही त्यांच्याच मैदानावर कितीही बिकट स्थिती असली तरीही संवाद हा मैत्रीपूर्णच होतो हे देखिल दिसते. हेच जागतिक क्रिकेटच्या प्रसिद्ध खुन्नससाठी धोक्याची घंटा आहे. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग व हरभजनसिंग जर मुंबई इंडियन्सकडेच असतील तर त्यांच्यात पूर्वी झालेल्या वादाची पुसटशी छटाही आयपीएल स्पर्धेत दिसत नाही, मग खेळातून संघर्ष नाहिसा होणारच ना.
लीगमधील चुरस वाढली पण…
दोन देशांच्या सामन्यांतील चुरस संपली तरीही लीग क्रिकेटमधील चुरस वाढल्याचे पहिल्याच आयपीएल मौसमातून दिसले होते. त्यावेळी पंजाबचा कर्णधार होता युवराज सिंग व मुंबईचा कर्णधार होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. हा सामना सुरू झाल्यावर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर युवराज फलंदाजी करताना बाद झाला व प्रेक्षकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी सामना संपल्यावर प्रेक्षकांना उद्देशून युवराज म्हणाला होता, की आम्हीही तुमचेच लाडके क्रिकेटपटू आहोत, ही केवळ लीगमधील लढत होती. आपल्याच देशाकडून खेळणारा खेळाडू आपल्या लीगमधील आवडत्या संघाविरुद्ध बाद झाल्यावर असा जल्लोष होत असेल तर माझ मनात मी वैरी असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यावर प्रेक्षकांनी युवराजसाठी टाळ्या वाजवल्या परंतु आजचे चित्र वेगळे आहे. परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर टाळ्यांचा गजर होतो व आपल्याच खेळाडूच्या बाद होण्यावर जल्लोष साजरा केला जातो.
देश की आयपीएल
हा संघर्ष संपण्याची किंवा निवळण्याची जी काही प्रमुख कारणे आहेत त्यातील एक मुख्य कारण म्हणजे देशाकडून खेळण्यापेक्षा आता काही क्रिकेटपटू आयपीएलसारख्या लीग क्रिकेटमध्ये खेळण्याला प्राधान्य देतात. त्यात वेस्ट इंडीज, श्रीलंका व न्यूझीलंड या देशांतील खेळाडूंची संख्या जास्त आहे. अर्थात याला कारणही तसेच आहे. या देशांच्या क्रिकेट मंडळांकडे आपल्या खेळाडूंना लीगच्या दर्जाचे मानधन देण्याइतकाही पैसा नाही. न्यूझीलंड मंडळ प्रयत्न करत आहे मात्र, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांची परिस्थिती तर खूपच बिकट आहे. मग जर बीसीसीआयच्या स्तरानुसार आपल्या खेळाडूंना या दर्जाचे मानधन व करार द्यायला परवडणारच नाही तर मग हे खेळाडू तरी देशाकडून खेळण्याला प्राधान्य का देतील, हा देखिल मोठा प्रश्न आहे.
महिलांच्या आयपीएलमध्येही हेच चित्र
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जशी ही चुरस कमी झाल्याचे दिसत आहे तेच चित्र आता बीसीसीआयने नुकत्याच सुरू केलेल्या महिलांच्या आयपीएल स्पर्धेतही दिसत आहे. ऍश्ले गार्डनर, एलिस पेरी या भारताच्या हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांच्या खूप घट्ट मैत्रिणी बनल्याने येत्या काळात आयसीसीच्या टी-20 किंवा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत चुरस रंगणार का, हाच मोठा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी याचविषयावर एका प्रसिद्ध समालोचकाने असाच प्रश्न उपस्थित केला होता व त्यावर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉ याने असेच मत व्यक्त केले होते. त्याने तर पुढे जाऊन सांगितले की असेच जर सुरू राहिले तर वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेटपटूंमधील मैत्री चर्चेत राहील व मैदानावरील खुन्नस व त्या जिद्दीच्या जोरावर होत असेलली कामगिरी मागे पडेल. पण प्रश्न हा आहे की या लीग सगळ्यात जास्त पैसा मिळून देतात त्यामुळे ना खेळाडूंना, ना विविध देशांच्या क्रिकेट मंडळांना ना लीगमधील संघ मालकांना त्याची चिंता आहे. त्यांना केवळ खोऱ्याने नफा ओढायचा आहे, मग त्यासाठी प्रत्यक्ष जिद्दीच्या खेळाचा बळी गेला तरीही काही फरक पडणार नाही. हा मुद्दा या लेखातून उपस्थित केल्यावर काही जणांना हसू येईल; पण आज नाही तर पाच ते दहा वर्षांत हा लेखप्रपंच योग्य होता असेच मत तयार होणार यात शंका नाही.
अमित डोंगरे