मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून तब्बल तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानुसार सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर “एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उस्मानाबादमध्ये आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचे संकेत दिले होते. पंचनाम्यांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत बैठक घेऊन मदतीचा निर्णय जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून पत्रकारपरिषद घेऊन या पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते.
अजित पवार करोना पॉझिटिव्ह?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. मात्र त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांनी करोनाची चाचणी केली होती.
या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याच्या बातम्या फिरत होत्या. मात्र, अद्याप अजित पवार यांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.