मुंबई – येत्या वर्षभरात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रिपाईला किमान 3 ते 4 जागांवर तिकीट मिळावे, यासाठी लवकरच भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे. तसेच जिथे शक्य होईल तिथे भाजपला पाठिंबा देऊ, असेही रामदास आठवले म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर आता येत्या वर्षभरात आणखी पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी या पाच राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांबाबत जे बोलले, त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र त्या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाची चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि आम्ही आधी एकत्र होतो. आता शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे, असा टोलाही आठवलेंनी लगावला.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लावलेली चौकशी योग्य नाही. ट्विट करणाऱ्यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे. या सरकारची चौकशी करावी लागेल, असेही आठवले म्हणाले.