अकोला – “वारी’ म्हटलं की प्रत्येकासाठी तो एक आस्था, प्रेम, भावना आणि आपुलकीचा विषय आहे. हजारो वर्षांची अखंडीत परंपरा लाभलेल्या या पंढरीच्या वारीला यंदा “करोना’मुळे विघ्न आले आहे. मात्र, सरकारने महाराष्ट्राचा हा बहूमोल वारसा करोना संकटातही टिकून रहावा म्हणून काही निर्णय घेतले आहेत. मात्र, याच निर्णयाविरोधात रुक्मिणीचं माहेर असलेल्या विदर्भात पडसाद उमटतांना दिसत आहे. कारण प्रथमच आषाढीला रुक्मिणीमाता आपल्या हक्काच्या “माहेरच्या साडी’पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ पाच पालख्यांना पंढरपुरला प्रतिकात्मक रुपात जाण्याची परवानगी दिली आहे. या पाच पालख्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पालख्यांचा समावेश आहे. मात्र, विठ्ठलाचं “सासर’ आणि रुक्मिणीचं “माहेर’ असलेल्या विदर्भातील एकाही पालखीचा यामध्ये समावेश नाही.
विशेष म्हणजे रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील ऐतिहासिक पालखीलाही सरकारने पंढरपुरात जाणाऱ्या पालख्यांमध्ये स्थान दिलेले नाही. त्यामुळे रुक्मिणी संस्थानच्या 425 वर्षांच्या पालखीची पंरपरा पहिल्यांदा खंडीत होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत. कौंडण्यपुरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीला 425 वर्षांचा इतिहास आहे. रुक्मिणी मातेच्या माहेरून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे.
रुक्मिणी मातेच्या माहेरहून पंढरपुरातील मूर्तिला दरवर्षी साडीचोळी, नैवद्य चढविण्यात येतो. रुक्मिणी मातेला साडीचोळी देऊन तिची बोळवण करण्यात येते आणि त्यानंतर आई रुक्मिणी मातेच्या पादुका भगवंतांच्या चरणाजवळ नेण्यात येतात. त्यामुळे सव्वाचार शतकांच्या काळात प्रथमच आषाढीला रुक्मिणीमाता आपल्या हक्काच्या “माहेरच्या साडी’पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.