भाषा जिला वैखरी असंही म्हणतात. आपले सगळे व्यवहार चालतात ते केवळ भाषेमुळे. बोलता न येणाऱ्यांची ही भाषा असते. भाषा नसती तर काय झालं असतं असं कधी कधी मनात येतं, हो ना! आपल्या प्रत्येक क्रियेला एक विशिष्ट शब्द आहे. ते जर उलट सुलट वापरले गेले, तर किती मोठा गोंधळ होईल कल्पना देखील करवत नाही.
पल्याकडे दर बारा कोसांवर भाषा बदलते, म्हणजे भाषा तरी किती आहेत. एकच वस्तू किंवा एकच क्रिया; पण प्रत्येक भाषेत शब्द वेगळा. अर्थ मात्र एकच. काही भाषा ऐकायला कठोर वाटतात तर काही अगदी मधुर. कारण शब्द उच्चारण्याची पद्धत वेगळी. ही सवय आपल्या अंगवळणी पडते. आपल्या जिभेला तसे वळण लागते. भाषा शब्दांतून व्यक्त होत असते.
लहानपणी मोठ्या माणसांचं निरीक्षण करून तसेच शब्द बोलायचा मूल प्रयत्न करते. मोठ्यांना मुलांशी त्यांच्या बोबड्या भाषेत बोलायला आवडतं.
यांत्रिक, यंत्रांविषयीची भाषा वेगळी, खेळाची भाषा वेगळी अगदी इतकंच कशाला, प्रत्येक भाषेतल्या शिव्याही वेगळ्या असतात. भांडणाची भाषा वेगळी आणि प्रेमाची भाषा वेगळी. काय गंमत असते ना, आपण आपल्या भाषेपेक्षा इतर भाषांमधले सिनेमे बघतो तेव्हा भाषा कळत नसली तरी कृतीतून अर्थ समजून घेत असतो.
प्रत्येक व्यवसायाची भाषा वेगळी, त्यात विशिष्ट शब्द जे त्या व्यवसायाशी संबंधित असतात. जे कधी कधी मुद्दाम तयार केले जातात. अशीच एक भाषा म्हणजे तरुणाईची. त्यातले शब्द केवळ तरुणांना कळतात. ऐकणारी मोठी माणसं ते ऐकून बुचकळ्यात पडतात. कधीकधी एखादी व्यक्ती असंबद्ध शब्द वापरते की नक्की काय म्हणायचं तेच कळत नाही, भाषेची अशीही गंमत असते. नाटक आणि चित्रपटातल्या खलनायकाची भाषा वेगळी. या प्रत्येक भाषेचा कोश करायचा ठरवला तर अनेक कोश निघतील.
कार्यकर्ते पोटतिडकीने बोलत असतात, हे त्यांच्या शब्दांच्या उच्चारांवरून कळते. नेत्यांची भाषा वेगळी असते. ते ठामपणे हो म्हणत नसले, तरी नाही म्हणून नाराज करत नाहीत. आश्वासन देतात. रागाची भाषा, प्रेमाची भाषा, आपुलकीची भाषा ही समोरच्या व्यक्तीला केवळ ती कशी उच्चारली जाते यावरून कळतं. याशिवाय प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा जी आपल्या मनात उत्सुकता निर्माण करते, हे नक्की. पक्षी परस्परांशी काय बोलत असतील, त्यांच्यात काय संवाद होत असतील.
कवितेची भाषा वेगळी. थोडक्या शब्दात खूप काही सांगणारी. शब्दांच्या पलीकडचे सांगणारी.
शब्द शब्द जुळवूनी वाचिते तुझ्या मना शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडचे इतकं सामर्थ्य भाषेत असतं. धीर देणारी भाषा, अपमानाची भाषा, डॉक्टरांची आस्थेची भाषा सगळं मनाला स्पर्शून जातं. एखादी व्यक्ती नीट बोलत नसेल तर त्याला, “काय तुझी भाषा’ असं म्हटलं जातं. गोड बोलणारी व्यक्ती इतरांचं मन जिंकून घेते. खेळात नवे शब्द शोधून काढले जातात. कारण ते आपल्या भाषेत आणायचे असतात. भाषांतर करताना दोन्ही भाषेतील शब्द अगदी चपखलपणे वापरावे लागतात. कारण भावार्थ बदलून चालत नाही.
सोशल मीडिया आले, त्याची भाषाच वेगळी. तिथे तर पूर्ण शब्द वापरायला परवानगीच नाही. ती भाषा समजून घेणं म्हणजे दिव्यच. त्याला भाषेची तोडफोड म्हणतात. लेखनाची भाषा प्रमाण भाषा असते. आदर दाखविण्याची भाषा वेगळी, सन्मान देण्याची भाषा वेगळी, कौतुकाची भाषा तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना कळते. माणसं अधिकाधिक एकमेकांच्या जवळ यावीत म्हणून सगळेच देश परकीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात. वेगवेगळ्या आर्थिक वर्गातील भाषाही वेगळी असते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित यांचंही बोलणं, वापरले जाणारे शब्द वेगळे असतात.
आपल्याला भीती वाटली किंवा अगदी एखादं गाणं आवडलं तरी “अंगावर काटा आला’, असं म्हटलं जातं. भाषा हिंस्त्र होते कशी तर हातपाय मोडून ठेवीन, जीभ हासडून ठेवीन, डोळे फुटले का, असे शब्दप्रयोग केले जातात. मनाचं वर्णन करताना मन हळवं झालं, मनावर मोरपीस फुललं, असं म्हटलं जातं.
काळानुसार भाषेत बदल झाला. वेगळे शब्द वापरले जाऊ लागले. मराठी भाषा संस्कृत प्रचुर आहे पण तिचे रूप हळूहळू बदलत गेले. एखाद्या अनोळखी प्रदेशात गेल्यावर तिथली भाषा येत असेल तर लवकर सामावून जाता येते. नुसती कल्पना करून बघा की भाषा नसती तर!
डॉ. नीलम ताटके