आग्रा : उत्तर प्रदेशात नेहमीच चित्रविचित्र घटना घडत असतात आणि अनेकदा पोलिसही त्यात सहभागी असतात. आग्र्याजवळील फिरोजाबाद जिल्ह्यातील रसूलपुरा येथे नुकतीच अशी घडली आहे. चोरट्यांनी एका घरातून एक लाख रुपये चोरले. पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी चोरट्यांना पकडले मात्र, त्यांच्याकडून 96 हजार काढून घेतले आणि चोरट्यांकडे फक्त चार हजार रुपये ठेवले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्या चोरट्यांची जिल्ह्याबाहेर पाठवणी केली.
चोरटे जिल्ह्याबाहेर जाईपर्यंत पोलिस त्यांच्यासोबत होते. या पोलिसांची ओळख पटल्यानंतर फिरोजाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोककुमार यांनी चारही पोलिसांना अटक केली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार दोन चोर आणि चार पोलिसांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
किराणा मालाचे दुकानदार गौरव कुमार यांनी 15 ऑक्टोबर रोजी रसूलपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या ऑटो रिक्षातून अज्ञात व्यक्तीने एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते. तक्रार येताच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
जेणेकरून चोरटे दुसऱ्या जिल्ह्यात पळून जाऊ नयेत. त्यानंतर परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांनी मालाची डिलिव्हरी करणाऱ्या रिक्षातून दोघे चोरटे पैसे चोरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच मैनपुरी जिल्ह्यातून प्रियांशू आणि ओमसिंग यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनी एक लाख रुपये चोरल्याचे मान्य केले. त्याचबरोबर चोरी करून जात असताना दोघांना सिरसागंज पोलिस ठाण्यातील पोलिसांनी थांबवल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्यांनी चोरलेल्या एक लाख रुपयांतील 96 हजार रुपये काढून घेतले व चोरट्यांना मैनपुरी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बंदोबस्तात सोडले.
जेणेकरून अन्य पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करू नये.
त्या चार पोलिसांची ओळख पटली असून त्यामध्ये उपनिरीक्षक सुनील चंद, कॉन्स्टेबल राकेशकुमार आणि सुरेंद्रसिंग आणि चालक बालकृष्ण यांचा समावेश आहे. आता चोरट्यांबरोबरच या चौघांनाही जेलची यात्रा घडलेली आहे.
पोलिसांनी चोरट्यांकडून काढून घेतलेले 96 हजार रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक कुमार यांनी दिली. चौघा पोलिसांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.