नेपाळमध्ये नुकतेच सत्तांतर झाले. त्यानंतर तेथील संसदेने केलेला ठराव भारताची चिंता वाढवणारा आहे. त्यातच नेपाळमध्ये चीनने जी गुंतवणूक केली, दळणवळण गतिमान केले, ते भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक असताना आता वाढते विमान अपघातही भारताची चिंता वाढवित आहेत. दुर्दैवाने विमान अपघातात बळी जाणाऱ्यातही भारतीय अधिक आहेत.
नेपाळमधील पोखरा येथे नुकताच विमान अपघात झाला. या अपघातात 72 जणांचा बळी गेला. जगातील ज्या दहा एअरलाइन्स आणि विमानतळे जास्त असुरक्षित मानली जातात, त्यात नेपाळचा समावेश होतो. आता अपघाताची वेगवेगळी कारणे पुढे येत असली, नवं तंत्रज्ञानातील अनभिज्ञता हे त्यातले एक कारण असल्याचे पुढे आले आहे. गेल्या तीस वर्षांत नेपाळमध्ये 28 विमान अपघात झाले, या हवाई अपघाताने एकाच वेळी शेकडो बळी जातात. नेपाळमधील हवाई प्रवास धोकादायक असल्याचे सांगितले जाते. त्याची कारणे तेथील हवामान, डोंगराळ भाग आणि कमी दृश्यमानता अशी आहेत.
नेपाळमध्ये दरवर्षी विमाने कोसळत असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे येथील खडकाळ डोंगराळ भाग. त्यामुळे विमान अपघाताचा धोका वाढतो. नेपाळमधील बहुतेक धावपट्ट्या डोंगराळ भागात आहेत. नेपाळमधील हवामानातील अचानक बदलही विमानांसाठी धोका वाढविण्याचे काम करतात. नेपाळमध्ये पुरेसा प्रशिक्षित सिव्हिल एव्हिएशन स्टाफ नाही. विमानसेवा चालविण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गही नाही. ज्याचा थेट परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर होत आहे. नेपाळमध्ये नवीन विमानांसाठी पायाभूत सुविधा आणि त्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीची कमतरता आहे.
2013 मध्ये, युरोपीयन संघटनेने नेपाळच्या सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यास बंदी घातली होती. याशिवाय युरोपीयन संघटनेने नेपाळी एअरलाइन्सला 28 देशांमध्ये उड्डाण करण्यावर बंदी घातली होती. नेपाळ सरकारच्या अपयशामुळे देशाची विमाने युरोपीय संघाच्या काळ्या यादीतून बाहेर पडू शकत नाहीत. “एव्हिएशन सेफ्टी डेटाबेस’च्या अहवालानुसार नेपाळमध्ये गेल्या तीस वर्षांत 28 विमान अपघात झाले आहेत. त्यापैकी वीस अपघात गेल्या दशकात घडले आहेत.
सर्वाधिक विमान अपघात याच भागात झाले आहेत. जुन्या नोंदी पाहिल्यास, काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ समुद्रसपाटीपासून 1,338 मीटर उंचीवर आहे आणि येथे सर्वाधिक प्राणघातक विमान अपघात झाले आहेत. हा भाग अधिक जोखमीचा आहे, कारण तो एका अरुंद अंडाकृती आकाराच्या दरीत आहे आणि तो उंच आणि टोकदार पर्वतांनी वेढलेला आहे. बहुतांश म्हणणे आहे की, डोंगर, दरी आणि अरुंद धावपट्टीमुळे येथे विमान नेणे अवघड आहे. इथे छोटी विमाने आणता येतात; पण मोठी जेटलाइनर आणता येत नाहीत. नेपाळमधील नव्याने बांधलेल्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान कोसळले. या विमानात चार क्रू मेंबर्ससह एकूण 72 लोक होते. अपघाताचा बळी ठरलेले विमान राजधानी काठमांडूहून पोखरा येथे जात होते.
पोखरा विमानतळाचे उद्घाटन नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच झाले होते. विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी ते क्रॅश झाले. काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरा शहराला नेपाळच्या सुंदर अन्नपूर्णा पर्वतराजीचे प्रवेशद्वार म्हटले जाते. पोखरामध्ये 1958 पासून विमानतळ असले, तरी नेपाळमधील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या शहरात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज भासू लागली होती. 2016 मध्ये पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या विमानतळाचे उद्घाटन एक जानेवारीलाच झाले.
पोखरा विमानतळावरून नेपाळमध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरू होती. या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्देश आंतरराष्ट्रीय दळण वळण प्रस्थापित करणे हा होता. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण झालेले नाही. नेपाळने हे नवीन विमानतळ चीनच्या सहकार्याने बांधले आहे. अशा परिस्थितीत भारतालाही याबाबत स्वतःची चिंता आहे. चिनी कंपनी “सीएएमसी’ ने सुमारे 22 अब्ज नेपाळी रुपये खर्चून हे विमानतळ बांधले आहे. या विमानतळाच्या उभारणीसाठी चीनच्या “एक्झिम बॅंके’कडून कर्ज घेण्यात आले होते. विमानतळाच्या उभारणीसाठी नेपाळला चीनकडून अनुदानही मिळाले आहे. या विमानतळाची क्षमता ताशी सहाशे प्रवासी हाताळण्याची आहे.
