परवा एक वाक्य कानावर पडले. हल्ली फास्टफूडचा जमाना आला आहे. माणसाला सर्वकाही अगदी इन्स्टंट (तात्काळ) हवं असतं. वेळेचे कारण देत आपण कोणतीही गोष्ट अगदी घाईगडबडीत उरकण्याचा प्रयत्न करतो. किरकोळ गोष्टीत हे चालून जाते. परंतु दीर्घ पल्ल्याच्या गोष्टींसाठी हीच सुपरफास्ट गोष्ट मार्क ठरते.
आपण प्रयत्नांनादेखील वेळेच्या चाकोरीत बंद करून ठेवतो. याला निमित्त जरी वेळेचे दिलेले असले तरी अनेकदा प्रयत्नांचा आणि संयमाचा अभाव याला कारणीभूत असतो. हाती घेतलेले एखादे काम किंवा आव्हान आपण 90 टक्के प्रयत्नांनी पूर्ण करतो. परंतु अंतिम मोजक्या फलदायी क्षणाला आपण हात टेकतो. परिणामी आपण घेतलेल्या श्रमाला, प्रयत्नाला किंमत राहत नाही. बरेचदा एखाद-दुसरी व्यक्ती उरलेल्या 10 टक्के कामाला हात घालून संपूर्ण श्रेय घेऊन जाते. आयुष्यात सातत्याला आणि संयमाला खूप महत्त्व आहे.
एके दिवशी एक राजा त्याच्या राज्यातील निवडक सैन्यासह जंगलात घोडेस्वारीसाठी गेला. घोडेस्वारी करीत असताना त्याला या ठिकाणी एक आकर्षक दगड दृष्टीस पडला. या दगडातून एखादी आकर्षक कलाकृती घडविता येईल असा विचार त्याच्या मनात आला. त्याने सैनिकांना तो कणखर दगड उचलून आणण्यास सांगितले. सैनिकांनी रथातून तो दगड राजदरबारात आणला. त्यानंतर राजाने एक घोषणा केली, जो कोणी या दगडातून माझी एक सुबक मूर्ती साकारेल त्याला बक्षीस देण्यात येईल.
एका नामवंत मूर्तिकाराने मूर्ती बनविण्याचा विडा उचलला. तो दररोज राजदरबारात येऊन त्या दगडावर काम करू लागला. मूर्तिकाराने तो दगड फोडण्यास सुरुवात केली, परंतु दगड काही फुटेना. त्याने विविध हत्यारे वापरून अनेक घाव त्या दगडावर घातले. परंतु दगड जसाच्या तसाच. शेवटी वैतागून त्याने ते काम सोडून दिले. दुसऱ्या दिवशी गावातील एका दुसऱ्या मूर्तिकाराला बोलविण्यात आहे. त्या मूर्तिकाराने पहिलाच घाव घातला आणि दगडाची एक छोटीशी ठिकरी बाजूला पडली. त्यानंतर एका एका घावाने दगडाला आकार देत त्यातून त्याने राजाची सुबक मूर्ती साकारली. राजाने आनंदित होऊन त्याला योग्य बक्षीस दिले.
राजाने त्या मूर्तिकाराला विचारले, “पहिल्या मूर्तिकाराला एवढे प्रयत्न करून जे शक्य झाले नाही ते तू एका घावात कसे शक्य केलेस?’
त्यावर तो मूर्तिकार राजाला म्हणाला, “राजन खऱ्या अर्थाने त्याच मूर्तिकाराने या दगडावर मोठी मेहनत केली. त्याच्या अनेक घावांनीच दगडाच्या आतील अणुरेणूंना हलविले. मात्र शेवटचा संयमाचा घाव घालण्याआधीच त्याने हार मानली आणि त्यामुळेच मला हे सहजशक्य झाले.
आज अनेकदा आपलीही स्थिती त्या पहिल्या मूर्तिकारासारखी असते. आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करतो. जेव्हा ती गोष्ट साध्य होण्याच्या सीमारेषेवर असते तेव्हाच आपण प्रयत्न सोडून देतो. संयमाचा एक अखेरचा घाव, प्रयत्न आपल्याला आपल्या ध्येयप्राप्तीपासून दूर नेतो.
आमच्या सोसायटीतील दोन किरकोळ शरीरयष्टी असणारे मित्र व्यायामशाळेत जायचे. पिळदार आणि बलदंड शरीरयष्टी व्हावी असे दोघांचेही स्वप्न होते. महिना उलटला परंतु दोघांत फारसा फरक दिसत नव्हता. त्यामुळे त्यातील एकाने व्यायामशाळेत जाणेच बंद केले. मात्र दुसऱ्याने व्यायामात सातत्य ठेवले आणि तीन महिन्यांतच त्याच्यात बदल दिसू लागला. आकर्षक आणि सुदृढ शरीरयष्टी त्याने कमावली. त्या दोघांतही हा फरक होता.
एकाने संयम गमावला आणि चुकीचा निर्णय घेतला, तर दुसऱ्याने मात्र स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवत संयमाच्या जोरावर इप्सित साध्य केले. म्हणूनच “हाती घेईल, ते तडीस नेईल’ या वाक्याप्रमाणे आपल्याला पूर्णत्वाकडे जाता आले पाहिजे. यासाठी संयमाचा एक घाव आपल्याला समजून घेता पाहिजे. 999 वेळा अपयश पचवूनही संयमाच्या शेवटच्या घावाने ध्येयसिद्धीचे दीप उजळविणाऱ्या एडिसनकडून आपण शिकायला हवे.
डझनभर फ्लॉप चित्रपटांनी सुरुवात करणाऱ्या आणि प्रयत्नातून सिनेसृष्टीचा महानायक ठरलेल्या अमिताभ बच्चन यांच्या उदाहरणातून हे शिकायला हवे. लक्षात ठेवा, आपण घातलेला संयमाचा शेवटचा “घाव’ आपल्या यशाचा नवा “डाव’ सुरू करू शकतो. प्रयत्नवादी राहा, संयमी राहा.
– सागर ननावरे