हिरे व्यापारी मेहुल चोक्सी साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या कर्जबुडवेगिरीच्या प्रकरणात भारताला हवाय आणि त्याला भारतात आणण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यासाठी घटनाक्रम, वेगवेगळ्या देशांच्या कायद्यांमधील तरतुदी आणि इतर अनेक पैलू लक्षात घ्यावे लागणार आहेत. परंतु हा “हिरा’ ज्या “कोंदणा’त जाऊन बसला होता, तिथून त्याला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेतला “ड्रामा’ निःसंशय चित्तवेधक आहे.
कधीकधी लक्ष्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जास्त मनोवेधक असतो. नीरव मोदी भारतात येणं टाळण्यासाठी अजूनही ब्रिटनमध्ये वेगवेगळे कायदेशीर डावपेच खेळतोय. त्यामुळे आता मेहुल भारतात कधी येईल, हे अजून निश्चित नाही. पण, तशी शक्यता निर्माण होईपर्यंतचा “ड्रामा’ जबरदस्त होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या एखाद्या खर्चिक वेबसिरीजला साजेसा ड्रामा कॅरिबियन बेटांवर 23 मेपासून पाहायला मिळाला.
पंजाब नॅशनल बॅंकेचे साडेतेरा हजार कोटी रुपये बुडवून भारतातून पळालेल्या मामा-भाच्यांपैकी मामा म्हणजे मेहुल चोक्सी याचा पिंजऱ्यातल्या पोपटासारखा फोटो या काळात पाहायला मिळाला. त्याच्या डोळ्यांना इजा झालीय आणि हातावर जखमा आहेत, असं सांगितलं गेलं. कॅरिबियन देशांपैकी डोमिनिका या देशात मेहुलला अटक झाली. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विनापरवाना आमच्या देशाच्या हद्दीत प्रवेश केला म्हणून आम्ही मेहुलला पकडलं. पण खुद्द मेहुल आणि त्याच्या कुटुंबीयांचं मत वेगळंच आहे. त्यांच्या मते, मेहुलचं “अपहरण’ केलं गेलं.
यात भारताचा हात होता आणि हनीट्रॅपच्या माध्यमातून हे अपहरणनाट्य घडवून आणलं गेलं. मेहुलनं ज्या देशाचं नागरिकत्व घेतलंय, त्या अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन म्हणाले की, मेहुल त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन डिनरसाठी आणि मौजमजा करण्यासाठी डोमिनिकामध्ये गेला होता आणि तिथेच पकडला गेला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, त्याची तथाकथित गर्लफ्रेंड बबारा जराबिका तिथून अदृश्य कशी झाली, हे कुुणालाच ठाऊक नाही.
मेहुलच्या वकिलांनी वेगळंच म्हणणं मांडलं. त्यांच्या मते, मेहुल चोक्सी 23 तारखेला बबारा जराबिकाला भेटणार होता. त्यासाठी तो जॉली हार्बर परिसरात गेला होता; पण जिथं भेट होणार होती, त्या रेस्तॉच्या दिशेनं जात असतानाच तिथूनच अँटिग्वाच्या पोलिसांनी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी मेहुलचं अपहरण केलं. म्हणून त्याची आणि बबाराची भेट झालीच नाही.
वकिलांच्या मते, या दोघांच्या गेल्या वर्षभरापासून गाठीभेटी होतायत; पण त्यांच्यात मैत्री आहे, प्रेमसंबंध आहेत, व्यावसायिक संबंध आहेत की गुंतवणुकीच्या संदर्भात त्यांच्या गाठीभेटी होतात, हे वकिलांनी सांगितलेलं नाही. बबारा ही अँटिग्वामधील एक यशस्वी महिला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेली बबारा प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेन्ट सल्लागार म्हणून काम करते. उंची जीवनशैलीसाठी ती ओळखली जाते. आलिशान यॉटमध्ये स्वार होऊन समुद्रात विहार करत राहणं हा तिचा आवडता छंद.
सोशल मीडियावर तिचे यॉटवरचे फोटो तर दिसतातच; शिवाय अत्यंत महागड्या हॉटेलांमधले आणि हेलिकॉप्टरमधले फोटोही ती इन्स्टाग्रामला टाकते. मेहुलशी तिचे संबंध कसेही असोत; पण मेहुलची श्रीमंती (अर्थातच बॅंक लुटून कमावलेली) हेच तिचं मेहुलशी जवळीक करण्याचं कारण असावं, हे यावरून पटतं.
