“रानातनं यायला मला उशीर व्हईल. तू साळेतनं आलीस की; अंगणातलं लोटून काड अन सडा टाकून घ्ये. देवापाशी अन तुळशीसमोर वात पेटीव. पर ध्यानात ठीव हातपाय धुतल्याबिगर देवापाशी जाऊ नगस.’ रुंजीने कडब्याची पेंड आपल्या आईच्या डोक्यावर ठेवली. एका हाताने डोक्यावरचा भारा सावरत, गाईचा दोर ओढत विठाबाई निघाली. रुंजीने पाठीमागून आवाज दिला. “आई, मला एक इचरायचं व्हतं.’ “तुजं आता काय येवढ्या गटमटीत? सांच्याला घरला आल्यावर इचार काय इचरायचं त्ये.’
वाटेत नेहमीप्रमाणे राधा तिची वाट बघत उभी होती. दगडधोंड्याची वाट तुडवत दोघी चालू लागल्या. रुंजी खाली मान घालून कसल्यातरी विचारात एकेक पाऊल टाकत होती. “रुंजे, अगं भराभरा पाय उचल.’ तरीही रुंजी आपल्याच तंद्रीत. “अगं ये बये. म्या तुलाच बोलत हाय. काय झालंय? आज लईच गपगप हाईस.’ एकदाची रुंजीने मान वर केली. “काय न्हाय. मंगलचा इचार करत व्हते.’ “कसला?’ रुंजीने इकडंतिकडं पाहिलं. दबक्या आवाजात ती बोलणार तेवढ्यात सायकलच्या घंटीचा आवाज करत पोरांचा घोळका त्या दोघींच्यामधून वाट काढत निघून गेला. अंग चोरून तगराच्या झाडाला टेकून उभी राहिलेली रुंजी पुन्हा राधाजवळ आली.
तिने आजूबाजूला बघत कानोसा घेतला आणि कानात कुजबुजू लागली. “तिला काल कावळा शिवला म्हणं.’ राधा कुतूहलाने रुंजीच्या तोंडाकडं पाहत होती. “म्हंजी?’ “नाय म्हाईत. काल रातच्याला तिच्या घरी गेलते. म्हणत व्हती, अजून पाच दिस तिची आई तिला शाळत नाय धाडणार. दोन हात लांबूनच बोलत व्हती. ओसरीवरच पुस्तक ठिवून आले.’ “अगं, पर कालच्याला तर आपण मिळूनच घरला आलो. मंग कवा शिवला असल कावळा? अन शिवला मनून काय व्हतंय? शाळला बी नाय व्हय यायचं!’ “त्योच प्रश्न मला बी पडलाय.
सकाळच्याला आईला इचारणार; पर ती रानात निघून गेली.’ रुंजीने खाली वाकून एक दगड उचलला आणि झाडावर बसलेल्या कावळ्याच्या दिशेने भिरकावला. राधा हसून, “बरं झालं दगड मारलास. न्हायतर तुला बी शिवला असता.’ तशी रुंजी, “म्या बरी शिवून दिल.’ तेवढ्यात राधाला काहीतरी आठवलं आणि चालता चालता तिने रुंजीच्या हाताला धरून थांबवलं. “रुंजे, माज्या मोठ्या ताईला पण दर महिन्यात कावळा शिवतो. कसा अन कुटं त्ये नाय म्हाईत.
तवा आमची आक्काच घरातलं समदं काम करती. सैपाक, धुणं-भांडी अन देव सुदिक तीच धुती. ताईला कसलंच काम नसतं पाच-सहा दिस. फकस्त उंबऱ्या भाइर पोतं हातरून ती बसून असती.’ “मंग तू तुज्या ताईला का न्हाईस इचारलंस?’ “इचारलं व्हतं. तर ती फकस्त लाजून हसली अन म्हणाली, “आई सांगल तुला येळ आल्यावर.’ “म्हंजी कसलंच काम नसतं व्हय तुज्या ताईला?’ “भुईवर झोपून ऱ्हायचं तेवढंच!’ “मंग कावळा शिवलेला चांगलंच म्हनायचं. घरातल्या समद्या कामातनं सुट्टी.’ रुंजीने मागे वळून उंबराच्या झाडाकडं पाहिलं. “म्या उगाच त्याला हुसकावलं मगाशी.’ असं म्हणून रुंजी हसू लागली. “हितंच बोलत बसलो तर शाळा भरून जाईल. चल आता.’
