भारताच्या राष्ट्रपतिपदी ओडिशाच्या द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सक्षमीकरणाची व्याप्ती वाढत असताना आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला गेला आहे. परराष्ट्र सेवेतील अधिकारी रुचिरा कंबोज यांची संयुक्त राष्ट्राच्या भारताच्या कायम प्रतिनिधिपदी नेमणूक करण्यात आली असून अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत.
रुचिरा कंबोज यांची नुकतीच संयुक्त राष्ट्रात स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात त्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहतील. 1987च्या बॅचच्या रुचिरा यांनी सध्याचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांचे स्थान घेतले आहे. रुचिरा या सध्या भूतानमध्ये पहिल्या महिला राजदूत म्हणून कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताच्या उच्चायुक्त आणि यूनेस्कोमध्ये राजदूत म्हणून पदभार सांभाळला आहे. पदभार स्वीकारताना रुचिरा कंबोज यांनी ट्विट करत म्हटले की, संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून आपण न्यूयॉर्क येथे पोचलो आहोत. या नव्या पदाच्या माध्यमातून देशसेवा करणे ही खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे. 2002 ते 2005 या काळात त्यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये काउन्सिलर म्हणून काम केले होते.
1987 च्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर महिलांत त्या सर्वोच्च स्थानी राहिल्या. परराष्ट्र सेवा बॅचमध्ये टॉपर राहिलेल्या रुचिरा कंबोज यांनी पॅरिस येथून प्रशासकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी 1989-91 या काळात फ्रान्समध्ये भारतीय दूतावासात तिसरे सचिव म्हणून काम केले. दिल्लीत परतल्यानंतर त्यांनी 1991-96 या काळात परराष्ट्र मंत्रालयात “युरोप वेस्ट डिव्हीजन’मध्ये मुख्य अवर सचिव म्हणून काम केले आहे. 1996-99 या काळात त्यांनी मॉरिशस येथे पहिले सचिव (आर्थिक आणि वाणिज्यिक) आणि पोर्ट लुईस येथे भारतीय उच्चायुक्तालयात काम केले. रुचिरा यांनी जुलै 2017 ते मार्च 2019 या काळात किंगडम ऑफ लेसोथो आणि दक्षिण आफ्रिकेत भारताच्या उच्चायुक्त म्हणून काम केले. 17 मे 2019 पासून भूतान येथे भारतीय दूत म्हणून त्या कार्यभार सांभाळत होत्या.
सुरक्षा परिषदेत भारताचा अस्थायी सदस्यत्त्वाचा कार्यकाळ यावर्षी डिसेंबरमध्ये संपत आहे. त्याचवेळी डिसेंबर महिन्यात भारत संयुक्त राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवणार आहे. रुचिरा कंबोजचे दिवंगत वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. त्यांची आई दिल्ली विद्यापीठात संस्कृत विषयाच्या प्रोफेसर राहिल्या आहेत. आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत.
रुचिरा कंबोज यांचा विवाह उद्योगपती दिवाकर कंबोज यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगी आहे. रुचिरा कंबोज यांचे शालेय शिक्षण दिल्ली, बडोदा आणि जम्मूत झाले. त्यांनी मसुरीच्या “वाइन बर्ग ऍलन स्कूल’मध्ये शिक्षण घेतले आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. कंबोज यांनी “लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मधून पदवी प्राप्त केली. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेवर त्यांची चांगली पकड आहे.
भारताचा सुरक्षा परिषदेतील दोन वर्षांचा अस्थायी सदस्यात्वाचा कार्यकाळ येत्या डिसेंबरमध्ये संपत असताना रुचिरा यांच्याकडे स्थायी प्रतिनिधीची जबाबदारी आली आहे. एवढेच नाही तर डिसेंबरमध्ये भारत संयुक्त राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवत असून तेथेही रुचिरा कंबोज यांची भूमिका महत्त्वाची राहील.