अहमदाबाद – गुजरात सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना स्मार्ट फोन खरेदी करण्यासाठी प्रत्येकी पंधराशे रूपयांपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी क्षेत्रात सध्या डिजीटल सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पन्न वाढवावे या हेतूने शेतकऱ्यांना स्मार्ट फोन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल.
शेतकरी जो फोन खरेदी करणार आहेत त्याच्या दहा टक्के रक्कम त्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे, पण ही रक्कम पंधराशे रूपयांपेक्षा जास्त असणार नाही असेही सरकारने कळवले आहे. शेतकऱ्यांना या फोनचा वापर करून ऑनलाईन सेवाही घेता येतील. ही दहा टक्के मदतीची योजना केवळ मोबाईलच्या मुख्य मॉडेलच्या किंमतीसाठी असेल, चार्जर, ईयर फोन, बॅटरी याच्या खरेदीसाठी ही मदत असणार नाही असेही राज्य सरकारने म्हटले आहे.