गोष्ट थोडीशी जुनीच. आम्ही पुण्यातील रविवारपेठेतून नारायणपेठेत राहायला आलो होतो. दुकानही नारायणपेठेत शिफ्ट केलं होतं. त्या वेळी धाकटी प्रियम बारा वर्षांची असावी. ती चुणचुणीत असल्याने, अल्पावधीतच परिसरातील अनेकांशी तिची जुजबी तसेच चेहरे ओळख होत गेली. वारसा जपणाऱ्या या पेठेत उत्सवाची मौज ही भारीच. त्यात गणपतीचे आगमन होत असल्याची चाहूल उत्साह दुणावणारी ठरली.
घरी गणपती बसवायचा असल्याने प्रियमने गणपतीची मूर्ती “मी बुक करते’, असे सांगितले. तिचा उत्साह पाहता मी नकार दिला नाही. कालांतराने तिने मला मूर्ती बुक केल्याचे सांगितले. मी तिला बुक केल्याची पावती मागितली, तसेच किती ऍडव्हान्स दिला? हेही विचारले.
ती म्हणाली, त्यांनी पैसे मागितले नाही, त्यामुळे पावतीचा प्रश्नच नाही. त्यांनी मला कोणती मूर्ती आवडली? एव्हढंच विचारलं, फोन नंबर घेतला आणि जा म्हणाले. तिचे हे म्हणणे लोकव्यवहारात बसत नसल्याने मीही गांभीर्याने घेतले नाही. ती लहान असल्याने दुकानदाराने तिची बोळवण केली असावी. असो, गोष्ट आली, गेली, झाली.
मी माझ्या ओळखीच्या ठिकाणाहून स्थापनेच्या आदल्या दिवशी मूर्ती घेऊन आलो. गणेश चतुर्थीला यथासांग बाप्पाच्या मूर्तीची स्थापनाही केली. संध्याकाळी मग आम्ही कुटुंबीय सालाबादप्रमाणे मानाचे गणपतींचे दर्शन घेण्यास निघालो. रमत गमत, एक एक गणपती करत आम्ही चौथा अर्थात तुळशीबागच्या दर्शनाला पोहोचलो. तेवढ्यात माझा फोन खणखणला. गर्दीतून बाजूला होत मी फोन घेतला.
पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख सांगत, तुमची बुक केलेली मूर्ती कधी नेणार याची विचारणा केली? मला लगेच काही उमजले नाही. मी म्हणालो, मी कुठं मूर्ती बुक केली? यावर पलीकडून सांगितलं गेलं की, अहो प्रियम तुमची मुलगी ना! तिने केली होती मूर्ती बुक. काही तरी गोंधळ झाला असल्याचे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. मी म्हणालो, थांबा, मी जवळच आहे. समक्षच येतो. दर्शन आटपून मी प्रियमला सोबत घेऊन फोन आलेल्या दुकानदाराकडे पोहोचलो.
त्याने प्रियमला ओळखले. तो म्हणाला, ह्या ताईनेच तर मूर्ती बुक केली होती. एका मूर्तीकडे बोट दाखवत तो बोलला. मावळती आली तरी कोणी आले नाही, म्हणून फोन करावा लागला. मी सावध भूमिका घेत म्हणालो, अहो! तिने मूर्ती पसंत केली; पण ज्याअर्थी तुम्ही ऍडव्हान्स मागितला नाही, त्याअर्थी मूर्ती बुक झाली हे कसे समजावे? मी प्रश्न केला.त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
तो म्हणाला, साहेब, या मुलीला मी बऱ्याचदा इकडंनं जाताना पाहत असतो. त्यामुळे ही या परिसरातील असावी असा माझा अंदाज होता; म्हणून ऍडव्हान्स मागितला नाही. तसं ही आमच्यासाठी शब्द महत्त्वाचा, तिच्या शब्दाला मान देत आम्ही मूर्ती बुक करून घेतली. देवाच्याबाबतीत सहसा फसवले जात नाही, असा आमचा तरी अनुभव आहे.
प्रियम् पर्यायाने आम्ही चुकल्याचे आमच्या लक्षात आले. मी खजील झालो. आपण दिलेल्या शब्दाची बूज न राखल्याने प्रियमलाही मान खाली घालावी लागली. त्या दुकानदाराचं नुकसान नको म्हणून, मी ती मूर्ती विकत घेण्याची तयारी दर्शविली. यावर तो म्हणाला, अजून दुकान बंद व्हायला अवकाश आहे, तो वर मूर्ती विकली जाईल, अन्यथा मी तुम्हाला तसे कळवेन.
दुसऱ्या दिवशी ती मूर्ती विकली गेल्याचा निरोप मला मिळाला. प्रियमला आपली चूक उमगली. एक नवी शिकवण मिळाली.
आपण दिलेला शब्द पाळणे कसे आणि किती महत्त्वाचे असते, हे समजले. शब्द पाळणाऱ्याची प्रतिमा नेहमीच उजळ राहते.
गणरायाने आपल्या आगमनात तिला चारित्र्य बांधणीचा धडाच शिकवला होता जणू.
-सत्येंद्र राठी