एका स्थानिक इंग्रजी दैनिकानं छापलेली स्टोरी वेगळीच आहे. या स्टोरीत बबारा हीच मुख्य व्हिलन आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सकाळ-संध्याकाळ मेहुलला भेटत होती. तिनं त्याच्याशी चांगलीच दोस्ती केली. मेहुलला तिने 23 मे रोजी आपल्या घरी बोलावलं. तो तिच्या घरी पोहोचताच तिथं आधीच दबा धरून बसलेल्या काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि मारहाण करत त्याचं अपहरण केलं.
खुद्द मेहुल आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं अपहरण केल्याचाच दावा केलाय. अपहरणकर्त्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारे “टॉर्चर’ केलं आणि लॉंचमध्ये बसवूनच त्याला डोमिनिकामध्ये नेलं, असं मेहुलच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एवढंच नव्हे, तर ज्या तुरुंगात त्याला ठेवलं गेलं, तिथल्या कैद्यांनीही त्याला झोडपून काढलं म्हणे!
अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिलेली माहिती या माहितीशी बिलकुल जुळत नाही. त्यांच्या मते बबारासोबत मेहुल मौजमजा करायला डोमिनिकामध्ये गेला आणि पकडला गेला. एवढं सांगून ते थांबले नाहीत. मेहुलला अँटिग्वात परत पाठवण्याची काही गरज नाही, त्याला थेट भारतात पाठवा, अशी विनंती त्यांनी डोमिनिका सरकारला केली. अँटिग्वा सरकारचं मेहुलला मिळालेलं संरक्षण आता काढून घेतलं गेलंय आणि त्यामुळंच त्याला डोळ्यासमोर भारत आणि पंजाब नॅशनल बॅंक दिसू लागली, अशी चर्चा या विनंतीमुळंच सुरू झाली.
भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, अँटिग्वातून डोमिनिकामध्ये गेल्यानंतर मेहुलला अटक झाली आणि ते समजल्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सीबीआयसह अन्य अधिकाऱ्यांची टीम एका खास विमानातून डोमिनिकाला रवाना झाली. अँटिग्वाचं नागरिकत्व घेतलेल्या या “हिऱ्या’च्या स्टोरीचा हा आणखी एक पैलू. हा पैलू आणखी एका कारणामुळे जरा जास्तच चर्चेत आला. ते कारण म्हणजे या “हिऱ्या’ला आणायला गेलेलं विमान.
अर्थात, या विमानाबाबत सुरू असलेल्या चर्चांना भारत सरकारनं दुजोरा दिला नाही; पण हे खासगी विमान अत्यंत महागडं आहे, हा चर्चेचा केंद्रबिंदू आहे. “बॉम्बार्डियर ग्लोबल-5000′ जातीचं हे जेट विमान एक तास हवेत राहिलं तर 8.46 लाख रुपये मोजावे लागतात, असं “मनीकंट्रोल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत चार्टर कंपनीचा हवाला देऊन सांगितलं गेलं. हा खर्चसुद्धा दिल्लीहून अँटिग्वाला थेट जाण्यासाठीचा आहे. ट्रॅव्हल कंपन्यांच्या मते अँटिग्वाला जाण्यासाठी दोनदा थांबावं लागतं,
कारण हे विमान एका वेळी 9 हजार 260 किलोमीटर अंतर कापू शकतं आणि अँटिग्वापर्यंतचा एकंदर प्रवास 52 तासांचा आहे. या विमानाबद्दल जी चर्चा आहे, ती खरी असेल तर या “मौल्यवान हिऱ्या’ची वरातसुद्धा जंगी स्वरूपात काढायचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असावा, असंच म्हणावं लागेल. कतार एअरवेजची शाखा असलेल्या कतार एक्झिक्युटिव्हकडून हे जेट भाड्यानं घेतलं गेल्याचं बोललं जातंय. या विमानात तेरा जण बसू शकतात.
“मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं की, भारतातसुद्धा खासगी जेट विमानं मोठ्या संख्येनं आहेत. त्यातलं कोणतंही विमान या कामी नेमता आलं असतं. परंतु काही कारणांमुळे भारतीय विमान पाठवायचं नाही, असा निर्णय घेतला गेला. या प्रवासात आणखीही अनेक प्रकारचं शुल्क भरावं लागतं. उदाहरणार्थ, प्रतिदेश सुमारे 5 लाख 11 हजार रुपये उड्डाणशुल्क भरावं लागतं. जितके दिवस हे विमान अँटिग्वामध्ये राहील, तितकं शुल्क प्रतिदिन 1 लाख रुपयांच्या हिशोबानं भरावं लागतं म्हणे!
ही झाली खर्चाची बाजू. मेहुलच्या अटकेबाबत वेगवेगळ्या कहाण्या ऐकल्यानंतर त्याला परत आणणं किती खर्चिक आहे, याची ही झलक. आता पाहूया कायदेशीर बाजू. “मेहुल नेमका कुणाचा,’ हा प्रश्न कायदेशिरदृष्ट्या अधिक महत्त्वाचा. भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मेहुल (अजूनही) भारताचा नागरिक आहे. मेहुलने पासपोर्ट सरेंडर केलाय; पण भारताने तो स्वीकारलेला नाही. परंतु भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 च्या कलम 9 नुसार जो भारतीय नागरिक स्वेच्छेनं अन्य एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतो, त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होतं. या दृष्टीनं विचार केला तर मेहुलने अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलंय.
अँटिग्वा सरकारने त्याचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केलीय. परंतु या प्रक्रियेला मेहुलने अँटिग्वाच्या कोर्टात आव्हान दिलंय. पासपोर्ट अधिनियम 1967 अन्वये भारतीय पासपोर्टधारकाने एखाद्या अन्य देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, तर त्याने भारतीय पासपोर्ट तातडीनं जवळच्या भारतीय मिशनकडे जमा करणं अनिवार्य आहे. याखेरीज भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 अन्वये दुहेरी नागरिकत्वाला अनुमती नाही. म्हणजेच, भारतीय कायद्यानुसार मेहुल एकाच वेळी भारताचा आणि अँटिग्वाचा नागरिक असू शकत नाही.
अँटिग्वामध्ये मात्र मेहुलने भारतीय पासपोर्ट सरेंडर केलाय की नाही, याला बिलकुल महत्त्व नाही.
डोमिनिकामध्ये मेहुल चोक्सीला पकडण्याचं आणि त्याच्यावर खटला भरण्याचं कारण आहे, त्यानं डोमिनिकाच्या हद्दीत बेकायदा प्रवेश करणं. तिथल्या कायद्यानुसार याच गुन्ह्यासाठी सुनावणी होणार. मेहुल म्हणणार, मी अँटिग्वाचा रहिवासी आहे, मला तिकडेच पाठवा! अँटिग्वा सरकार म्हणतंय, मेहुलला थेट भारतात पाठवा. त्याचं नागरिकत्व रद्द करण्याची कायदेशीर प्रक्रिया मात्र अँटिग्वामध्ये अजून पूर्ण झालेली नाही. म्हणजे, मेहुलने त्या प्रक्रियेला आव्हान दिलंय. तो निकाल येईपर्यंत त्याला अँटिग्वाच्या ताब्यात द्यायचं की भारताच्या, हा प्रश्न डोमिनिकामधल्या कोर्टाला पडणं स्वाभाविक आहे.
भारताच्या अधिकाऱ्यांना आता एकच काम करायचंय. मेहुल हा एक पळालेला गुन्हेगार असून, त्याच्यावर भारतात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गुन्हे दाखल आहेत, हे डोमिनिकाच्या कोर्टाला पटवून द्यावं लागेल. अँटिग्वाचं नागरिकत्व मिळवण्यामागे त्याचा एकमेव हेतू भारताच्या हाती न लागणं हाच होता, हेही कोर्टाला पटवून द्यावं लागणार आहे.
चोक्सीच्या विरोधात इंटरपोलनेही नोटीस काढली असून, त्याला भारताकडे सोपवण्यासाठी तो एक मजबूत आधार असू शकतो, असं काही अधिकारी सांगतात. सध्या मेहुलचा जामीन नाकारला गेला असून भारतात आणण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार आहे. या सगळ्या गुंत्यातून नेमकं काय घडतं, हेच आता पाहायचं!
– श्रीकांत देवळे