शारजा – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा आज कोलकाता नाईट रायडर्सशी सामना होत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघासमोर कोलकाताचे आव्हान राहणार आहे. सामन्यास भारतीय प्रमाण वेळेनुसार सांयकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे.
बेंगळुरू संघात नावाजलेले फलंदाज असले तरीही कोहली, देवदत्त पडीक्कल व ऍरन फिंच वगळता अन्य एकाही फलंदाजाला सरस कामगिरी करता आलेली नाही. कोहलीच्या खेळीने सुपर ओव्हरमधील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात करण्यात यश आले असले तरीही संघातील फलंदाजांच्या आजवरच्या कामगिरीला छेद देणारी कामगिरी सध्या कोहलीचा संघ करत आहे.
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार व जागतिक क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज असलेला कोहली स्वतः सरस कामगिरी करत असला तरीही सांघिक खेळ अपयशी ठरत आहे. शनिवारी त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 90 धावांची अफलातून खेळी केली. मात्र, त्याला अन्य फलंदाजांनी साथ दिली नाही.
हा सामना बेंगळुरूने जिंकला असला तरीही डीविलियर्ससह अन्य फलंदाजांचे अपयशच त्यांना भोवत आहे. त्यामुळे यंदाच्याही स्पर्धेत बेंगळुरूचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंग होणार याचीच शक्यता जास्त दिसत आहे. मोइन अली, वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडून असलेल्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने त्यांची फलंदाजी चांगली होत नसून त्यांना मोठी धावसंख्याही गाठता आलेली नाही तसेच मोठ्या धावसंख्येचा पाठलागही करता आलेला नाही.
गोलंदाजीतही नवदीप सैनी वगळता इसुरू उदाना, सुंदर, महंमद सिराज व मोइन अली यांचे संघातील स्थान जाऊ शकते असेच चित्र दिसत आहे. यजुवेंद्र चहलवरच त्यांच्या गोलंदाजीची मदार कायम आहे. कोलकाता विरुद्धच्या या सामन्यासाठी बेंगळुरू संघात फेरबदल होण्याची शक्यता असून वेगवान गोलंदाज डेल स्टेन याचा संघात समावेश केला जाण्याचे संकेत कोहलीनेच दिले आहेत. या खेळपट्टीवर स्टेन प्रभावशाली ठरेल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.
डीविलियर्सच्या अपयशाची चिंता
बेंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज एबी डीविलियर्सचे अपयश बेंगळुरूसाठी डोकेदुखी ठरत आहे. सर्व मैदानाभर फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या डीविलियर्सला मीस्टर 360 असे संबोधले जात असले तरीही त्याला यंदाच्या स्पर्धेत अद्याप सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो यावर बेंगळुरूचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
दुसरीकडे बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केल्यामुळे कोलकाता संघाचे मनोधैर्य उंचावलेले असल्याने या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. तसे पाहिले तर इयान मॉर्गन व शुभमन गील यांच्या कामगिरीतील सातत्य वगळले तर त्यांच्या संघातील सुनील नरेन, नीतिश राणा, आंद्रे रसेल व कर्णधार दीनेश कार्तिक यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या सामन्यांत निराशाच झाली आहे.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हे सर्व फलंदाज अपयशी ठरत असताना महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीने 81 धावांची खेळी करत अन्य फलंदाजांना साथीला घेत संघाला दीडशतकी धावसंख्या उभारून दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला होता. आता आजच्या सामन्यात दीनेश कार्तिकला आपली कामगिरी सुधारावी लागणार असून त्याला अपयश आल्यास त्याचे कर्णधारपदही धोक्यात येऊ शकते.
कोलकाताची गोलंदाजी काही प्रमाणात बेंगळुरूपेक्षा सरस आहे. पॅट कमिन्स, रसेल, शिवम मावी, कमलेश नागरकोटी व वरुण चक्रवर्ती यांनी सातत्याने सरस कामगिरी केली आहे. अर्थात, आजच्या सामन्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.