नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून गुलाबपुष्प
बिबवेवाडी – नागरिकांवर फक्त कायदा काम करतो असे नाही, तर घडणाऱ्या गुन्ह्याबद्दल माहिती देऊन जनजागृती केली तर फायदासुद्धा होतो. हीच बाब बिबवेवाडी पोलिसांनी दाखवून दिली.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना थांबवण्यासाठी गुलाबपुष्प देऊन त्यांना लॉकडाऊनचे महत्त्व समजावून सांगण्याचा उपक्रम पहिल्याच दिवसापासून बिबवेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या या गांधीगिरीचा चांगलाच परिणाम दिसून येत असून रस्त्यावरील विनाकारण हिंडणाऱ्याची संख्या आज तिसऱ्या दिवशी एकदम रोडावली होती.
उपनगरात अनेकांकडून जाणीवपूर्वक लॉकडाऊनचे पालन होत नसल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कारवाई करण्यापेक्षा अशा नागरिकांना समजावून सांगत गुलाबपुष्प देण्यास सुरुवात केली. याचा परिणाम चांगलाच दिसून आला. बिबवेवाडी परिसरातील तीन नाक्यांवर अशा पद्धतीने कारवाईऐवजी गांधीगिरी करण्यात आली. यातून नागरिकांनी योग्य तो बोध घेतला. यामुळे तिसऱ्या दिवशी बाहेर पडणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाली. गुन्हे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, उपनिरीक्षक सचिन खेतगलास यांच्या पथकाने गांधीगिरीचा उपक्रम राबविला आहे.