पारनेर – पारनेर शहरातील नवीपेठ येथे असणारी पश्चिम विभाग सेवा सोसायटीमध्ये गोरगरीब जनतेला वाटप करण्यात आलेला, गहु निकृष्ट दर्जाचा असल्याची माहिती पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी व पारनेरचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या निदर्शनास आणून दिले.
पारनेर येथील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील अल्प दरातील तांदूळ गहू मिळण्यासाठी पारनेर येथे नवी पेठेमध्ये पश्चिम विभाग सेवा सोसायटी आहे. या सोसायटीच्या लाभार्थीना गहु वाटप करण्यात येतो. तो गहू अतिशय निकृष्ट दर्जाचा असून, येथील नागरिकांना वाटप करण्यात येतो. या सोसायटीचे कर्मचारी चांगला गहु बाजुला ठेवून, खराब गहु लाभार्थींना वाटप करतात, अशी माहिती शहरातील नागरिक सुनील रुईकर, अनिता आहेर, छगन राजे, गंगुबाई रुईकर, शंकुतला कोल्हे यांनी भाऊसाहेब खेडेकर यांना दिली.
याबाबत सोसायटी कर्मचारी यांना विचारणा केली असता, शासन आम्हाला असाच गहु देत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी तहसील कार्यालयात धाव घेतली व या निकृष्ट गव्हाबाबत विचारणा केली व संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी व तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या लक्षात आणून दिली, त्यावर अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
एखादी गोणी खराब गहू आला असेल, जिल्ह्यातून इतर ठिकाणावरून असा खराब गहू वाटप करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या नाहीत. पारनेरमधूनच ही प्रथम तक्रार आली आहे. अशा प्रकारचा गहू येत असल्यास तो दुकानदारांना बदलून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जयश्री माळी जिल्हा पुरवठा अधिकारीशासन देत असलेल्या गव्हाचा दर्जा हा निकृष्ट आहे. धान्य दुकानदारामार्फत हा गहू देण्यात येत आहे. त्याला जबाबदार कोण? शहरात येत्या आठ दिवसांत चांगल्या प्रतीचा गहू न दिल्यास, शहरातील सर्व नागरिकांबरोबर पारनेर तहसीलवर उपोषण करण्यात येईल.
भाऊसाहेब खेडेकर सामाजिक कार्यकर्ते