पुणे – सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार ‘मुक्ता टिळक’ यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. कर्करोगाने खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादीच्या नेत्या ‘रूपाली ठोंबरे पाटील’ यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे’. असं त्या काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. मात्र, त्यांच्या या विधानानंतर पक्षाने त्यांना घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं.
‘मुक्ता टिळक किंवा एखाद्या दिग्गज नेत्याचं निधन झाल्यावर त्यांचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच पोट निवडणुकीची चर्चा सुरु आहे, हे अत्यंत चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. पक्षातील कोणीही काहीही चर्चा करु नये. हे खपवून घेतलं जाणार नाही’. असं राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं.
दरम्यान, आता पुन्हा एकदा कसबा मतदारसंघातून निवडणूक कोण? लढणार अशा चर्चा शहरात सुरु झाल्या आहेत. त्यातच रुपाली पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध होणं शक्य नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “कसब्यातील जागेवर निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. त्यासंदर्भात पक्षातील वरिष्ठांना निवेदन देखील दिलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं ज्यांना वाटतं. ते आजपर्यंत नीट वागले नाही आहेत. त्यांनी केलेली कामं पुण्यातील नागरिकांनी बघितली आहेत”. असं त्या म्हणाल्या आहेत.