राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडील प्रस्तावाला हिरवा कंदील; श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल नुकसान भरपाई
नगर, दि. 28 (प्रतिनिधी) – नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक-516) चौपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा 50 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. प्रांताधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या निवाड्याप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
तथापि, अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईसाठी दाखल करण्यात आलेला हा प्रस्ताव प्रलंबित होता. या प्रस्तावांना मंजुरी देवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने भूसंपादनापोटी 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी मंजूर केला असल्याचे खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.
नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री, तरडगाव, मांडवगण व घोगरगाव या गावांतील जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण यांनी दिली.
जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रशासकीयस्तरावर बैठका घेवून पाठपुरावा केला. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भूसंपादनासाठी 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता म्हणून वर्ग करण्यात आलेला आहे. आता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.