लोकमान्य टिळक यांचे देहावसान झाले, त्यास 101 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या काळात भारत काहीसा सुस्तावल्यासारखा झालेला होता, त्या काळात लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीचे स्फुल्लिंग चेतवण्याचे कार्य टिळकांनी केले. तोपर्यंत नेमस्त राजकारणाचा प्रभाव होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे नेतृत्व वैचारिक होते. न्या. महादेव गोविंद रानडे हेही सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोचवत होते.
सत्ताधाऱ्यांच्या अंगभूत चांगुलपणावर त्यांचा विश्वास होता. पत्रव्यवहार व परिषदा यांच्या माध्यामातून तत्कालीन सुशिक्षित मंडळी आपली गाऱ्हाणी सरकारच्या कानावर घालत होती. गोपाळ कृष्ण गोखले हेही नेमस्त राजकारणी होते. टिळकांनी या प्रकारच्या काहीशा उच्चभ्रू राजकारणाला सार्वजनिक केले. लोकाभिमुख केले. ज्या लोकांना काहीतरी कृती करावीशी वाटत होती, ते मोठ्या संख्येने टिळकांच्या नेतृत्वाखाली जमा झाले.
महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ पडून लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असतानासुद्धा ब्रिटिश सत्ता अमानुषपणे शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करीत होती. तेव्हा टिळकांनी केसरीमधून अनेक अग्रलेख लिहिले. नुसते लेख छापून दुष्काळग्रस्त खेड्यातील लोकांना न्याय मिळणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. हे लेख घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना खेडोपाडी शेतकऱ्यांकडे पाठवले. त्यांनी दुष्काळात शेतसारा माफी कायदेशीर आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले.
मूठभर उच्चशिक्षित नेमस्तांच्या अर्ज-विनंत्या व परिषदांनी सरकारवर प्रभाव पडणार नाही; त्यासाठी लोकमताचा दबाव पाहिजे हे टिळकांनी ओळखले होते. “ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या असंतोषाचे जनक’ असे मत इंग्रज अधिकाऱ्यांनी टिळकांबद्दल नोंदवलेले आढळते.
टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला, तेव्हा त्यांना दोषी ठरवून तुरुंगात पाठवायचे ब्रिटिश सरकारने आधीच ठरवले होते.
खरे तर पाच ज्युरींपैकी सर्वच्या सर्व ज्युरींनी एकमुखी निर्णय दिला तरच खटल्याचा निर्णय होत असे. या खटल्यात दोन ज्युरींनी त्यांना अपराधी ठरवण्यास नकार दिला होता. तरीदेखील कोर्टाने सर्व नियम धाब्यावर बसवले. गंमत म्हणजे ज्या मराठी अग्रलेखांसाठी हे ज्युरी निर्णय घेणार होते, ते सर्वजण मराठी न जाणणारे होते.
असे असूनही न्यायाधीशांनी टिळकांची निंदा केली व सहा वर्षे त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी पाठवले. ही शिक्षा ऐकल्यावर, “ज्युरींचा निकाल काहीही असो, मी निरपराध आहे. यांच्यापेक्षाही वरची शक्ती आहे व मी फक्त तिला मानतो’, असे ते म्हणाले होते. मंडालेमध्ये शिक्षा भोगण्यासाठी जाणे म्हणजे मरणप्राय यातना. म्हणूनच त्या वेळी “द गार्डियन’ या महत्त्वाच्या ब्रिटिश वर्तमानपत्रात लिहिले गेले, “टिळक बावन्न वर्षांचे आहेत. त्यांना शिक्षेसाठी जेथे ठेवणार आहेत, तेथून ते काही आता जिवंत परत येत नाहीत.’
टिळकांनी तुरुंगातील त्या सहा वर्षांत “गीतारहस्य’ हा अनमोल ग्रंथ लिहिला आणि तुरुंगातून नुसते परत आले नाहीत, तर नव्या जोमाने पुढील कार्यास लागले. तिथून आल्याबरोबर छापलेल्या पहिल्या अंकाच्या अग्रलेखाचे नाव होते, “पुनश्च हरिओम’. तिथल्या हालअपेष्टांनी ते ध्येयापासून जराही विचलित झाले नाहीत. सनातनी विचारांचे लोक, सुधारणावादी, मवाळ, जहाल सगळ्यांना एकत्र घेऊन एकजुटीने आपण ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढले पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
गीतारहस्य हा ग्रंथ त्यांनी तुरुंगात पेन्सिलीने वह्यांमध्ये लिहिला होता. सुटका झाल्यावर ब्रिटिश सरकारने त्या वह्या छाननी करण्यासाठी ठेवून घेतल्या. नंतर पाठवतो म्हणून एकदीड महिना झाला तरी वह्या काही येईनात. टिळकांच्या सहकाऱ्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली, तेव्हा ते म्हणाले, “काळजी नको. मी लिहिलेले संपूर्ण गीतारहस्य माझ्या स्मरणात आहे. मी ते पुन्हा लिहून काढेन.’ मुळात विषय इतका गहन. प्रत्येक वाक्यरचना सूक्ष्म व महत्त्वाची. विचारपूर्वक लिहिलेली. असे असूनही थोडेसुद्धा विचलित न होता, टिळक शांतपणे अशी खात्री देतात. केवढा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि मनाचा समतोल!यथावकाश त्या वह्या परत मिळाल्या.
लोकमान्य टिळकांनी प्रचंड अभ्यास करून “ओरायन’ आणि “आर्क्टिक होम इन द वेदाज’ हे ग्रंथ लिहिले. वेदांमधले खगोलीय संदर्भ सांगून वेदांचा काळ इ.स.पूर्व आठ हजार वर्षे आधीचा असल्याचे सिद्ध केले. ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहासकार व मुख्यतः डावे, मार्क्सवादी इतिहासकार हे वेदांचा काळ फार तर इ.स.पूर्व एक हजार इतका असल्याचे सांगत होते. पण टिळकांनी त्यांच्या ग्रंथामध्ये जे युक्तिवाद केले आहेत, जे दाखले ते दिले आहेत, ते आजवर कुणीही खोडू शकलेले नाही व त्यामुळे आज त्यांनी मांडलेले सिद्धांत जगभर मान्यता पावलेले आहेत.
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’, “राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’, “बॉम्बचा पंथ’, “हे आमचे गुरूच नव्हेत’ हे टिळकांच्या अग्रलेखांचे मथळे भारतीय जनतेच्या कायमचे लक्षात राहिले. एकीकडे परकीय बलाढ्य सत्तेचा आदरयुक्त दरारा आणि दुसरीकडे सामाजिक फाटाफूट अशा बिकट स्थितीत देश असताना लोकमान्य टिळकांचा उदय हे भारताचे भाग्यच समजायला हवे.
-माधुरी तळवलकर