आमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी राधाआजी. लवकरच देशमुख कुटुंब आणि आमच्या घराची छान मैत्री झाली. हे सगळं जुळून आलं आर्यनच्या आजीमुळे. आजी मला आणि बाळूला अभ्यासालाही त्यांच्याच घरी बोलवत. आमचा अभ्यास त्यांच्यासोबत छान होई. आमची कुठलीही अडचण त्या चुटकीसरशी सोडवत. खूपदा त्या मोठी मोठी पुस्तकं वाचताना दिसायच्या.
एकदा मी न राहावून त्यांना विचारलंच, “आजी, तुम्ही एवढी तासन्तास पुस्तकं वाचत बसता, कंटाळा नाही येत? आणि असं काय असतं एवढं या पुस्तकांत?’ आजी हसून म्हणाली, “शमू, अगं ही पुस्तकं आपले जीवाभावाचे मित्र असतात. या मित्रासोबत वेळ घालवायला मनापासून आवडतं मला. ही पुस्तकं सोबतीला असतात तेव्हा नव्या गोष्टी सांगतात. त्यांच्या सहवासात दिवस आनंदीत होऊन जातात. …समजते, उमजते, विज्ञानाची किमया. शमू, पुस्तक जणू एक अजबच दुनिया.
पुस्तकातली गोष्ट, खाऊइतकीच गोड
जीवनाला देते ती, आनंदाची जोड
निळेभोर आकाश, सूर्य, चंद्र, तारे,
पुस्तकातून भेटतात, अगं, जवळून सारे.’
आजी पुस्तकांबद्दल भरभरून बोलत होती. कित्ती छान उलगडून दाखवलं तिने पुस्तकांचं नवं जग.
एकदा काय झालं, आर्यनच्या घरी मी, बाळू आणि आर्यन अभ्यासाला बसलो होतो. आमच्या तिघांचाही अभ्यास झाल्यावर बाळू आजीला म्हणाला, “आजी आज आम्हाला एक गोष्ट सांग ना. तू कित्ती पुस्तकं वाचतेस, त्यातलीच एखादी सांग.’ मग मी आणि आर्यननेही गोष्टीसाठी आजीकडे हट्ट धरला. आजी हसून म्हणाली,” सांगते, सांगते… पण आधी मला काही प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्यायची, चालेल?’ “हो हो चालेल’ आम्ही तिघेही एका सुरात म्हणालो. मग आजी म्हणाली, “सिंहाचे सामर्थ्य सांगा बरं कशात?’ बाळू पटकन म्हणाला, “त्याच्या धारदार दातात.’ “छान! हत्तीचे बळ सांगा बरं कशात?’ मी चाचरतच म्हणाले, “त्याच्या लांब सोंडेत.’
आजी म्हणाली, “शाब्बास! बैलाची शक्ती सांगा बरं कशात?’ आर्यन लगेच म्हणाला, “त्याच्या मोठ्या शिंगात.’ आजी म्हणाली, “बरोबर! …आता सांगा, माणसाची ताकद सांगा बरं कशात?’ इथे मात्र आम्ही तिघेही जण एकदम गप्प झालो. आमचे विचारी का बिचारी झालेले चेहरे पाहून आजी म्हणाल्या, “अरे, माणसाची ताकद त्याच्या हुश्शार डोक्यात.’ बाळू पटकन म्हणाला, “अगदी, खरंय आज्जी. डेव्हिड आणि गोलिआथ या गोष्टीत एका छोट्या मुलाने आपल्या अक्कल हुशारीनेच त्रास देणाऱ्या राक्षसाला चांगलीच अद्दल घडवली, वाचलीय मी ही गोष्ट.’ आजीने आता पुढचा प्रश्न टाकला, “पण हुश्शार डोक्याचं रहस्य काय?’ इथेही आम्ही तिघं पुन्हा मूग गिळून बसल्यासारखे गप्प. मग आजीच म्हणाली, “अरे, हुश्शार डोक्याचं रहस्य… पुस्तकाशिवाय दुसरं आहेच काय! पुस्तकं करतात डोक्याला सुपीक, हुशारीचं येतं, मग खूप पीक.’ इथंसुद्धा आजीने पुस्तकांचं महत्त्व बोलता बोलता, आम्हाला सहज समजेल असं सांगितलं. मग आजीने एका कोकीळ पक्ष्याची गोष्ट सांगितली. काव्यात्मक. जणू ती तालकथाच. आजी म्हणाली,
उन्हातला वाटसरू आला, झाडाच्या सावलीत
थंडगार वाऱ्याला तो, बसला बोलावीत
वाटलं त्याला झाडाखाली, करावा थोडा आराम
जास्त नको थोडाच, कारण आराम आहे हराम
ऊन कमी झालं की, निघावं पुढच्या कामाला
कष्टावाचून काही नाही, जाणीव याची त्याला
वळकटी अंथरुन तिथेच, तो झाडाखाली झोपला
ऊन येताच डोळ्यावर, झोप लागेना त्याला
झाडावरील कोकिळ पक्षी, हे सारं होता पाहत
वाटसरूचा व्याकूळपणा, त्यालाही होता जाणवत
त्याने आपले पंख पसरून, किरणांना लपविले
वाटसरूच्या तोंडावर, सावलीला त्याने धरले
वाटसरू आता झाडाखाली, शांत झोपी गेला
हे पाहून कोकीळला, आनंद फार झाला
कोकीळचा हा परोपकार, मनोमनी पेरत जाऊ
त्या दिवसापासून कोकीळ, लागला कुहूकुहू गाऊ
आजीची गोष्ट संपली. आम्ही भान हरपून आनंदाने टाळ्या वाजवल्या. आजी म्हणाली, “मुलांनो, तो कोकिळ त्यादिवसापासून कुहूकुहू गाऊ लागला, कारण ईश्वराने जणू त्याच्या परोकाराचे त्याला सुंदर गळा देऊन एक प्रकार बक्षीसच दिले. आजीने गोष्टीचा अशा प्रकारे केलेला शेवट आम्हाला खूपच भारी वाटला. गोड गळ्याचे बक्षीस.
मी आणि बाळू घरी आल्यावर आजीची गोष्ट आईला सांगितली. बाळू म्हणाला, “आई आर्यनच्या आजी खूप बुद्धिमान आहेत गं. त्यांना सगळंच ठाऊक असतं. आमच्यासाठी जणू त्या चालतंबोलतं पुस्तकच.’ मी हसून म्हणाले, “मी तर त्यांना गूगलआजीच म्हणते. काहीही विचारा, उत्तर लगेच तयार.’
आई हसून म्हणाली, “गूगलआजी… छान आहे नाव. शमे, कसं गं सुचतं बाई तुला हे.’ मी म्हणाले, “अगं, आता आजीचा सहवास लाभलाय ना.’ तिच्या या वाक्यावर घरात हास्याची छान लेकर घुमली.
एकनाथ आव्हाड