वा.कृ. भावे यांनी “पेशवेकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात म्हटले आहे की, “शाहू महाराज हा राजश्वैर्यास सर्वस्वी पात्र असा पुरुष असून, त्याला इतर अनेक कलांप्रमाणे संगीताचीही आवड होती. म्हणूनच त्याने मोठ्या प्रयासाने दूरदूरच्या स्थळांवरून गवई, नट, भाट, नायकिणी इत्यादिकांचा संच जमविला. दिल्ली, उत्तर हिंदुस्थानातील अनेक शहरे गायन वादनाची आगरे होती. यासाठी शाहूने तिकडून गुणीजन मिळविण्याचा प्रयत्न केला. हे काम तो पेशवे व इतर सरदार यांजमार्फत करून घेत असे.’
या संदर्भावरून असा निष्कर्ष काढता येतो की, मराठेशाही किंवा पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात लक्षात रहावी अशी नाच, गाण्यांची परंपरा नव्हती. ज्या लोककला उदयाला आलेल्या होत्या, त्या श्रमपरिहारार्थ शेतावर किंवा शेताच्या बांधावरच आपापल्या गटापुरत्या काम करत करत सादर केल्या जायच्या. यादवकाळात रुजलेली धृपद गायनाची संगीत परंपरा मुस्लीम आक्रमनानंतर खंडीत झाली होती. त्यामुळे बावन्नखणीत कोणत्याप्रकारचे नाच, गाणे सादर केले जायचे याचे संदर्भ सापडत नाहीत. परंतु तेथे निश्चितपणे लावणीसदृश्य नाच, गाणं चालत असावे, असा निष्कर्ष काढता येतो.
औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या सातारच्या छत्रपती शाहू महाराजांना मोगली मनोरंजनाची चांगलीच माहिती होती. सरदार, शिपायांच्या मनोरंजनासाठी छावणीतच कलावंतीनींचे तंबू असायचे. त्यावेळी त्यांचे नाच, गाणे छत्रपती शाहूंनी अनुभवले होते. कलाकारांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झालेले होते. कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या सरदार, शिपायांच्या मनोरंजनासाठी उत्तरेतून कलावंत बोलविले. मराठेशाहीत नाच, गाण्यांनी जन्म घेतला. छत्रपती शाहूंनी कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांचा उचित सन्मान करण्याचा पायंडा पाडला. त्यासाठी खास निधीची तरतूद केली. वा. कृ. भावे पुढे लिहितात, “परप्रांतातून नायकिणी आणविण्यास पैसा फार खर्चावा लागतो.
असे पाहून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच चांगल्या होतकरू मुली मिळवून त्यांना नृत्य कलेत तरबेज करण्याचे शाहूने मनास आणिले व कोकणात खंडोजी माणकर या अधिकाऱ्याकडे ती कामगिरी सोपविली.’ यावरून असे दिसते की, शाहू महाराजांच्या दरबारात त्यावेळी अनेक स्थानिक कलाकार असतील. पेशव्यांनी खंडोजी माणकरला लिहिलेल्या एका पत्रात “बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या, दहा-अकरा वर्षांच्या, निरोगी, नाचावयास लायक अशा पाठवाव्या.’ असा उल्लेख आढळतो. यावरून मराठेशाही आणि पेशवाईत दासी, बटकींच्या मुला, मुलींना राजदरबारात आणून त्यांना वादन, नाच, गाणे शिकविले जात असावे, असा निष्कर्ष काढता येतो.
शाहू महाराजांच्या कला प्रेमामुळे येथे कलावंत घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली. शाहू महाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्यांनी कलावंत घडविण्याचे मनावर घेतले. तशी ताकीद आत्माराम राजाराम नावाच्या अधिकाऱ्याला केली. हुकूमाप्रमाणे कारवाई करून तो पेशव्यांना एका पत्रातून कळवितो की, “साहेबीं, जातेसमयी ताकीत केली की, खबरदार राहणे, पोरींची निगा करणे, तालीम उत्तमप्रकारे करवीत जाणे. त्यानुसार त्यांसी खाणे, जेवणे उत्तम प्रकारे होत आहे. गावयाची तालीम उत्तमप्रकारे काशीबा पांच सांत घटका देत आहेत. फकीर महंमदही उत्तम प्रकारे तालीम देत आहे.’ म्हणजे येथे आणलेल्या नवशिक्या कलाकारांना त्यांच्या प्रकृतीची उत्तम काळजी घेऊन त्यांना पाच, सात तास नृत्य, गायनाचे शिक्षण दिले जात होते.
यातूनच बावनखणीतील कलावंतिणी, नायकीणी घडल्या असाव्यात. उत्तरेतील कलाकार दरबारात होते. त्यांच्या माध्यमातूनच गुरु-शिष्य पद्धतीने येथे कलाकार निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली, असा दाखला पेशवे दफ्तरात सापडतो. स्थानिक कलाकारांना शिकविलेले गाणे उत्तरेतील गवयांप्रमाणे धृपद गायकीचे आणि नृत्य उत्तरेतील कोठ्यांप्रमाणे कथ्थक स्वरुपाचं असावं. बावनखणीत त्याचे रुपांतर लावणीत झाले असावे. पेशव्यांचे पुणे आणि मराठेशाहीची राजधानी असलेल्या साताऱ्यात सांस्कृतिक आणि संगितीक वातावरण तयार झालेले होते. शाहू महाराजांचे बालपण मोगलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच कलेतील अनेक अंग माहीत होते. पेशव्यांना त्या शाहू महाराज आणि सरदारांमुळे माहीत झाल्या.
पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडून मराठ्यांचे राज्य दिल्लीच्या तख्ताला भिडविले. तेथे जम बसविण्यासाठी शिंदे, होळकर, पवार यांना तिथली जाहगिरी दिली. तेथे स्थायिक झालेल्या सरदारांनी उत्तर भारतीय माहौल आत्मसात करून, त्याची झलक पेशवे आणि शाहूंनाही दाखविली. पुणे, साताऱ्यातील सांस्कृतिक वातावरण यातूनच आकाराला येत होते. याचवेळी 15 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. पर्यायाने त्यांच्या पश्चात स्थानिक कलावंतांची सर्व जबाबदारी आणि त्यांनी निर्माण केलेली लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम सर्वस्वी नानासाहेब पेशव्यांवरच आले. ही जबाबदारी त्यांनी उत्तम रितीने सांभाळली. त्याचा उत्तम दाखला म्हणजे शुक्रवार पेठेत दिमाखात उभी राहिलेली बावन्नखणी होय. नानासाहेब पेशवे बावन्नखणीत जात होते की नाही, याचा संदर्भ सापडत नाही. परंतु त्यांची येसू नावाची नाटकशाळा होती. सर्वच पेशव्यांनी खासगीत बाळगलेल्या नाटकशाळा नाच, गाण्यात तरबेज होत्या. (क्रमशः)
– प्रा. डॉ. बाबा बोराडे