सांडपाणी वाहिन्या चेंबरला जोडल्याच नाहीत : वर्षभरानंतरही ठेकेदारावर कारवाईदेखील नाही
सिंहगड रस्ता – नाल्यांद्वारे नदीत जाणारे सांडपाणी थेट मैलापाणी केंद्रात वाहून नेण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु, या वाहिन्या चेंबरला जोडण्याचा विसरच पालिकेला पडल्याने या वाहिन्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत जाऊन जल प्रदूषण होत आहे.
पटवर्धन बाग परिसरातील अर्धवट कामामुळे हा महानगरपालिकेच्या कारभाराचा हा प्रकार उघडकीस आला आहे. नदी प्रदूषण रोखण्याकरीता सांडपाणी वाहिन्या चेंबरला जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
पुणे महापालिकेने शहरातील नाल्यांमध्ये उघड्यावर वाहणारे मैलापाणी बंदिस्त नलिकेद्वारे नजीकच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून नेणे तसेच या कामांचे पाच वर्षे देखभाल दुरुस्ती कामासाठी 56 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर 2017 मध्ये काढली, त्याअंतर्गत गांधी लॉन्स ते साकेत सोसायटी (पटवर्धन बाग) यामधील नाल्यामध्ये 1200 मिमी व्यासाची पाइपलाइन व चेंबर्स बांधण्याचे काम होते. हे काम 2018 मध्ये करण्यात आले.
मात्र, काही ठिकाणी पाइपलाइन चेंबरला जोडल्याच नाहीत. त्यामुळे एवढा मोठा खर्च करून हे मैलापाणी थेट उघड्या नाल्यातून वाहत नदीत मिसळत आहे. यातून कोट्यवधी रुपयांचा खर्च निरुपयोगी ठरत आहे. परिणामी, हे पाणी ज्या एरंडवणा जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाणार होते. ते केंद्रही पूर्ण क्षमतेने चालत नाही. ही बाब गंभीर असल्याचे मंचाच्या वतीने तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती.
त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारास तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर तब्बल वर्षभराचा कालावधी लोटला, तरी हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारावर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.