नवी दिल्ली – देशाच्या १३० कोटी भारतीय नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूच मानतो. मग ते कोणत्याही धर्म-संस्कृतीचे असोत, असे महत्वपूर्ण विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ते तेलंगणामधील आरएसएस आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. सीएए-एनआरसीसंबंधी संघाची भूमिका काय आहे, हे अप्रत्यक्षपणे त्यांनी स्पष्ट केले असल्याची चर्चा आहे.
मोहन भागवत म्हणाले कि, धर्म आणि संस्कृतीकडे लक्ष न देता ज्यांच्यामध्ये राष्ट्रवादीची भावना असते आणि भारताच्या संस्कृती-वारसेचा सन्मान करतात ते हिंदू आहेत. आणि आरएसएस १३० कोटी नागरिकांना हिंदूच मानतो. संपूर्ण समाज आपला आहे. तसेच संघाचा उद्देश समाजाला संघटित करणे आहे. आरएसएस सर्वांचाच स्वीकार करते. त्यांच्याबद्दल चांगला विचार करतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त होत आहे. त्यांच्या वक्तव्याचा इशारा सीएए-एनआरसीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.