बाबासाहेब पुरंदरे गेले म्हणजे नेमके काय झाले? माझ्या पिढीपासून ते आमच्या मुलाबाळांपर्यंतच्या सगळ्यांचे महाआजोबा गेले! आणि हे आजोबा जबरदस्त होते. ते तुमचे आजोबा होण्यासाठी तुम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची गरज नव्हती. त्यांचे शब्द आणि त्यांची वाणी ही त्यासाठी पुरत असे.
चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात आम्हाला शिवाजी महाराजांची माहिती मिळाली. पण पाचवी-सहावीत बाबासाहेबांचे पुस्तक वाचून झाल्यावर शिवाजी महाराज आमच्या लेखी प्रेमाचे, हक्काचे, आदराचे असे जणू जिवंत झाले. पुढे वाढत्या वयात कुठल्याही गड-किल्ल्यावर चढताना आणि उतरताना मागे बाबासाहेबांचे शब्द असतच.
राजा शिवछत्रपती नाटकाच्या रूपाने मराठी माणसाने शिवकाळ अनुभवला. छोट्या परिघातून बाबासाहेबांनी मराठी माणसाला बाहेर काढले आणि शिवाजी महाराज दाखवले. बघता बघता बाबासाहेब देखील अनेकांचे हक्काचे, आदराचे आणि प्रेमाचे झाले.
पुणे विमानतळावर एकदा अचानक एका गेटपाशी खूप गर्दी दिसली म्हणून बघितलं तर सगळे वाकून नमस्कार करत होते बाबासाहेबांना. पुरंदरे आजोबा सुहास्यवदनाने सगळ्यांना आशीर्वाद देत होते. साठेक वर्षांच्या एक महिला नमस्कार करून परत येताना पदराने डोळे पुसत होत्या, बाबासाहेबांना नमस्कार करताना त्यांचे मन भरून आले होते.
लहान थोर अनेक जण त्यांना नमस्कार करत होते आणि आशीर्वाद देताना त्यांचा चेहरा प्रसन्न तर होताच पण त्यांची संपूर्ण देहबोली ही एका अत्यंत कसलेल्या स्टेज परफॉर्मन्स देणाऱ्या कलाकाराची होती हे अगदी तितक्यात देखील मला लक्षात आले!
ती नाट्यपूर्णता त्यांच्या लेखनात आहेच- नव्हे त्यांच्या लेखनशैलीचे सर्वात मोठे बलस्थान आहे. त्यामुळेच शिवाजी महाराज समूर्त साकार झाले. छोट्या शिवबाची स्वप्ने त्यामुळे छोट्या मुलांना आपलीशी वाटली. आपण एका बृहत् मराठी संस्कृतीचे शिलेदार आहोत ही जाणीव बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे अनेकांच्या मनात रुजली.
त्यांच्या टीकाकारांना ही गोष्ट कळली का? का कळून देखील त्यांना ती समजून घ्यायची नव्हती- नाही? बाबासाहेबांनी नुसता इतिहास रंजक पद्धतीने आयुष्यभर एक पॅशन म्हणून जनतेसमोर कधी लेखक, कधी अभिनेता, कधी दिग्दर्शक, कधी निर्माता, कधी मेंटॉर आणि अनेकदा वक्ता बनत मांडला नाही. या महाआजोबांनी त्या शिवकालीन इतिहासातले, स्वातंत्र्य नावाचे मूल्य, मराठी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात नकळत रुजवले.
राजा शिवछत्रपती पुस्तकाच्या शेवटच्या पानावरचा परिच्छेद हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे सारे गांभीर्य सारे तेज शब्दा शब्दात उलगडवून दाखवणारा आहे. आज बरोबर नेमका तोच परिच्छेद आठवतो आहे आणि मन कसे गंभीर आणि स्तब्ध होते आहे… बाबासाहेब पुरंदरे यांना आणि त्यांच्या कार्याला त्रिवार मुजरा आणि विनम्र श्रद्धांजली.
– डॉ. आशुतोष जावडेकर