विमानतळ सुरू होण्यापूर्वी, या प्रकल्पाचे प्रमुख विनेश मुनकर्मी यांनी सांगितले, की हे विमानतळ एका वेळी तीन आंतरराष्ट्रीय विमाने, चार लहान आणि आठ देशांतर्गत विमाने हाताळू शकते; परंतु वास्तविक क्षमता यापेक्षा जास्त असेल. अडीच हजार मीटर लांबीच्या या विमानतळावर एकच धावपट्टी आहे. या धावपट्टीवर बोईंग 737-700, एअरबस ए 320 आणि बोईंग 757-200 सारखी मोठी विमाने येतात. 24 तास काम करण्यास सक्षम असलेल्या या विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंगसाठी पॅराग्लायडिंग क्षेत्रदेखील आहे. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ अरुंद दरीत बांधलेले आहे.
अशा स्थितीत येथून मोठ्या विमानांचे आगमन-निर्गमन विषयीचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पोखरा खोऱ्यात पूर्वेकडूनच विमाने टेकऑफ किंवा लॅंड होऊ शकतात. अशा परिस्थितीत, रुंद विमानांऐवजी, येथून केवळ 180 आसन क्षमतेची विमाने उतरवता येतील. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी कॉंक्रीटची आहे. तसेच नेपाळमधील ही पहिली कॉंक्रीट धावपट्टी आहे. प्रकल्पाचे प्रमुख विनेश मुनकर्मी यांच्या म्हणण्यानुसार, की धावपट्टी कॉंक्रीटची बनवण्यात आली आहे. कारण त्याची देखभाल कमी असते. खोऱ्यात पावसाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कॉंक्रीटची धावपट्टी जास्त काळ टिकेल.
या विमानतळावरून उड्डाणासाठी विमानतळाच्या पूर्वेला असलेली रिठेपाणी टेकडी कापण्यात आली आहे. या टेकडीवर झाडेही होती. ती तोडण्यामुळे पर्यावरणाची चिंताही व्यक्त करण्यात आली होती. भारतातून उड्डाणाला अद्याप परवानगी नाही. नेपाळच्या बुद्ध एअरलाइन्सला या विमानतळावरून भारतातील वाराणसी, दिल्ली आणि डेहराडून शहरांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करावयाची आहेत. बुद्ध एअरने प्रथम वाराणसी आणि नंतर दिल्ली आणि डेहराडून येथून उड्डाण करण्याचा मानस आहे. बुद्ध एअरला अद्याप भारताकडून उड्डाणाची परवानगी मिळालेली नाही. बुद्ध एअरला एक जानेवारीपासून वाराणसीसाठी चार्टर्ड फ्लाइट सुरू करायची होती; पण भारताकडून परवानगी मिळालेली नाही. हा विमानतळ यशस्वी होऊ नये, अशी भारताची इच्छा असल्याचा दावा नेपाळी मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात आला आहे. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनच्या गुंतवणुकीबाबत भारताला भीती वाटत आहे. त्याचे कारण या विमानतळाचे सामरिक महत्त्व.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे; मात्र विमान प्रवास सुरू झाल्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच मोठा विमान अपघात झाल्याने या विमानतळाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नेपाळच्या “एव्हिएशन अथॉरिटी’ने अपघातानंतर लगेचच एक निवेदन जारी करून सांगितले की, खराब हवामानामुळे हा अपघात झालेला नाही. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून नेपाळला भारत आणि चीनमधील पर्यटकांना आकर्षित करायचे आहे. मात्र, या विमानतळाच्या आर्थिक यशाबाबत यापूर्वीच प्रश्न उपस्थित झाले आहेत. केवळ कर्जावरचे व्याज भरण्यासाठी विमानतळाला दरवर्षी अडीच अब्ज नेपाळी रुपयांची गरज आहे. चीनमधील या विमानतळावरून उड्डाणे करण्याबाबत काही शंका आहेत; मात्र भारत येथून विमानांना परवानगी देणार का, हा खरा प्रश्न आहे.
भारताने यति ग्रुपच्या हिमालयन एअरलाइन्सला भारतात उड्डाण करण्याची परवानगी दिलेली नाही. या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या संकोचाचे आणखी एक कारण म्हणजे येथील हवाई मार्ग फारसा सोपा नाही. हिमालय पर्वतीय प्रदेशात हवाई मार्ग अत्यंत अवघड आहे. त्यामुळेच नेपाळमधील सिद्धार्थनगर (भैरहवा) येथील गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्यास आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. आतापर्यंत भारताने नेपाळच्या या विमानतळांना सोपे मार्गही दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक गणिताबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच नेपाळमध्ये नागरी विमान वाहतूक सेवा जीवघेण्या वळणावर आली आहे.
– आरिफ शेख