नजीकच्या भूतकाळात स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर नक्षल्यांना देत असत. आता ते पोलिसांना नक्षल्यांचा ठावठिकाणा सांगतात. यावरून जनमानसाचा कल गडचिरोली पोलिसांच्या बाजूने झुकलेला दिसून येतो.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यामधील कोटगूल ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात अलीकडेच झालेल्या चकमकीत, पोलीस व सी सिक्स्टी कमांडोंनी नक्षली चळवळीतील वरिष्ठ नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 माओवाद्यांचा खात्मा केला आहे. मिलिंद ऊर्फ दीपक ऊर्फ ज्योतिराव ऊर्फ श्रीनिवास तेलतुंबडे हा सीपीआय (एम) सेंट्रल कमिटीचा सचिव, एमसीसी इन्चार्ज आणि दंडकारण्याच्या महाराष्ट्र, छत्तीसगड भागातील सामरिक महत्त्वाचा नेता होता.
हे सर्व नक्षली आगामी नक्षल सप्ताहासंदर्भात पोलिसांविरुद्ध विध्वंसक ऍक्शन प्लॅन आखण्यासाठी आणि तो प्लॅन कसा कार्यान्वित करायचा याच्या विचारविनिमयासाठी जंगलात जमले होते. या चकमकीत गडचिरोली पोलिसांचे रवींद्र नैताम, सर्वेश्वर आत्राम, महरू कुळमेथे आणि टीकाराम कटांगे जखमी झाले. या सर्वांनी हॉस्पिटल डिस्चार्ज झाल्यावर परत एन्काउंटरमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली.
या नक्षल्यांची माहिती देण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी लाखोंची बक्षिसे जाहीर केली आहेत. सर्वाधिक 50 लाखांचे इनाम मिलिंद तेलतुंबडे यांच्या नावावर होते. मागील शनिवारी पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेली चकमक, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक काळ चाललेली चकमक होती. चकमक सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होऊन संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत चालली.
कमांडो रात्रीच जंगलात घुसलेत आणि नक्षली ठिकाण्यापासून योग्य अंतरावर आल्यानंतर त्यांनी चहुबाजूंनी स्ट्राइक फॉर्मेशनमध्ये आगेकूच सुरू केली. लपलेल्या जागेतून येणाऱ्या शत्रूची टेहाळणी करणाऱ्या पहारेकऱ्यांना आगेकूच करणाऱ्या पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी एकदम जबरी फायर सुरू केले. विशेष प्रशिक्षित सी सिक्स्टी कमांडोंच्या 100 जवानांनी या चकमकीत नक्षली हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी तुफान गोळाबार झाला.
नक्षल्यांनी ग्रेनेड लॉंचरही वापरले. ज्या प्रमाणात नक्षली फायर येत होता त्यावरून तेथे कोणीतरी फार मोठा नक्षली नेता आल्याचा अंदाज पोलिसांना आला आणि तो खराही ठरला. या जागेत मोठ्या प्रमाणात नक्षली नेते होते. त्यापैकी काही अंधारात निसटून गेले असण्याची शक्यता आहे. मिलिंद तेलतुंबडेला वाचवण्यासाठी नक्षल्यांनी प्राणपणाने लढा दिला. त्याच्या रक्षणार्थ असलेले सहा पुरुष-महिला अंगरक्षक या प्रयत्नात मारले गेले.
26 नक्षलींना यमसदनी धाडणारी ही चकमक गडचिरोलीच्या इतिहासातील दुसरी मोठी घटना आहे. 23 एप्रिल 2018 रोजी याच सी सिक्स्टी कमांडोंनी 40 नक्षल्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ठार केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी दक्षिण गडचिरोलीतली गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुलच्या मार्डीनटोला जंगल परिसरात काही नक्षली हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या ऑपरेशनसाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयलनी एएसपी सोमय मुंडेंच्या नेतृत्वात आपला सी सिक्स्टी कमांडो आणि स्पेशल ऍक्शन टीमचा फोर्स तेथे पाठवला. 200 हून अधिक सी-60 कमांडो आणि एसएटी पोलिसांनी त्या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले.
