पुणे – राज्यातील “आरटीई’अंतर्गतच्या 25 टक्के प्रवेशासंदर्भातील आढावा घेण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे बुधवारी मुंबई येथे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना “आरटीई’ अंतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळामध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. यंदाच्या वर्षी 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
यासाठी 2 लाख 44 हजार 933 अर्ज दाखल झाले आहेत. राज्यस्तरावर काढण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या लॉटरीत 67 हजार 706 विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी नंबर लागला आहे. यातील 46 हजार 944 विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही 20 हजार 762 विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेशच झालेले नाहीत. या जागा रिक्तच राहिल्या आहेत.
काही पालकांनी अर्ज भरण्यात चुका केल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी अद्याप त्यांना संधी देण्यात आलेली नाही. दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. “आरटीई’ प्रवेशाबाबत पालकांच्या विविध तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक, मुंबईचे विभागीय शिक्षण उपसंचालक, एनआयसीचे तांत्रिक संचालक, बृहन्मुंबईचे शिक्षणाधिकारी आदींना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी दिल्या आहेत.
“आरटीई’ प्रवेशाची दुसरी व तिसरी फेरी सुरू करणे, प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करणे, शुल्क प्रतिपूर्तीची थकीत रक्कम शाळांना अदा करणे यासह इतर विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची (विद्या प्राधिकरण) स्वायत्तता, डायट यासह इतर काही महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.