नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्यावरून (का) झालेल्या निदर्शनावर जमावाला दंगल आणि हिंसाचाराकडे नेणारे नेते नसतात, अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली. त्यावर कॉंग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.
लोकांना अयोग्य दिशेने नेणारे नेते नसतात. आपली महानगरे आणि शहरांमध्ये विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जमावाला कसे दंगल आणि हिंसाचाराकडे नेत आहेत, हे आपण पाहिले आहे.हे नेतृत्व नव्हे, असे रावत म्हणाले. नेता तो असतो जो तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातो. तुम्हाला योग्य सल्ला देतो. तुमच्या जीवीताची तो काळजी घेतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
रावत यांच्या विधानावर उपहासात्मक प्रतिक्रिया देताना योगेंद्र यादव म्हणाले, मी त्यांच्याशी सहमत आहे. होय, नेत्याने लोकांना योग्य दिशेनेच न्यायला हवे, मला पूर्ण खात्री आहे हे विधान करताना त्यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच विचार असेल. त्यामुळे ते असे बोलले असावेत.
कॉंग्रेसचे प्रवक्ते ब्रिजेश कलप्पा म्हणाले, हे संपूर्णत: घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे. असे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये घडते. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी का निदर्शनाविरोधात बोलणे हे पूर्णत: घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे. राजकीय मुद्द्यावर लष्करप्रमुखांना मत व्यक्त करू दिले तर भविष्यात ते सारे ताब्यात घेतील.
आपल्या कार्यालयीन मर्यादा प्रत्येकाने ओळखल्या पाहिजेत. तुम्ही नागरिक हेच सर्वोच्च हे लक्षात ठेवले पाहीजे. त्याच बरोबर ज्या संस्थेचा आपण प्रमुख आहोत त्याच्या जबाबदारीचे भान ठेवले पोहीज, असे ओवेसी म्हणाले. कॉंग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी रावत यांच्या विधानावर टीका केली आहे.