उत्पन्नात चारपट वाढ
161 किलो सोने, 2422 किलो चांदी
तुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे विविध बॅंकांमधील खात्यांवर सध्या 163 कोटी 21 लाख 31 हजार 519 रुपयांची रोकड जमा आहे. तसेच 161 किलो सोने व अडीच हजार किलोच्या घरात चांदी जमा झाली आहे. दहा वर्षांपूर्वी ठेकेदारी पद्धतीने मिळणाऱ्या आकडेवारीच्या तुलनेत हे उत्पन्न 4 पटींनी जास्त असल्याने ठेकेदारांची लॉबी बंद करून मंदिर देवस्थानच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सीआयडी अहवालानंतरही कारवाई नाही
दानपेटीचा लिलाव सुरु करण्यापूर्वी आणि लिलावात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार गंगणे यांनी दाखल केली. त्यानंतर सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. 2010 पूर्वी मागील 20 वर्षांत तब्बल 150 किलोहून अधिक सोने, चांदी आणि रोकड, असा अंदाजे दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा अहवाल सीआयडीने ऑगस्ट 2016 साली राज्य सरकारकडे दाखल केला. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सन 2010 पूर्वी अनेक वर्षांपासून तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेटीचा लिलाव केला जात होता. परंतु ठेकेदारांनी मंदिर संस्थानचे तत्कालीन विश्वस्त, कर्मचारी यांच्याशी संगनमताने दानपेटीत जमा होणाऱ्या विविध मौल्यवान वस्तूंसह रोख रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करून भाविकांच्या श्रद्धेवरच घाला घातला होता.
याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी मंदिर देवस्थानच्या कारभारास शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच वेळी धर्मादाय आयुक्तांनी दानपेट्या सील करून 40 दिवसांनंतर त्यातील रोकड व दागदागिन्यांची मोजदाद केली. यावेळी मंदिर संस्थानकडून दाखवण्यात येणारी रोख रक्कम व दागदागिन्यांचे वजन आणि प्रत्यक्षात दानपेटीत जमा होणारे सोने-चांदी व रोकड यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे समोर आले होते.