इसवीसन 18 आणि 19 व्या शतकात सांस्कृतिक पुण्याच्या शुक्रवारपेठेतली “बावन्नखणी’ चाळ हे दर्दी लोकांचे हक्काचे मनोरंजनाचे ठिकाण होते. “बावन्नखणी’ हे पेशवेकालीन सांस्कृतिक केंद्र होते. आजच्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजच्या बाजूला मूळ बावन्नखणीची जागा असल्याचे म्हटले जाते. तेथे बावन्न खणांची दोन मजली इमारतीची चाळ होती. दुमजली, दुपाखी असलेल्या या इमारतीत बावन्न स्वतंत्र खोल्या होत्या. गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या कलावंतींना ही इमारत भाड्याने देण्यात आली होती. सन 1748-1750 मध्ये जिवाजीपंत खासगीवाले या अधिकाऱ्याने बाळाजी बाजीरावांच्या कारकिर्दीत त्यांच्या आदेशाने शुक्रवार पेठेची स्थापना केली.
“नानासाहेब पेशवे यांच्या काळात तत्कालीन कोतवाल जिवाजीपंत अण्णा कोतवाल यांनी उदमी लोकांस कौल देऊन ही पेठ वसवली व वाडा बांधला. शेजारी बावन्न खणांची दुघई दुमजली चाळ बांधली आणि ती जागा कसबिणी व कलावंतिणी यांस राहण्यासाठी भाड्याने दिली. ह्याच्या पूर्वी कसबिणी सर्व शहरात पसरलेल्या होत्या. त्या सर्व ह्यांनी आपल्या सान्निध आणून ठेवल्या. त्याही सर्व एकदम तेथे राहण्यास आल्या. याचे कारण की त्या गृहस्थाकडे कोतवाली होती. त्यावेळच्या कोतवालाचा अधिकार इतका असे की, आता तितका कोणासही नाही. तेव्हा काही जरबेने, काही खुशीने, काही प्रीतीने व ममतेने आल्या असतील. “ही बावन्नखणी पुण्यातील लोकांस व बाहेरील लोकांस माहीत नाही, असे नाहीच. आबालवृद्धास ही जागा ऐकून अथवा प्रत्यक्ष पाहून माहीत आहेच.’ असा स्पष्ट उल्लेख सन 1868 मध्ये प्रकाशित झालेल्या नारायण विष्णू जोशी यांच्या “पुणे शहराचे वर्णन’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
पुण्याच्या विविध ठिकाणी विखुरलेल्या कसबिणी, कलावंतीनींच्या नाच, गाण्यामुळे इतर लोकांना त्रास व्हायचा. अनेक लोक त्या ठिकाणी गुप्तपणे भेट देऊन मनोरंजन करायचे. तो सर्व दंगा एकाच ठिकाणी व्हावा, सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून बावन्नखणी इमारतीची निर्मिती करण्यात आली. काही काळासाठी विसापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठेत पेशव्यांचा स्वतःचा शुक्रवार वाडा, तालीमखाना, पायदळ आणि तोफखाना यासारख्या लष्करी इमारतींसह अनेक महत्त्वाच्या इमारती होत्या. बावन्नखणीच्या इमारतीची मालकीही पेशव्यांकडेच होती. बावन्नखणी किंवा त्या परिसरात राहणाऱ्या चंद्री नायकीण, सगुनी कलावंतीण आणि व्यंकट नरसी यांना पेशव्यांच्या दरबारात विशेष प्रसंगी त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रित केल्या जायच्या. चंद्री नायकीण बाजीरावाच्या खास मर्जीतली होती.