नक्षल्यांच्या गनिमीकाव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी 1992 मध्ये गडचिरोलीत स्थानिक आदिवासींच्या विशेष कृती दलाची स्थापना केली. त्याचे सी 60 असे नामकरणही झाले. कारण त्यात साठ कमांडो प्रशिक्षित पोलीस होते. या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला. कारण त्यांचे स्थानिक भाषेवरील प्रभुत्व, लोकसंस्कृती, समाज आणि भूभागाची योग्य माहिती या सर्व गोष्टी गनिमी युद्धतंत्रात महत्त्वाच्या ठरतात.
सी सिक्स्टीच्या संख्येत पुढे नियमित भर पडत गेली आणि त्यांना नक्षलवाद्यांचा बीमोड करणारे खुंखार दल हे बिरूद मिळाले. सध्या या पथकात जवळपास 1000 जवान असले तरी त्याचे नाव मात्र तेच आहे. त्यांना गनिमी युद्धनीतीचे प्रशिक्षण एनएसजी सेंटर, बीएसएफ कमांडो स्कूल आणि आर्मी जंगल वॉरफेयर स्कूलमधे देण्यात येते. आधुनिक व प्रगत शस्त्र पुरवली जातात. तसेच प्रोत्साहनपर बढती आणि बक्षीस देखील दिली जातात.
सी सिक्स्टीच्या खबऱ्यांचे नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाइट फोनचे विस्तारलेले जाळे, केंद्रीय निमलष्करी दलाचे पाठबळ आणि वाढवण्यात आलेली गस्त यामुळे आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्षल्यांवरचा दबाव वाढला आहे. ही कारवाई केवळ एक चकमक नव्हती तर तो एक योजनाबद्ध हल्ला होता, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
सी सिक्स्टी कमांडोंच्या या घवघवीत यशाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, दबावरहित, योग्य जवानांची निवड व कठोर प्रशिक्षण, असाधारण कार्यक्षमता, प्रशासकीय पाठिंबा आणि पोलीस अधीक्षकांचे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन कारणीभूत आहेत. सी सिक्स्टीची निवडप्रक्रिया व प्रशिक्षण स्तर उच्च दर्जाचा आहे. नक्षल्यांशी लढा देण्याची तीव्र आंतरिक इच्छा असलेले स्थानिक पोलीस आणि युवकच यात घेण्यात येतात.
याच्या प्रशिक्षणाचा स्तर देशातील वरिष्ठ दर्जाच्या कमांडोंच्या समकक्ष असतो हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. हे युवक या फोर्समध्ये ठराविक कालखंडासाठीच येतात आणि नंतर आपल्या पॅरेन्ट युनिटमध्ये परत जात असल्यामुळे हा सदैव तारुण्याने मुसमुसलेला फोर्स नेहमीच अनुभवी अधिकाऱ्यांखाली कार्यरत असतो. या फोर्सकडे खबऱ्यांचे विस्तारित जाळे आल्यामुळे त्यांना माहितीची वानवा नसते. सी सिक्स्टी स्पेशल इंटेलिजन्स युनिट नक्षलीसंबंधी माहितीचे संकलन व पृथक्करण करून योग्य ते निर्देश देते.
महाराष्ट्र सरकारने या फोर्सला नेहमीच योग्य ती आर्थिक व संसाधनीय मदत केल्यामुळे त्यांची कार्यक्षमता अबाधित राहते. त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट्स, नाइट व्हिजन ग्लासेस, ड्राय राशन आणि आधुनिक शस्त्रास्त्रे दिली जातात. 1990च्या दशकात साध्या एसएलआर रायफली असणाऱ्या सी सिक्स्टी जवानांकडे आज एके 47/56 रायफल्स आहेत. अंकित गोयलनी या ऑपरेशनचे मूलभूत व बारीक प्लॅनिंग केले.
