लाखणगाव – हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 50 गावांतील रब्बी पिकांना फायदा होणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याचा उपयोग शेती पिकांना होणार आहे. घोडनदीवर असणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून उजवा व डाव्या कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याचा उपयोग आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.
डिंभे उजव्या कालव्यातून आंबेगाव, शिरूर तालुक्याला पाणी जाते. तसेच डाव्या कालव्यातून घोडनदीच्या उत्तरेकडील भागाला पाणी जाते. पाऊस उघडल्यानंतर कालव्याला आलेले हे पहिलेच आवर्तन आहे. या पाण्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत शेतकऱ्यांना शेती पिके घेता येणार आहेत, असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
शेतकरी वर्गात समाधान
सध्या नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरलेले असले तरीही पाटाकडेच्या गावाला पाण्याचा तुटवडा जाणवू लागला होता, त्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. पाण्याचे योग्य नियोजन व योग्य वापर करणे गरजेचे आहे. सध्या कालव्याला आलेल्या पाण्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी असून शेती पिकांना त्याचा फायदा होणार आहे.