शारजा – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ विजयाच्या मार्गावर आला असून कर्णधार विराट कोहली आणि कंपनीला रोखण्याचे आव्हान आजच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर राहणार आहे. पंजाबला विजय मिळवायचा असेल तर त्यांना कोहली, एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल व ऍरन फिंच यांना रोखावे लागेल. केवळ त्यांच्या फलंदाजांवरच नव्हे तर त्यांच्या गोलंदाजांवरही दडपण राखावे लागणार आहे.
कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल हे स्पर्धेच्या सुरुवातीला यशस्वी ठरले होते. मात्र, त्यानंतर राहुलचा अपवाद वगळता सर्फराज खान, करुण नायर व दीपक हुडा यांना सातत्याने अपयश येत असल्याने पंजाबला आजच्या सामन्यात मोठे फेरबदल करावे लागणार आहेत.
मयंकनेही आपली चमक दाखवली असली तरीही त्यात सातत्याचा अभावही दिसून आला आहे. विनाकारण आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट मोक्याच्या क्षणी गमावल्याने संघाला पराभवांचे सामने करावे लागले आहेत.
वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरनने मात्र, संघातील सर्वात आक्रमक फलंदाज अशी ओळख निर्माण केली आहे. आता बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात त्यांना आपल्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चमक दाखवावी लागणार आहे. गोलंदाजीत महंमद शमी, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कोट्रेल यांनी सरस कामगिरी केली असली तरीही ते अत्यंत महागडे गोलंदाज ठरले आहेत. त्यांना भेदकतेवर भर द्यावा लागणार आहे.
पंजाबला अखेरची संधी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला विजय मिळवणे आवश्यक बनले आहे. या स्पर्धेत पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाशी असून त्यांनी पुढील सर्व सामने जिंकले तरच त्यांना स्पर्धेतील आव्हान कायम राखणे शक्य होणार आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या सामन्यांत त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातही कर्णधार लोकेश राहुल व मयंक आग्रवाल यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या एकाही फलंदाजाला सूर गवसलेला नाही. त्यांची मधली फळी कशी कामगिरी करते यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
चोकर्सचा शिक्का पंजाब पुसणार का
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब संघ चोकर्स म्हणून हिणवला जात आहे. आरंभशूर अशीही त्यांची ओळख तयार झाली आहे. सुरुवातीच्या सामन्यांत दमदार खेळी करणारा, पण महत्त्वाच्या सामन्यांत नांगी टाकणारा संघ अशी त्यांची बनलेली ओळख यंदा तरी पुसली जाणार का, हेच आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.