सध्याच्या करोनाच्या काळात रोजचा दिवस नवं दुःख घेऊन येतो; धीरोदात्तपणे त्या दुःखाला, परिस्थितीला सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात आहे. तज्ज्ञ म्हणत आहेत की जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येईल! अशा वेळी बुद्धीच्या पातळीला कळतील, असे सर्व उपाय करणं हे आपल्या हातात आहे. बुद्धीच्या त्या उपायांना प्रार्थनेची जोड देणं, आपल्या हातात आहे. काळ मोठा कठीण आला आहे. मानवी, विवेकी सर्व गोष्टी करत असताना, तिला प्रार्थनेची जोड देणं यावरमाझा विश्वास आहे.
मी प्रार्थना करतो, सर्वांसाठी. आपण सर्वजण प्रार्थना करूयात एकमेकांसाठी, सर्वांसाठी. करोनामुळं भयंकररित्या काळवंडलेल्या या कालखंडामध्ये, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सर्व काळजी घ्यायचीच आहे- मास्क वापरायचा आहे, वेळोवेळी सॅनिटायझर वापरायचं आहे, सार्वजनिक जीवनात वावरताना किमान 6 फुटांचं अंतर ठेवून वावरायचं आहे. शिवाय या सगळ्याला जर जोड देता आली, तर प्रतिकारशक्ती वाढवणारे विविध उपाय करायचे आहेत. उदा. योग असो, प्रतिकारशक्ती वाढवणारी काही आयुर्वेदिक औषधं वापरणं असो.
या सगळ्याला प्रार्थनेची जोड द्यायची आहे. रोजचा दिवस नवं दुःख घेऊन येतो; धीरोदात्तपणे त्या दुःखाला, परिस्थितीला सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात आहे. तशी मी प्रार्थना करतो- सर्वांसाठी. आपणही प्रार्थना करूया- एकमेकांसाठी, सर्वांसाठी!
प्रार्थनेचा एक सूर राजीव सातव यांच्यासाठी आहे. खासदार राजीव सातव हे एक तरुण, आश्वासक आणि उमदं नेतृत्व होतं. समाजाच्या सर्व घटकांना जोडत, पुढं सरकण्यावर त्यांचा विश्वास होता. राजीव सातव यांचा शेवट आपल्या सर्वांना चटका लावून जाणारा आहे. मला तर त्यांच्या जाण्याचं वैयक्तिकसुद्धा तीव्र दुःख आहे.
मे 2014. लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले होते. कॉंग्रेसची वाटचाल तेव्हा कशीबशी चाळीशीपर्यंत पोचली होती. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चा होती, जिचं, बहुधा एक कार्यकर्ता-भाष्यकार म्हणून मला निमंत्रण होतं. त्या चर्चेला राजीव सातव कॉंग्रेसचे प्रवक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्यानं कॉंग्रेसची झालेली धूळधाण सांगून, कॉंग्रेसनं आता काय केलं पाहिजे, असा प्रश्न मला विचारला.
जे सांगायचं ते मी तेव्हा सांगितलं. भाजपमध्ये निवडणुकीनंतर चिंतन बैठका किंवा चिंतन शिबिरं घेण्याची पद्धत आहे, तशी कॉंग्रेसनंसुद्धा चिंतन शिबिरं घेऊन या परिस्थितीतून पुढचा मार्ग कसा काढायचा हे ठरवावं, हेही मी तेव्हा सुचवलं. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकानं ताबडतोब कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव सातव यांना विचारलं- धर्माधिकारी जे म्हणतायत त्यावर तुमचं मत काय? राजीव सातव तेव्हा म्हणाले की, धर्माधिकारी सर जे बोलतात ते विचार करून बोलतात यावर आमचा विश्वास आहे. आम्ही त्यांच्या सूचनेचा निश्चितपणे विचार करू! मी खरंच सांगतो आहे की मला त्यांच्या उत्तरातल्या प्रगल्भता, प्रांजळपणा किंवा कुठल्याही प्रकारच्या द्वेषाच्या विखाराची अनुपस्थिती यांचं काहीसं आश्चर्य वाटलं.
कॉंग्रेसचा प्रवक्ता कुठंतरी कदाचित माझ्यावर टीकाच करेल असं मला वाटलं होतं. राजीव सातव यांचं बोलणं संपल्यानंतर कार्यक्रमात मध्ये ब्रेक होता. मधल्या ब्रेकमध्ये स्टुडिओतच मला एक निरोप आला. राजीव सातवच बोलत होते. म्हणाले, “सर ओळखलत का मला?’ आता ओळखलत का सर मला?, असं कुणी म्हटल्यावर मला कुसुमाग्रजांची कविताच आठवते.
