सातारा (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोमवार, 13 जुलैपासून जिल्हा परिषद कार्यालयासंदर्भात जाहीर केलेली नियमावली कडकपणे पाळावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या वाढत आहे. ती साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये होणारी गर्दी पाहता नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी ही नियमावली जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच मार्ग उघडा ठेवण्यात येणार आहे. पर्यायी सर्व मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व खाजगी वाहनांना प्रवेशास बंदी राहील. प्रत्येकाजवळ आयकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच गेट सुरू ठेवण्यात येणार आहे.
थर्मल तपासणी आणि सॅनिटायझर प्रवेशद्वारावरच बंधनकारक आहे. प्रवेशद्वारातच तळमजला येथे टपाल व्यवस्था करण्यात आली आहे. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची दिवसानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका विभागाचे टपाल संबंधितांना तेथेच देण्यात येईल. जिल्हा परिषदेमधील विविध कार्यालयाकडे येणारे पोस्टाचे टपाल तसेच अभ्यागतांनी समक्ष दिलेले अर्ज येथे स्वीकारण्यात येतील. एखाद्या विभागात काही काम असेल तर कामाचे स्वरूप, विभागाचे नाव, दूरध्वनी क्रमांक इत्यादी मजकूर लिहून तो कागद प्रवेशद्वारावरील टपाल व्यवस्थेमध्ये जमा करावा. त्या नागरिकाला त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी स्वतः दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करतील, अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली. या संपूर्ण नियमावलीची काटेकोरपणे तत्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी या सर्व नियमांची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे,असे आवाहन जाधव यांनी केले आहे.