दुसऱ्या बाजीरावच्या विश्रामबागवाड्यातील नाचीच्या दिवाणखान्यात तिच्या नृत्याचे अनेक कार्यक्रम झाल्याच्या नोंदी आढळतात. कोणी पाहुणे मंडळी आली की त्यांच्या पाहुणचारासाठी चंद्रीचा नाच खास आयोजित केला जायचा. अशा नोंदी पेशव्यांच्या कार्यालयातील अभिलेखात आणि पत्रव्यवहारात सापडतात. सगुणी कलावंतीण तर सवाई माधवरावाच्या काळापासून राजदरबारात कला सादर करायची. सवाई माधवरावाची तिच्यावर खास मर्जी होती. एका पत्रात तो लिहितो, “सगुणी कलावंतीण, वस्ती पेठ शुक्रवार, शहर पुणे, इणे दत्ताजी साबळा दाळिंबकर याजकडून दीडशे रुपयांस चहू वर्षांची एक मुलगी खरेदी केली आहे. तिचे जकातीचा आकार माफ केला असे. तरी आकार होईल तो माफ खर्च लिहून जकातीचा तगादा न करणे…’ यावरून पेशवेकाळात लोककलेला राजाश्रय मिळाला होता, हेच स्पष्ट होते.
पेशवे रोजनिशींतल्या अनेक पत्रांत अशा अनेक कलावंतिणींची नावे सापडतात. व्यंकट नरसी या नाचीला प्रचंड लोकप्रियता आणि राजमान्यता मिळाली होती. ती राजनर्तिका होती. तिचे वास्तव्य अनेकवेळा बावन्नखणीतच असायचे. त्याकाळी ती वारांगना म्हणून प्रसिद्ध होती. वाड्यात होणारे मोठमोठे कार्यक्रम, निजाम, इंग्रजांच्या प्रतिनिधींचे स्वागत अशावेळी व्यंकट नरसीलाच बोलविले जायचे. दुसऱ्या बाजीरावच्या एका पत्रात एका उत्सवसमयी तीन दिवस सतत नाच आणि रामचंद्र गोसावी पैठणकर यांचे गायन झाल्याचा उल्लेख आलेला आहे. एका ठिकाणी बाजीरावाने अहोरात्र दोन दिवस नाचवून तिला 26 हजार रुपये बक्षीस दिल्याचीही नोंद सापडते. लखनौमधील नाच गाणी करणाऱ्या कलावंतांच्या कोठ्यांसारखीच बावन्नखणी कोठी होती. लखनौमधली एकेक कोठी म्हणजे राजवाडाच होता. तेथील कोठेवाली एकाचवेळी अनेक नर्तकींना आसरा द्यायची. तशीच एक मोठ्ठी दुमजली, दुपाखी कोठी कलावंतीनीसाठी पेशव्यांनी पुण्यात बांधली, ती म्हणजेच बावन्नखणी होय. पेशवेकाळात बावनखणी पुण्याचे एक सांस्कृतिक केंद्र होते.
नानासाहेब पेशव्यांच्या काळात पेशवाई भरभराटीला आलेली होती. सन 1761 च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. काही वर्षे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला मरगळ आली. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची विस्कटलेली घडी पुन्हा बसविली. दुसरे बाजीराव पेशव्यांच्या काळात त्यांनी शुक्रवारपेठेत आपल्या मौजमस्तीसाठी वाडा बांधल्यानंतर स्वतःच्या मर्जीतल्या कलावंतिणींसाठी बावनखणी परिसरात दुमजली माड्याही बांधल्या. त्याचे अनेक संदर्भ पेशवेकालीन दफ्तरांमध्ये सापडतात. त्याच्या स्वदस्तुरीची एक नोंद सापडते ती अशी, “शुक्रवारचे वाड्यासमोर जागा, घरे आम्ही पूर्वी खरेदी केल्याच आहेत. त्या मोडून सगुणी कलावंतिणीचे घरचे दक्षिणेस व चंद्रीचे घराचे दक्षिणेस व तालिमखाना नवा शुक्रवारचे वाड्यापुढे रस्ता मधी टाकून बांधिला आहे. त्याचे मुकाबिल्यास पूर्व-पश्चिम लांबीचा रस्ता मधी सोडून आम्ही घर बांधून त्यांत कलावंतिणी बिऱ्हाडासारख्या ठेवल्या आहेत. त्या आमच्या घरास साडेनऊ हजार रुपये लागले असत. लौकिकांत ते घर कलावंतिणीचे म्हणवतो. पंरतु ते घर आमचे. कलावंतिणीचे नाही.’
– बाबा बोराडे