फोर्स केव्हा लॉंच करायचा, त्याला लक्षापर्यंत कसे पाठवायचे आणि किती व केवढी कुमक केव्हा व कशी पाठवायची याची काटेकोर आखणी व राबवणी त्यांनी केली. सोमय मुंडेंनी या प्लॅनला साधकबाधक रीतींनी प्रत्यक्षात उतरवले. सदैव अशा जानबाज अधिकाऱ्यांचे नेतृत्व लाभल्यामुळेच सी सिक्स्टी कमांडो व गडचिरोली पोलीस महाराष्ट्रातील नक्षली दबावाचा अस्त करण्यात सफल झाले आहेत, असे म्हटल्यास ते चूक होणार नाही.
महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये नक्षली विरुद्ध प्रशासन स्थितीचे संदर्भ बदलत चाललेले दिसून येताहेत. नक्षल्यांनी याच इलाक्यातून आंध्र आणि छत्तीसगड राज्यात भक्कम कॉरिडोर निर्माण करून मागील तीस वर्षे महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारला बेजार केले होते. या चकमकीत ठार झालेल्या नक्षली संख्येवरून त्यांचा गडचिरोलीमधील लोकांवरचा प्रभाव ओसरू लागला आहे याचा प्रत्यय आला. या कारवाईमुळे नक्षल्यांना मोठा धक्का बसला असणार यात शंकाच नाही.
2017 ते 20 या काळात पोलिसांनी 76 नक्षल्यांचा खात्मा केला तर आपले 22 पोलीस शहीद झाले. याच काळात 180 पेक्षा जास्त नक्षल्यांनी शरणागती पत्करली. नजीकच्या भूतकाळात स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर नक्षल्यांना देत असत. आता ते पोलिसांना नक्षल्यांचा ठावठिकाणा सांगतात. यावरून जनमानसाचा कल गडचिरोली पोलिसांच्या बाजूने झुकलेला दिसून येतो.
नक्षली एकेकाळी ज्या भागात मुक्तपणे वावरत असत त्याच भागात वाढलेला पोलिसी कारवायांचा दबदबा, शरणागतांसाठी पुनर्वसनाच्या आकर्षक योजना इत्यादी कारणांमुळे नक्षली सशस्त्र चळवळीच्या मार्गापासून दूर जाताहेत. शिवाय, बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवामुळे या जिल्ह्यातला सशस्त्र चळवळीचा संदर्भही कमी होत चालला आहे.
मागील काही वर्षांत, महाराष्ट्रातील नक्षली चळवळीला हा मोठा फटका बसला आहे. दंडकारण्यामध्ये त्यांचा प्रभाव क्षेत्र आकुंचित होत आहे. कारण पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या (पीएलजीए) प्रतिकाराची तीव्रता आणि विस्तार क्षमता दोन्ही कमी झाले आहेत. नक्षल पक्ष आणि गनिमांमधील रुंदावत जाणारी दरी, नवीन सदस्यांची कमी होत असलेली संख्या आणि चळवळ सोडून शरण जाणाऱ्यांची वाढती संख्या, या सगळ्यामुळे नक्षल्यांवर निदान महाराष्ट्रात तरी कठीण काळ आल्याचे प्रत्ययाला येते.
मारल्या गेलेल्या नक्षल्यांवर एक कोटी वीस लाखांचं इनाम आहे. हे बक्षीस फक्त संबंधित खबऱ्यांनाच मिळेल की पोलीस व खबऱ्यांमध्ये विभागले जाईल हे सध्यातरी स्पष्ट नाही. या व्यतिरिक्त गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पोलीस व पोलीस वेल्फेयरसाठी 51 लाखांचे तत्काळ अनुदानही जाहीर केले आहे. ही बक्षिसे संबंधितांना रोख मिळतील याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र हे पथक इन्व्हिन्सीबल नसून त्यांचे बरेच जवान भूतकाळातील चकमकींमध्ये मारले गेले आहेत. या पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षल्यांना वाटत असल्यामुळे सी 60 मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठी नक्षल्यांनी निवडक उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना मारणे सुरू केले.
– कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)