विश्वासात घेत नसल्याचा आरपीआय नेत्यांचा आरोप
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उद्रेक
लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत भाजपबरोबर असलेल्या “आरपीआय’ ने भाजपबरोबर असहकार पुकारला आहे. आरपीआयच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने हा निर्णय घेण्यात आला. भाजपकडून विश्वासात घेतले जात नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
“आरपीआय’ने राखीव असलेल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाची जागा मागितली होती. मात्र, भाजपने “आरपीआय’ला गृहित धरून ती दिली नाही. त्यामुळे आरपीआय दुखावली असून आता भाजपचा प्रचारच करायचा नाही, असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.
वास्तविक डॉ. धेंडे हे स्वत: वडगावशेरी येथे भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याविषयी डॉ. धेंडे यांना विचारले असता या रॅलीनंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
भाजपने रिपब्लिकन पक्षाला न्याय न देता वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि नाराजीचे वातावरण आहे. यासाठीच भाजपला प्रचारामध्ये कुठलेही सहकार्य करायचे नाही, अशा प्रकारची भूमिका बैठकीत एकमताने घेण्यात आल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अशोक शिरोळे होते. तसेच, बाळासाहेब जानराव, डॉ. धेंडे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण, ऍड. मंदार जोशी, ऍड. आयुब शेख, निलेश आल्हाट, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे आदी उपस्थित होते.