प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावचा विकास खुंटला
कामचुकार, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
बारामती पंचायत समितीसमोर आक्रोश आंदोलन : मेडदच्या महिलांची घोषणाबाजी
बारामती (प्रतिनिधी) – प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मेडद गावचा विकास खुंटला आहे. कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी आक्रमक मागणी करीत महिलांनी बारामती पंचायत समितीसमोर आक्रोश आंदोलन केले. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू तसेच आंदोलन तीव्र करू, असा इशारा महिलांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कामचुकार अधिकाऱ्यांची तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे यावेळी महिलांनी स्पष्ट केले. यावेळी घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
मेडद हे गाव शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, कामचुकार व दांड्या बहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे गावाची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी कधीही वेळेत हजर होत नाहीत. अनेकदा गैरहजर असतात. तरी काम करीत नाहीत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत अनेकवेळा लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, कारवाई न करता तक्रारीला वरिष्ठांनी केराची टोपली दाखवली आहे. असा आरोप सहभागी महिलांनी यावेळी केला. पाच दिवस गावात पिण्याचे पाणी येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे. मूलभूत समस्या असून विकासकामे ठप्प झाले आहेत. त्यामुळे समस्येने हैराण झालेल्या तीस ते पस्तीस महिलांनी पंचायत समितीसमोर आक्रोश आंदोलन केले. गटविकास अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
समस्यांचा डोंगर आ वासून
ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक वारंवार गैरहजर असतात. ज्यावेळी ते कार्यालयात हजर असतात. त्यावेळी ते कामचुकारपणा करतात. कार्यालयात आलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे गावात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कारवाई होत नसल्याचे सरपंच डॉ. उज्जवला गावडे यांनी आरोप केला.