नवी दिल्ली – रेल्वेगाड़ी तसेच रेल्वेस्थानकांवर मास्क न लावणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड केला जाणार आहे. देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना यासंबंधी सूचना दिल्या आहेत. हा आदेश आजपासूनच लागू करण्यात येत असून तो सहा महिन्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
11 मे 2020 रोजी भारतीय रेल्वेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रवाशांना प्रवेशादरम्यान आणि प्रवासादरम्यान मास्क घालण्याचे आदेश जारी केल्याचे रेल्वेने सांगितले. मास्क न घालणाऱ्या तसेच रेल्वे स्थानकाच्या आवारात थुंकताना आढळलेल्या व्यक्तीला दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील सूचना जारी होईपर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही तत्काळ अंमलात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.