अर्थात राजीव सातव यांना तेव्हा मी “कॉंग्रेसचे प्रवक्ते’ म्हणूनच ओळखलं होतं. मी ते सांगितल्यावर राजीव सातव म्हणाले- “मी चाणक्य मंडल परिवारचा एमपीएससीचा कोर्स केला आहे!’ त्या कोर्सच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. त्यांचं सर्व वागणं आणि त्यातली कमालीची शालीनता प्रगल्भ होती. हे बोलून राजीव सातव म्हणाले, “तिकडं एमपीएससीकडं माझं फारसं काही जमलं नाही; पण इथं राजकारणात मात्र जमतंय, असं दिसतंय!’
राजीव सातव यांच्या आत्म्याला ईश्वर सद्गती देवो, असं म्हणण्याचं कारणच नाही. ज्या प्रकारचं आयुष्य ते जगले त्यानंतर त्यांच्या आत्म्याला निश्चितच सद्गती मिळणार आहे. त्यांच्यासाठी मीही प्रार्थना करतो. करोनाची पहिली लाट मुख्यतः वयोवृद्ध माणसांवर हल्ला चढवत होती. बघता-बघता दुसरी लाट; लाट नव्हे त्सुनामी आली! या त्सुनामीचा हल्ला मुख्यतः तरुण वर्गावर आहे. या त्सुनामीत आरोग्य व्यवस्थेची धूळधाण उडाली.
त्यामुळं केंद्र, राज्य सरकारसकट आपण प्रत्येकानंच आपली जबाबदारी उचलायला हवी. या दुसऱ्या लाटेशी लढताना अक्षरशः हतबल व्हायला व्हावं, अशी परिस्थिती निर्माण होते आहे. घराघरात करोनाचे रुग्ण आहेत. ही लाट गावागावात पोहोचलेली आहे. कुणाला ऑक्सिजन हवा आहे पण तो मिळत नाही. कुणाला दवाखान्यात दाखल करायचं आहे, तर बेड मिळत नाही. कुणाची परिस्थिती गंभीर आहे पण त्याच्यासाठी व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नाहीत. दुष्काळात तेरावा-चौदावा महिना म्हणावा अशी अपघातांची मालिका सुरूच आहे. अक्षरशः हृदय पिळवटून काढणाऱ्या कालखंडातून आपण जातो आहोत.
माझी आयएएसची बॅच 1986 ची. आमचा एक व्हॉटसऍपचा ग्रुप आहे. त्यावर आम्हाला बॅचविषयीच्या अद्ययावत बातम्या कळत राहतात. 1986 च्या बॅचमध्ये निवडले गेलेले अधिकारी आता सर्वात वरिष्ठ पातळीला पोहोचले आहेत. तरीसुद्धा काही ठिकाणी, काही जणांना उपचार मिळण्यात वेळोवेळी अडचणी आल्या. ही परिस्थिती जर वरिष्ठ अधिकाऱ्यांची असेल तर सामान्य नागरिकांचं काय चालू असेल याचा विचार करून, बातम्या पाहून काळजाचे ठोके चुकतात.
तज्ज्ञ म्हणतात, तिसरी लाट लहान मुलांवर हल्ला चढवेल.
आरोग्य व्यवस्थेची अशी धूळधाण उडालेली असताना बघता बघता जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट आली, तर काय होईल याचा माझ्याच्यानं विचारही करवत नाही. तिला सामोरं जायला आरोग्य व्यवस्थेची, केंद्र आणि राज्य सरकारचीसुद्धा सर्व तयारी चालू असेल, अशी मी आशा करतो आणि त्यासाठी प्रार्थना करतो. यातून हृदय पिळवटून जात असताना एक भीतीदायक प्रकार पुढे येतो, म्युकरमायकोसिसच्या रूपानं. त्यात तज्ज्ञ सांगत आहेत की मानसिक आजारांचं प्रमाण करोनामुळे वाढतं आहे.
बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे लोक घरात आहेत. नेहमीचं वेळापत्रक पाळता येत नाही. कुठं भांड्याला भांड लागतं तसं घराघरात वाढत्या भांडणाच्या बातम्या आहेत. कुटुंबातल्या स्त्री वर्गावरचे ताण वाढत आहेत. अनेक जणांची वाटचाल करोनानंतरच्या “डिप्रेशन’कडे होते आहे. अशा मानसिक खच्चीकरणाचा संबंध करोना होण्याशीच नाही तर ज्यांना तो झालेला नाही त्यांनाही मानसिकदृष्ट्या हतबल वाटू शकतं.
अशावेळी सर्व मानवी प्रयत्नांच्या सोबतच प्रार्थना कामी येते, यावर निदान माझा विश्वास आहे. मी तर म्हणेन, आपण प्रेमानं साधी एकमेकांची विचारपूस जरी केली, तरी कुठंतरी मनाला बरं वाटेल. अशा वेळी बुद्धीच्या पातळीला कळतील, असे सर्व उपाय करणं हे आपल्या हातात आहे. बुद्धीच्या त्या उपायांना प्रार्थनेची जोड देणं, आपल्या हातात आहे. म्हणून मी प्रार्थना करतो, सर्वांसाठी. आपण सर्वजण प्रार्थना करूया, सर्वांसाठी!
– अविनाश धर्माधिकारी,
माजी सनदी अधिकारी