दोनेक तास होऊन गेले. गुरुजीने फळ्यावर लिहिलेलं मुलं आपल्या वहीमध्ये उतरून घेत होती. रुंजी मात्र बाकड्यावर डोकं ठेवून डोळे मिटून बसली होती. राधाने तिला चिमटा काढत हळूच विचारले. “रुंजे, काय झालं?’ रुंजीने आपले पोट दाबत, “पोटात लय दुखायला लागलंय.’ “अगं पर शाळत येताना तर बरी व्हतीस की.’ “म्हाईत नाय. पर पोटात कसनुसं व्हतंय. पाठ पण दुखायला लागलीय.’ तेवढ्यात गुरुजींनी आवाज दिला. “रुंजी, काय झालं? बोलत का बसलीस?’ गुरुजींच्या आवाजाने रुंजी दचकली आणि उठून उभी राहिली.
“गुरुजी पोटात लय दुखतंय.’ “अचानक काय झालं?’ रुंजी काही न बोलता खाली मान घालून उभी होती. “घरी जायचंय का?’ “हम्म’ म्हणून तिने फक्त मान हलवली. “एकटी जाशील ना? का सोबत पाठवू कुणाला?’ “जाईल मी एकली.’ “बरं जा.’ गुरुजींनी फळ्याकडं तोंड वळवताच ओटीपोटाजवळ दप्तर घट्ट धरत आणि भिंतीकडं पाठ करत दबक्या पायांनी रुंजी वर्गाबाहेर पडली.
ऊन डोक्यावर आलं होतं. अंगाची लाहीलाही होत होती. शरीरातला “तो’ ओलावा तिला पहिल्यांदाच जाणवत होता. वसंत बहरण्यास सुरुवात होताच जणू झाडावर निसर्गाने सुंदर हिरवागार साज चढवावा; त्या झाडाची पानगळ होत जावी आणि नवीन पालवी फुटताना त्याने आणखीनच बहरत जावे! पालवी फुटण्याचं वरदान निसर्गाने जसं त्या झाडांना दिलं होतं; तसंच एका स्त्रीलाही दिलं होतं! कळीच्या गर्भातून फुल उमलण्याचं भाग्य जसं त्या झाडांच्या नशिबी; तसंच मातृत्वाचा अधिकार फक्त स्त्रीलाच! पालवी फुटताना त्या झाडावर पक्षी बसतातच की!
आणि माणूस त्याच्या सावलीला विसावतोच की! पण मग स्त्रीला पालवी फुटायला लागली की; तिच्या भोवती शिवाशिवचा वेल कुठून बरं उगवतो? आणि तिची साधी सावली जरी त्याच माणसाच्या अंगावर पडली; तर मग त्याला “विटाळ’ तो काय असतो; तो कसा बरं होतो?
रुंजीने खाड्कन दार उघडले आणि बाजेवर आपली पाठ टाकली. छातीतली धडधड तिला आणखीनच कावरीबावरी करत होती. “पायाला गोळे का आल्यात? रोज तर येवढंच अंतर चालते.’ तिची नजर कपड्यावर पडलेल्या डागांवर गेली, तशी ती ताड्कन उठून न्हाणीमध्ये शिरली आणि भसाभसा अंगावर पाणी ओतून घेऊ लागली. शरीरावरचं मळभ धुऊन गेलं होतं; पण मनावरचं मात्र तसंच होतं! आपल्या अंगाचं मुटकुळं करून घेत ती तशीच पडून राहिली. कधी डोळा लागला तिला कळलंच नाही. बऱ्याच वेळाने रुंजीला जाग आली.समोर बघते तर राधा उभी. “तू कवा आलीस?’ “आत्ताच.’ रुंजी उठून बसली. “बरं वाटतंय का?’ “व्हय.’ “असं एकदम काय झालं तुला?’ “कान हिकडं कर.’ म्हणत रुंजीने राधाच्या कानात सांगितलं.
