नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी दिल्लीतील अतिक्रमण विरोधी कारवाईवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानावर आणि भाजप मुख्यालयावर बुलडोझर चालवा. त्यामुळे देशातील जातीय हिंसाचार कायमचा थांबेल, असे आपने म्हटले.
दिल्लीतील हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरीत भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केली. त्या पाडकामासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. त्याचा संदर्भ घेऊन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आमदार आतिषी या आपच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
भाजप आठ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आहे. त्या पक्षाने जातीय हिंसाचार घडवण्याच्या एकमेव उद्देशातून देशाच्या विविध भागांत रोहिंग्या आणि बांगलादेशींना अवैध आश्रय मिळवून दिला, असा आरोप त्या नेत्यांनी केला. शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांत सांगण्यासारखे कुठले कार्य भाजपने केलेले नाही. त्यामुळे तो पक्ष देशात अराजकता निर्माण करत आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. बुलडोझर कारवाईवरून इतर विरोधी पक्षांनीही भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.