अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा करोनाच्या काळात अनेक वाईट बातम्या मिळत आहेत. त्यात अनेक कलाकारांच्या निधनाच्या अफवाही पसरत आहेत. मीनाक्षी शेषाद्री आणि लकी अली यांच्या निधनाची बातमी पसरली होती. त्यातच आता “रामायण’ मालिकेतील रावणाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेले अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्याही निधनाची अफवा पसरली होती.
“रामायण’मधील लक्ष्मणाच्या रोलमधील सुनील लहरी यानेच या अफवेचे खंडन केले आहे. लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही सुनील लहरीने केले आहे. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा यापूर्वी गेल्या वर्षीही पसरली होती. तेव्हा त्रिवेदी यांच्या भाच्याने ट्विटरवर स्पष्टीकरण दिले होते. अरविंद त्रिवेदी यांची तब्येत एकदम ठीक आहे, असे त्यांनी सांगितले होते. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरात बसून राहावे लागले होते. त्यावेळी लोकांच्या मनोरंजनासाठी “रामायण’ आणि “महाभारत’ या गाजलेल्या मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा दाखवल्या गेल्या होत्या. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.