रुंजीने हातात झाडू घेतला आणि अंगण साफ करू लागली. “आज शाळत काय शिकवलं?’ “अंधश्रद्धा म्हंजी काय ह्ये शिकवलं.’ घमेल्यात शेण कालवत, “काय सांगितलं गुरुजींनी?’ “अंगात येणं, नवस म्हणून देवीला बकरं चढवणं, चेटूक झालं म्हणून मारहाण करत केसं उपटणं, मांजर आडवं गेलं की अपशकुन व्हनं. लयी काय सांगितलं.’ रुंजी सडा टाकत ऐकत होती. “रुंजे, म्या गुरुजींना इचारलं की; कावळा शिवणं म्हंजी काय?’ तशी रुंजी सडा टाकता टाकता थांबली आणि राधाकडं रोखून पाहू लागली.”काय म्हणलं गुरुजी?’ “त्ये सांगणार तेवढ्यात शाळा सुटली.’
रुंजीने देवासमोर दिवा लावला. तुळशीसमोर निरंजन लावून दोघी शुभंकरोती म्हणू लागल्या. तेवढ्यात रुंजीची आई आली. गाईला गोठ्यात बांधलं आणि हातपाय धुवायला गेली. “रुंजे, ह्ये लाल पाणी कसलं?’ म्हणून रुंजीला आवाज दिला. रुंजीने तिच्या आईला सगळं सांगितलं. तिच्या आईने रुंजीला कपडे काढायला लावले. रुंजीच्या शरीराला न्याहाळताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. देव्हाऱ्यासमोर उभी राहून तिने हात जोडले.
पण देवासमोरचा पेटता दिवा बघितला आणि पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यात अंगार भरला. “तुझी मती काय शेण खायला गेलती का? केलास ना इटाळ!’ रुंजी घाबरून, “म्या काय केलंय?’ “देव भ्रष्ट केलंस, तुळस करपवलीस. अन तोंड वर करून इचारतेस, म्या काय केलं? तुला कावळा शिवला येवढं बी ध्यानात न्हाई व्हय आलं? थांब तुला चटकाच देते; म्हंजी ध्यानात ऱ्हाईल मरुस्तर.’ असं म्हणून रुंजीच्या आईने दिव्याला काडी लावली आणि तशीच तिच्या हातावर ठेवली. राधा हे सगळं पाहत होती.
रुंजीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. “ह्या पोत्यावर बसून ऱ्हायचं. उंबऱ्याच्या आत यायचं न्हाय.’ रुंजीची आई घरभर गोमूत्र शिंपडत होती. राधाच्या अंगावर देखील तिने दोन-चार थेंब शिंपडले. “उठ. अन कोपऱ्यापस्तुर हिला सोडून ये.’ रुंजी डोळे पुसत उठली आणि राधाबरोबर चालू लागली.
रुंजे, कसा गं शिवला तुला कावळा?’ रुंजीच्या अनुत्तरित नजरेत राधालाही आता तोच प्रश्न सतावत होता. सुन्न होऊन चालणारी रुंजी अचानक थांबली. खाली वाकून तिने एक दगड उचलला आणि रागात त्या कावळ्याच्या दिशेने भिरकावला. एका मागून एक ती वेड्यासारखी दगडं भिरकावत होती आणि राधा भेदरलेल्या नजरेनं तिच्याकडं फक्त बघतंच राहिली…!
-अमोल भालेराव